Translate

Tuesday, December 25, 2018

बदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षक

             कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही  त्या राष्ट्राच्या शैक्षणिक दर्जावर अवलंबून असते आणि शिक्षणाचा दर्जा हा देशाच्या शिक्षकांवरून ठरतो त्यामुळे राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकाचे योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे.
           आपल्याकडे असलेले ज्ञान  हे दुसऱ्या पर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे असे मानून निस्वार्थी भावनेने ज्ञान दानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा वारसा आपल्या देशाला लाभला आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता अोळखून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करुन, त्यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेणारे शिक्षक ही आपल्या समाजाने बघितले आहेत त्यामुळे शिक्षकांना समाजात मनाचे व आदराचे स्थान आहे. नेल्सन मंडेला म्हणतात शिक्षण हे एक असे प्रभावी शस्त्र आहे ज्याचा सुयोग्य वापर करून तुम्ही जग बदलू शकता, हे शस्त्र समाजाच्या देशाच्या उन्नतीसाठी उत्तमप्रकारे वापरण्याची योग्यता विद्यार्थ्यांनमध्ये फक्त एक  शिक्षकच निर्माण करू शकतो त्यामुळे शिक्षकाचा शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन हा अत्यंत महत्वपूर्ण ठरतो.
     पण जसं काळ बदलत गेला तसं शिक्षणाचं स्वरूप आणि शिक्षकांची विचारसरणीही बदलली आहे. सध्या गुणवत्तेपेक्षा जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विषयांच्या मुळ संकल्पना समजुन न सांगता फक्त घोकंपट्टीवरच जास्त भर दिला गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य गुण विकसित होण्याचे प्रमाण ही कमी होत चालले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा दर्जा हा खालावत चालला आहे असे विद्यार्थी शिक्षण पुर्ण करुन पदवी तर मिळवतात पण चांगली नौकरि मिळवण्यात ते अपयशी ठरतात आणि याचा परिणाम बेरोजगारी वाढवण्यामध्ये होतो.
             नेल्सन मंडेला म्हणतात शिक्षण हे एक असे प्रभावी शस्त्र आहे ज्याचा सुयोग्य वापर करून तुम्ही जग बदलू शकता, हे शस्त्र समाजाच्या देशाच्या उन्नतीसाठी उत्तमप्रकारे वापरण्याची योग्यता विद्यार्थ्यांनमध्ये फक्त एक  शिक्षकच निर्माण करू शकतो त्यामुळे शिक्षकाचा शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन हा अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. कुठेही नौकरी मिळत नाही, आरामाची नौकरी आहे म्हणून शिक्षक होणाऱ्यांचे प्रमाण ही वाढत चालले आहे आणि हि फार चिंतेची बाब आहे असे शिक्षक गुणवत्तापुर्ण विद्यार्थी कसे घडवू शकतील कारण त्यांच्या मध्येच गुणवत्तेचा अभाव आहे. हे चित्र जर बदलायचे असेल तर  सामाजाला आणि देशाला आणखीन समृद्ध करण्यासाठी, स्वयंप्रेरणेने आणि आवड म्हणुन शिक्षकी पेशा स्वीकारणार्यांची संख्या वाढली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत  स्वतःला आद्ययावत करणारे, विद्यार्थ्यांची आकलन क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणारे, विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्तीस प्रोत्साहन देणारे, चिकित्सेला प्राधान्य देणारे, फक्त पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रात्यक्षिकांवर जास्त भर देणारे शिक्षक  जेव्हा निर्माण होतील तेव्हा  संशोधनात्मक, कौशल्य गुणांवर आधारित, नवनवीन कृतीशील प्रयोगांवर आधारित शिक्षण पद्धती अस्तित्वात येण्यास मदत होईल ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पर्यायाने देशाचे भवितव्य उज्वल होताना आपल्याला दिसेल

Monday, November 26, 2018

#संविधान दिवस - आपले संविधान आपला स्वाभिमान.


''जगामध्ये भारताची ओळख ही विविधतेत एकता असणारा देश अशी आहे. विविध भाषा, धर्म, पंथ, वंश, संस्कृती, परंपरा अशा विविधतेने नटलेला असूनसुद्धा आज भारत देश एकात्म आणि अखंड राहिलेला आहे याचे सारे श्रेय भारतीय संविधानाला जाते ''

जगामध्ये भारताची ओळख ही विविधतेत एकता असणारा देश अशी आहे. विविध भाषा, धर्म, पंथ, वंश, संस्कृती, परंपरा अशा विविधतेने नटलेला असूनसुद्धा आज भारत देश एकात्म आणि अखंड राहिलेला आहे याचे सारे श्रेय भारतीय संविधानाला जाते.

संविधान दिवसाचे महत्व -

          भारतीय घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधानाला मान्यता दिली आणि त्याचा स्वीकार केला म्हणून हा दिवस  सर्व भारतीयांसाठी महत्वाचा आहे. २९ ऑगस्ट १९४७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय घटना समितीची स्थापणा करण्यात आली होती.  बाबासाहेबांच्या अफाट विद्वतेतुन आणि अथक परिश्रमातुन २ वर्षे ११ महिने व  १७ दिवसांच्या कालावधीत भारतीय संविधान लिहून पूर्ण झाले. संविधान बनवितानाच  बाबासाहेबांनी प्रत्येक  बाबीची  अत्यंत बारकाईने  चिकित्सा करुन  भारतीय परस्थितीला  अनुरूप तरतुदी केल्या आहेत

सर्वोत्कृष्ट संविधान -

       भारतीय संविधान हे जगातील आदर्श संविधान मानले  जाते कारण त्याची निर्मिती स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या  मूलभूत तत्वांवर झालेली आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे ज्यामध्ये ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे समाविष्ट आहेत . जवळपास ८०००० शब्दांचा उपयोग  यामध्ये केला गेला. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भारतीय राज्यघटनेत घटना  दुरूस्तीचा आधिकारही दिला आहे ज्यामुळे संविधानाला लवचिकता प्रदान झाली आहे. भारतीय संविधानाने संसदीय लोकशाही चा स्वीकार करून सर्वसामान्य जनतेला निर्णयाचा सर्वाधिकार बहाल केला आहे. संविधानामध्ये व्यकतीपेक्षा राष्ट्राला जास्त महत्व दिले आहे म्हणूनच उद्देशिकची सुरुवात आम्ही भारताचे नगरिक अशी केलि आहे. संविधानाने आपल्याला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य प्रदान केले आहे तसेच मतदानाचा  शोषणविरुद्ध आवाज  उठविण्याचा, शिक्षणाचा अधिकारही  दिला आहे त्याचा आदर राखुन योग्य प्रकारे वापर करणे ही आपली जबाबदारी आहे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीस मुलभुत आधिकार आणि मुलभुत कर्तव्ये प्रदान केलेली आहेत आधिकारांविषयी जागरूक असलेले नागरीक आपण अनेक बघतो पण कर्तव्याची जाण असलेले आणि त्याचे पालन करणाऱ्या  नागरीकांची संख्या  खूपच कमी आहे.  संविधानद्वारे घोषित स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही,  या मूल्यांची समाजात स्थापना करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न  करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

Thursday, November 22, 2018

#नॅशनल वॉर मेमोरियल - शौर्याचं अणि निष्ठेचं प्रतीक.

          "युद्धात वापरलेली शस्त्रसामुग्री व इतर सामान येथे जतन करण्यात आले आहे. कारगिल युद्धात वापरले गेलेले  'MIG 23 BN' हे लढाऊ विमान, १९७१ च्या भारत पाकिस्तान आणि भारत पोर्तुगीज युद्धात वापरलेले लढाऊ जहाज   ' INS (indian naval ship) त्रिशूलची ' प्रतिकृती आणि  वेगवेगळ्या युद्धात वापरलेली दहा अजस्त्र रणगाडे ज्यामध्ये एका पाकिस्तानी रणगाडयाचाही समावेश आहे, हे या वॉर मेमोरियलचे खास आकर्षण आहे."

  वॉर मेमोरियलची माहिती अणि इतिहास -

                    मागच्या आठवड्यात (१७/११/२०१८) पुणे येथील नॅशनल वॉर मेमोरियल( southern command museum) ला मी आणि माझ्या मित्राने भेट दिली. नावावरूनच आपण या संग्रहालयाचा उद्देश समजू शकतो, देशाच्या संरक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या वीरजवनांच्या स्मरणार्थ हे संग्रहालय उभारण्यात आले. निसर्गाच्या  सनिध्यात  उभ्या असलेल्या या प्रशस्त वास्तूची  स्थापणा १९९८ मध्ये करण्यात आली. हे साऊथ एशियातील एकमेव असे वॉर मेमोरियल आहे जे पूर्णपणे लोकांनी उभा केलेल्या निधीतून तयार झाले.



 at national war memorial pune
         दक्षिण भारताच्या समृध्द इतिहासाचा वारसा  या  संग्रहालयाने जपला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पृथ्वीराज चौहान आणि टिपू सुलतान यांच्या साम्राज्याची आणि कर्तृत्वाची माहिती भित्तिचित्रांच्या, प्रतिमांच्या आणि लहानलहान लेखांच्या माध्यमातून दिली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य आणि युद्धतंत्र भारतीय सैन्याने वेळोवेळी आत्मसात केले आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याची मुळं ही  इतिहासात किती खोलवर रुजलेली आहेत हे यावरून दिसून येते

वॉर मेेमोरियलचे आकर्षण -


         युद्धात वापरलेली शस्त्रसामुग्री व इतर समान येथे जतन करण्यात आले आहे. कारगिल युद्धात वापरले गेलेले  'MIG 23 BN' हे लढाऊ विमान, १९७१ च्या भारत पाकिस्तान आणि भारत पोर्तुगीज युद्धात वापरलेले लढाऊ जहाज   ' INS (indian naval ship) त्रिशूलची ' प्रतिकृती आणि  वेगवेगळ्या युद्धात वापरलेली दहा अजस्त्र रणगाडे ज्यामध्ये एका पाकिस्तानी रणगाडयाचाही समावेश आहे, हे या वॉर मेमोरियलचे खास आकर्षण आहे. त्याचबरोबर सैन्याला सामर्थ्यवान बनविणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या (पृथ्वी, अग्नी, नाग इ.) प्रतिकृती येथे ठेवण्यात आल्या आहेत हे सर्व पाहताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर पोहचल्याचा भास होतो.
    भारतीय सैन्याच्या दक्षिणी कमांडचा इतिहास, दक्षिणी कंमांडची स्थापना, त्यांनी आतापर्यंत गाजवलेलं शौर्य, आता पर्यंत झालेल्या सर्व कंमांडरची माहिती, सैनिकांना मिळालेली शौर्य पदके याची रोचक माहिती संग्रहालयात मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय सैन्य दलांच्या विविध सैनिकी गणवेशातील प्रतिकृती उभ्या केल्या आहेत ज्या हुबेहूब खऱ्या सैनिकांसारख्याचं दिसतात.
          सैनिकी प्रशिक्षण अनुभवण्याची एक संधीही हे संग्रहालय पेंट बॉल शूटिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देतं, झाडाझुडपांच्या मध्ये तयार केलेल्या शूटिंग रेंजमध्ये  बंदुकीने पेंट बॉलच्या गोळ्यांनी निशाणा लावण्याच्या खेळाची अनुभूती येथे घेता येते.

विशेष परेड -

At national war memorial pune.
          या वॉर मेमोरिअलचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दर शनिवारी संध्याकाळी ६.०० वाजता होणारी सैनिकांची परेड. युद्धामध्ये शहिद झालेल्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या विशेष 'पुष्पांजली अपर्ण  समारंभाचे'  (wreath laying ceremony) आयोजन केले जाते, यामध्ये लष्करी बँड पथकाच्या तालावर सैनिकांचे शिस्तबद्ध संचलन होते आणि कमांडरच्या हस्ते शहिदांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली जाते आणि त्यानंतर सन्मानपूर्वक सैन्य दलांचे ध्वज उतरविले जातात. शनिवार असल्यामुळे आम्हालाही हे संचलन पाहता आले, अंगावर शहारे आणणारं असं लष्करी संचलन  मी पहिल्यांदाच प्रत्यक्षात पाहिलं.
        प्रत्येकाने आवर्जुन पाहावं असं हे संग्रहालय आहे.  सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपल्या कृतीतुन पूर्ण करणे हीच शहीदांसाठीची खरी श्रध्दांजली होय.

Monday, November 19, 2018

#शिवराज्याभिषेक - एका नव्या युगाची सुरुवात


" शिवाजी महाराजांचे राजेपद हे कोणी 'किताब म्हणून दिलेले नव्हते ते त्यांनी स्वतः निर्माण केले होते. महाराजांचे राजेपद हे केवळ स्वयंभू आणि स्वतंत्र नव्हते तर ते सार्वभौमही होते. याचा अर्थ महाराजांचे राज्य या पृथ्वीतलावर कोणाच्याही अधिपत्याखाली राहणारे नव्हते, कोणत्याही साम्राज्याचा त्यांच्यावर अधिकार चालणार नव्हता. शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला राज्याभिषेक करून घेऊन मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. "

         गुलामगिरीच्या अंधाराने ग्रासलेल्या भूमीला स्वतंत्र्याच्या प्रकाशाने उजळून टाकणारी घटना म्हणजे 'शिवराज्याभिषेक'. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील ही एक अनन्यसाधारण घटना होय, शिवराज्याभिषेक दिन म्हणजे स्वराज्याला स्वातंत्र्य व सार्वभौमत्व देणारा दिवस.
             त्याकाळात म्हणजे सतराव्या शतकात महाराष्ट्रात अनेक छोटे मोठे राजे होते जसे राजे शिर्के, राजे मोरे, राजे निंबाळकर इ. पण हे सर्व सार्वभौम राजे नव्हते ते मोगलांच्या, निजामशाहीच्या, किंवा आदिलशाहीच्या अधिपत्याखाली राहणारे राजे होते, त्यांचे राजेपद किताबापूरते मर्यादित होते त्यांना निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता पण शिवाजी महाराजांचे राजेपद हे कोणी 'किताब म्हणून दिलेले नव्हते ते त्यांनी स्वतः निर्माण केले होते महाराजांचे राजेपद केवळ स्वयंभू आणि स्वतंत्र नव्हते तर ते सार्वभौमही होते. याचा अर्थ महाराजांचे राज्य या पृथ्वीतलावर कोणाच्याही अधिपत्याखाली राहणारे नव्हते, कोणत्याही साम्राज्याचा त्यांच्यावर अधिकार चालणार नव्हता. शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला राज्याभिषेक करून घेऊन मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. स्वराज्याला धार्मिक आणि राजनीतिक मान्यतेची गरज होती. 
           महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना ही अतिशय व्यापक व प्रभावी होती. राज्याभिषेकावेळीच महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली, राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती हे सर्व मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तीकरित्या छत्रपतींना जबाबदार असत महाराजांनी ही मंत्रीपदे वंशपरंपरागत न ठेवता कर्तबगारिवर निश्चित केली होती. स्वतंत्र राज्याची 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू करून शालीवहन शक ही कालगणना मोडीत काढली नवीन शक सुरू करून नव्या युगाची सुरवात महाराजांनी केली. राज्याभिषेक शक हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची एक महत्त्वाची निशाणी ठरली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी लिपीतील नाणी चलनात आणली परकीय चलनाच्या वापरास स्वराज्यात बंदी केली. मराठी भाषेवर होणारे फारसी, अरबी या परकीय भाषांचे आक्रमण थांबविण्यासाठी 'राज्य व्यवहार कोषाची' निर्मिती केली (हा कोष म्हणजे राज्यव्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या परकीय शब्दांना पर्यायी स्वभाषेतील शब्दांचा संग्रह होय) 'लेखन प्रशस्ती ग्रंथ' निर्माण करून मराठी लेखन परंपरा सुरू केली.
                मोगल, आदिलशाह, पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज यांच्या सोबत संघर्ष करून शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्याची निर्मिती केली पण हे सर्वजण शिवाजी महाराजांना शाहजी महाराजांचे बंडखोर पुत्र मानत होते त्यांना स्वतंत्र राजा मानत नव्हते राज्याभिषेकामुळे महाराजांच्या स्वतंत्र राज्याला मान्यता प्राप्त झाली. राज्याभिषेकावेळी काही धर्मपंडितांनी आणि सरदारांनी महाराजांच्या क्षत्रियत्वावर प्रश्न उपस्थित करून त्यास विरोध केला पण हा विरोध मोडीत काढून महाराजांनी स्वराज्याला धार्मिक व राजनीतिक मान्यता प्राप्त करून घेतली. त्याकाळात पुरोहितांचे दोन परस्पर विरोधी गट होते एक वैदिक सांप्रदाय आणि दुसरा तांत्रिक (शाक्त) सांप्रदाय. महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पध्दतीने निश्चलपुरी गोसाव्याने २४ सप्टेंबर १६७४ ला केला.
                  राज्याभिषेक हे महाराजांचे साध्य नव्हते तर साधन होते या साधनाच्या आधारे त्यांना स्वराज्याचे स्वातंत्र्य आणि कल्याण साधायचे होते. महाराजांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पना अतिशय उज्वल आणि उदात्त होत्या, सर्वसमावेशक आणि मानवहितैषी होत्या. महाराजांनी राज्याभिषेकाद्वारे स्वराज्यावर स्वतंत्र्याचे आणि सर्वभौमत्वाचे जे संस्कार केले होते त्यामुळेच औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रुलाही २६ वर्षे संघर्ष करुनही स्वराज्य काबीज करता आले नाही. शेवटी या संघर्षातच त्याचा अंत झाला. हाच संस्कार पुढे संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांवर केला गेला ज्यामुळे आजही आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित आहे आणि ते तसेच राहण्यासाठी आपण सर्वांनी सजग व सतर्क असणे गरजेचे आहे. शिवराज्याभिषेक हा फक्त एक धार्मिक विधी नसून देशहिताला प्राधान्य देण्याची प्रेरणा देणारा एक वैचारिक वारसा आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.

Monday, November 12, 2018

#तोरणा ट्रेक - भन्नाट पावसाळी दुर्गभ्रमंती

#तोरणा ट्रेक(८/९/२०१८ ) रोहन आणि सागर यांच्यासोबत.  

view of torna fort in rainy season

  किल्ल्याची माहिती -


                                     शहाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या संकल्पनेतील स्वराज्याचं ध्येयं आणि राज्यकारभाराचा, नैतिकतेचा, स्वाभिमानाचा वारसा सोबत घेऊन शिवाजी महाराज कर्नाटकातून पुण्याला आले. स्वराज्याच्या संकल्प पुर्तीच्या दिशेने महाराजांनी सुरवातीच्या काळात उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे ' तोरणागड ' जिंकणं. त्यामुळेच इतिहासात या किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे, गडावरती मोठ्या प्रमाणावर असलेल्या तोरणा प्रजातीच्या झाडीमुळे गडाला हे नाव मिळाले, अतिदुर्गम आणि अतिविशाल असा हा गड आहे त्याचा प्रचंड विस्तार पाहूनच महाराजांनी त्याला प्रचंडगड असे नाव दिले होते. स्वराज्याच्या सुरवातीच्या राजधानीची (राजगड) ढाल होता हा किल्ला, स्वराज्यातील या किल्ल्याचे महत्व ओळखूनच पुरंदरच्या तहात महाराजांनी हा किल्ला मोगलांना न देता स्वतःकडेच ठेवला होता.

पावसाळी दुर्गभ्रमंतीचा अनुभव - 

                                      पुणे जिल्ह्यातील सर्वात उंचीवर असलेला हा किल्ला. वल्हे  हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं गांव  तेथे गाड्या  पार्क करुण आम्ही ट्रेकला सुरुवात केली,  त्याबरोबरच पावसालाही सुरवात झाली, खुप जोराचा पाऊस  पडत होता फक्त पाच  दहा मीटर  पर्यतचं डोळ्याला दिसत होतं,  सगळा परिसर ढगांनी व्यापून टाकला होता.  जसं जसं आम्ही वरती जात  होतो तसं तसं चेहऱ्यावर बसणाऱ्या पावसाच्या तडाख्यानमुळे अणि निसरड्या झालेल्या वाटांमुळे  चढाई अजूनच अवघड वाटत होती. उभ्या चढाईचा शेवटचा टप्पा पर करुन आम्ही किल्ल्यावर पोहचलो. पावसाळा असल्यामुळे या किल्ल्यावर चढाई करणं थोडंस अवघड होतं पण पावसामुळेच आधी न पाहिलेलं किल्ल्याचं मनमोहक रूप पाहता आलं, गडाचा माथा हा ढगांसोबत पाठशिवणीचा खेळ खेळताना दिसत होता, गडावरील जमिनीने हिरव्यागार रंगाची शाल पांघरली होती आणि त्यावर अधून मधून पिवळ्या रंगाच्या फुलांचं नक्षीकाम केल्यासारख भासत होतं, या हिरव्यागार झाडाझुडपांनी गडावर जाणाऱ्या पायवाटेलाही व्यापून टाकलं होतं, ढगांचा चेहऱ्याला होणार स्पर्श हा खूपच सुखावनारा होता माथ्यावर पोहचल्यानंतर ढगांच्या दुनियेत पोहचल्या सारखं वाटत होतं खूपच अविस्मरणीय आणि सुंदर असा अनुभव होता. तोरणा ट्रेकच्या दरम्यान जेव्हा आम्ही वरती किल्ल्यावर पोहचलो तेव्हा तिथे दोघेजण धूम्रपान करताना दिसली उच्चशिक्षित होती आयटी क्षेत्रात काम करत होती माझा मित्र रोहन ने त्याला या वास्तूचं महत्व पटवून दिले तेव्हा त्यांनी आपली चूक मान्य केली आणि इथून पुढे असा न वागण्याचं आश्वासन दिलं. गडावरील एका  मंदिरात एक गावकरी कुटुंब खण्याचे पदार्थ बनवून विकत होते, गरमा गरम झुनका भाकरीवर ताव मारून  आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 

शिवरायांप्रतीचे कर्तव्य -                                   

जेव्हा आपण स्वराज्यातील गडकोटांचे भौगोलिक स्थान, त्यांची संरचना(बांधकाम शैली, वाटा, तटबंदी संरक्षणात्मक उपाय योजना इ.) , त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करू तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार आणि कार्य अनुभवता येतील. या गडकोटांची काळजी घेणे त्यांचे संवर्धन करणे ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. स्वराज्यातील गडकोट शौर्य, बलिदान, स्वाभिमान आणि नैतिकता या मूल्यांची जोपासना करण्याची प्रेरणा देतात, या मूल्यांची जोपासना करून राष्ट्रहितासाठी योगदान देणे हेच खरे शिवकार्य होय.
with rohan khndare

with sagar murade

Thursday, November 8, 2018

#वन्यजीव आणि माणूस


     "या परिस्थितीस माणसाच्या अनियंत्रित होत चाललेल्या गरजा आणि स्वार्थी अपेक्षा कारणीभूत ठरत आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी माणसाकडून नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर केला जात आहे, नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण केलं जात आहे ज्यामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत चालले आहे त्यामुळेच वन्यप्राण्यांचे मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे "

         पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे माणूस, बुद्धीच्या वापरामुळेच तो अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो, माणसाने आज जी काही प्रगती साधली आहे ती त्याच्याच जोरावर पण आता हीच प्रगती माणूस आणि निसर्ग यांच्या नात्यातला अडसर ठरत आहे याचे अलिकडचेच उदाहरण म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील टी-१ (अवनी) वाघीणीची हत्या. (ज्या तेरा लोकांच्या हत्येसाठी या वाघिणीला जबाबदार ठरवलं होतं त्याचे कोणतेही पुरावे  उपलब्ध नव्हते अधिक माहितीसाठी क्लिक करा) या हत्येमुळे माणूस आणि वन्यजीव यांच्या संबंधातील वितुष्टता किती विकोपाला पोहचली आहे हे साऱ्या जगाने अनुभवले.
             या परिस्थितीस माणसाच्या अनियंत्रित होत चाललेल्या गरजा आणि स्वार्थी अपेक्षा कारणीभूत ठरत आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी माणसाकडून नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर केला जात आहे, नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण केलं जात आहे ज्यामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत चालले आहे त्यामुळेच वन्यप्राण्यांचे मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होतो आहे अन्नसाखळीतील एक एक स्तर (म्हणजेच कीटकांच्या, वनस्पतींच्या, पशु पक्ष्यांच्या अनेक प्रजाती) नामशेष होत आहेत ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळत चालले आहे. दरवर्षी १,३०,००० किलोमीटर वर्ग या दराने जंगलांचे प्रमाण कमी होत आहे ज्यामुळे अन्नासाठी गवत आणि वनस्पतींवर अवलंबून असलेल्या  वन्यजीवांची संख्या कमी होत आहे, या वन्यजीवांची संख्या कमी झाल्यामुळे अन्नासाठी यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मांसभक्षक वन्यजीवांची भटकंती वाढली आहे, ही भटकंतीच त्यांना मानवी वस्तीपर्यंत घेऊन येत आहे.
       माणूस आणि वन्यजीव यांच्यातला हा संघर्ष जर कमी करायचा असेल तर जी काही जंगलं बाकी आहेत त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहेे कारण पृथ्वीवर जेवढं जंगलाचं प्रमाण होतं त्याच्या फक्त ५०% आता  शिल्लक राहिलं आहे. यासाठी प्रत्येक देशाने कायदे बनवून त्याची अंमलबजावणी सुरू केलीआहे पण त्याचा म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही  कारण त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सहभाग नाही. जोपर्यंत माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी नैसर्गिक साधन संपत्तीची लूट, जंगलतोड, वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी थांबवत नाही तोपर्यंत या परिस्थितीत बदल होणार नाही. माणसाचं अस्तित्व निसर्गावरती अवलंबून आहे पण निसर्गाच्या  अस्तित्वासाठी निसर्गातल्या प्रत्येक घटकाचे अस्तित्व गरजेचं आहे हे माणसाने समजून घेतले पाहिजे आणि निसर्गाचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावली पाहिजेत आणि ती जागवली पाहिजेत. जेव्हा जेव्हा आपण जंगल आणि वन्यप्राणी संबंधित भागात जाऊ त्यावेळेस तेथील नियमांचे पालन केले पाहिजे, इथून पुढे  सर्व मानवजातीची पावले  पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं पडणं ही काळाची गरज आहे.

Monday, November 5, 2018

#तुम्ही ट्रेकिंग का करता?


     

       "माझ्यासाठी ट्रेकिंगचा अर्थ फक्त डोंगर चढणं आणि उतरणं, दुर्गम पायवाट निवडून जीव धोक्यात घालणं, जंगलातून फेरफटका मारणं  हा नसून जगण्याचा आनंद द्विगुणीत करणारी, मातीशी असलेलं नातं आणखीन घट्ट करणारी, निसर्गाप्रति असणाऱ्या जबाबदारीचे भान ठेवून निसर्गसोबत एकरूप होण्याची धाडसी कृती म्हणजे ट्रेकिंग "


   प्रत्येक ट्रेकरला ला नेहमी विचारला जाणार प्रश्न म्हणजे तुम्ही ट्रेकिंग का करता, मलाही हा प्रश्न घरच्यांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी बऱ्याच वेळा विचारला माझ्या परीने मी त्या त्या वेळेस त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न ही केला पण जेव्हा जेव्हा ट्रेकच्या संदर्भातील विषय यांच्यासमोर येतो तेव्हा तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव अजूनही तसाच असल्याचे जाणवते, जेव्हा मी ट्रेकला सुरुवात केली होती तेव्हा मलाही या प्रश्नाचं उत्तर नीटसं माहिती नव्हतं  पण जसं जसं ट्रेक करत गेलो तसं तसं या प्रश्नाचं उत्तर ही उमजत गेलं. बघूया आता तरी या सगळ्यांना ट्रेकिंगचं महत्व पटतंय का?
         ऊंच डोंगरं, खोल दऱ्या आणि घनदाट जंगल यांचा आमच्या भागात (सोलापूर) असलेल्या आभावामुळे त्यांच्या बद्दल लहानपणापासूनच आकर्षण निर्माण झालं होतं. त्यामुळे हे सर्व जवळून पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी मन ट्रेकिंगकडे वळले.
    शहरातून, गावातून जे निसर्गाचे दर्शन आपल्याला घडते त्यापेक्षा अधिक समृद्ध आणि संपन्न निसर्गाचे दर्शन ट्रेकिंगमुळे घडते.
      अवघड चढण, तीव्र उताराची  दुर्गम पायवाट, ऊन, वारा, पाऊस या सर्वांवर मात करून जेव्हा आपण ट्रेक पूर्ण करतो तेव्हा जो आत्मविश्वास निर्माण होतो त्याच्या जोरावर जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी सामना करण्याचं धैर्य माझ्या अंगी तयार होतं.
    स्वतः पेक्षा आधी दुसऱ्यांचा विचार करण्याची, कर्तव्यांपेक्षा जबाबदारिला जास्त महत्त्व देण्याची, आपल्या गरजा नियंत्रित  ठेवून  आहे त्या परिस्थितिशी जुळवून घेण्याची क्षमता ट्रेकमुळे  निर्माण होते.(त्यामुळेच नामांकित कंपन्या टीम स्पिरीट वाढवण्यासाठी ट्रेकचं आयोजन करतात)
       छत्रपतींच्या स्वराज्याचा इतिहास फक्त पुस्तकं वाचून, गावामध्ये शहरामध्ये त्यांचा जयजयकार करून समजणार नाही, तो जर समजून घ्यायचा असेल तर गडकोटांच्या पायवाटा तुडविल्या पाहिजे, बुरुजांची तटबंदीची आणि महादरवाज्यांची मजबुती अनुभवली पाहिजे, कर्तृत्ववाचा,शौर्याचा, बलिदानाचा आणि त्यागाचा  जो वारसा आहे तो समजून घेतला पाहिजे. त्यासाठी ट्रेकिंग करणं गरजेचं आहे.
      ट्रेकिंगला गेल्यानंतर त्या भागातील भाषा, खाद्यसंस्कृती, तिथली जीवनपध्दती यांसोबत ओळख होते आणि सतत आशा वैविध्यपुर्ण जीवनपध्दतींच्या संपर्कात राहिल्यामुळे माझी विचारसरणी प्रगल्भ होऊन  उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते.
        ट्रेकिंगमुळे मला माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता समजतात, माझ्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी समजतात  ज्यामुळे स्वतःमध्ये काय बदल करणे आवश्यक आहे हे लक्षात येते.
      शहरी जीवनशैली मुळे, कामाच्या ताणामुळे जी नकारात्मक विचारांची मरगळ मनावर जमा होते ती झटकून टाकण्यासाठी ट्रेकचा खूप उपयोग होतो. ट्रेकिंगमुळे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होते ज्यामुळे माझ्या कार्यक्षमतेत वाढ होते.
       निसर्गाला जवळून पाहिल्यामुळे अनुभवल्यामुळे त्याच्या बद्दलचा आदर  मनामध्ये आणखीन वाढलाय आणि आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेची काळजी घेण्याची मानसिकता माझ्यामध्ये ट्रेकमुळे तयार झालीय.
        ट्रेकिंगमुळे मला माझं अस्तित्व शोधण्यास मदत होते आणि कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे जे आपण फक्त ऐकत आणि बोलत असतो ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळते.
          माझ्यासाठी ट्रेकिंगचा अर्थ फक्त डोंगर चढणं आणि उतरणं, दुर्गम पायवाट निवडून जीव धोक्यात घालणं, जंगलातून फेरफटका मारणं  हा नसून जगण्याचा आनंद द्विगुणीत करणारी, मातीशी असलेलं नातं आणखीन घट्ट करणारी, निसर्गाप्रति असणाऱ्या जबाबदारीचे भान ठेवून निसर्गसोबत एकरूप होण्याची धाडसी कृती म्हणजे ट्रेकिंग. उंच ठिकाणी जाऊन आजूबाजूचा परिसर पाहणे हा मानवी स्वभावच आहे म्हणुन तर लहान मुलं जेव्हा रांगायला शिकतं तेव्हा ते पायऱ्यांकडे जास्त आकर्षित होताना दिसतं. ट्रेकिंग हा एक प्रवास आहे माणूस आणि माणुसकी यांच्यामधला म्हणूनच जोपर्यंत हा प्रवास सुरू राहील तोपर्यंत माझ्यातली माणुसकी वृद्धिंगत होत राहील.
(तुम्हीही जर ट्रेकर असाल तर ट्रेकिंग का करता हे comment मध्ये नक्की कळवा आणि ही पोस्ट वाचून जर ट्रेकिंग करण्याची इच्छा तुमच्या मध्ये निर्माण झाली असेल तर ते ही नक्की कळवा)

Friday, November 2, 2018

#स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड.

#जगणं समृद्ध करणारा अनुभव.
(Raigad night Trek & camping 28/10/2017 to 29/10/2017)
         
         
Statue of chatrapati shivaji maharaj at rajgad

       "राजदरबार आणि बाकीचे ठिकाण बघितल्यानंतर आम्ही महाराजांच्या समाधी कडे गेलो रायगडाने सर्वात आनंदाचा आणि सर्वात दुखाचा असे दोन्ही क्षण अनुभवले महाराजांचा राज्यभिषेक सोहळा आणि महाराजांचा मृत्यु. महाराजांच्या समाधीला आभिवादन करुन आम्ही थोड्यावेळ तेथे बसलो त्या पवित्र वास्तुजवळ बसुन मन परत महाराजांच्या विचरांमध्ये हरवुन गेले "

             रायगडाची ऊंची २८५१ फुट आहे. रायगड तसा easy grade  मधला Trek आहे पण night मधे थोडा challenging वाटतो. मी रोहन, अजय, आणि सिध्देश्वर पुण्यातुन रायगडाकडे निघालो, night biking चा Thrill ही आम्ही त्यादिवशी अनुभवला रात्री ११.०० वाजता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे पाचाड गावात पोहचलो.  थोड्यावेळ थांबुन लगेच पाचाड खिंडीतुन चढाईला सुरुवात केली. गडावर जाण्यासाठी जवळपास १४७५ पायऱ्या  आणि अधुनमधुन लागणारी निमुळत्या  पायवाटेवरुन जावे लागते. Torch जर बंद केली तर शेजारी असुनही आम्ही एकमेकांना दिसत नव्हतो ऐवढा अंधार पसरलेला होता आणि उशिरा चढाईला सुरुवात केल्यामुळे आमच्या पुढे आणि मागेही लांब पर्यत कोणीही नव्हते. रस्त्यात आम्हाला साप, खेकडा, आठ ते दहा इंच लांबीच्या आळ्या, आणि अंधारात काजव्यासारखी चमकणारी आळी असे वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे जीव दिसत होते. तासाभरानी आम्ही महादरवाज्याजवळ पोहोचलो. या दरवाज्याची रचना  अशी आह की तो एकदम जवळ आल्याशिवाय दिसत नाही, लांबून तिथे दरवाजा आहे अशी कल्पनाच आपण करु शकत नाही. जेव्हा जेव्हा आम्ही अराम करण्यासाठी थांबत होतो तेव्हा तेव्हा सर्व torch बंद करुन आभाळभर पसरलेलं चांदणं बघत होतो. ती शांतता, तो चंद्राचा अंधुक अंधुक प्रकाश आणि  त्यामध्ये दिसणारे गडाचे, डोंगर दऱ्याचे आणि घनदाट जंगलाचे  दृष्य हे खरंच खुप अदभूत होतं.
             रात्री 2 वाजता आम्ही गडावर पोहोचलो. Tent साठी सुरक्षित जागा बघितली, बाजारपेठेच्या भिंतीचा आडोसा घेऊन  tent टाकायला सुरुवात केली त्याचवेळेस आमच्या आवाजाने आणि torch च्या प्रकाशाने गडावर असलेली सात आठ जनावरं (गाय, बैल, म्हशी) भेदरली आणि ओरडत आमच्या दिशेनं येऊ लागली तेव्हा आम्ही सर्वजण घाबरलो, सर्व torch बंद केल्या , आवाज बंद केला आणि शांत ऊभे राहीलो तसं जनावरांचं ओरडणं बंद झालं आणि ते परत जावु लागले. Tent टाकून झाल्यावर सर्वांनी मिळुन जेवण केलं, दमल्यामुळे सर्वजण लगेचच झोपले. सकाळी 6.00 च्या आसपास गडावर असलेल्या लोकांच्या आवाजाने आम्ही सगळे उठलो आणखीन एक तास तरी झोपावं असा सगळ्यांचा विचार चालू होता पण गडावरील सुरक्षा रक्षकाने tent काढण्याची सुचना केली त्यामुळे लगेच tent काढावा लागला. सर्व सामान आवरुन आम्ही वाघ दरवाज्या जवळ असलेल्या तळ्याकडे fresh होण्यासाठी गेलो. गडावर जवळपास 12 तलाव आहेत गडावरील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि  गडावरील बांधकामास लागणारा दगड मिळवण्यासाठी  ही तलावं खोदण्यात आली होती. बाजारपेठेच्या समोरच म्हणजे होळाच्या माळावर महाराजांचा पुतळा आहे त्याला आभिवादन करुन आम्ही पुढे निघालो तेथुन जवळच महाराजांचा राजदरबार आहे. आता असलेल्या राजदरबाराच्या भव्य दिव्यतेवरुन तेव्हाच्या काळी असलेल्या राजदरबाराचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेली ती जागा बघताना मन इतिहासात हरवून जाते. रायगड बघताना महाराजांच्या दुरदृष्टीची, त्यांच्या प्रखर बुद्धीमत्तेची आणि कुशल व्यवस्थापनाची जाणीव होते. रायगडाच्या चारही बाजुने खोल दरी आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये असुनही तो त्यांच्या पासुन अलिप्त आहे. गडाच्या कड्यांवर पावसाळ्यात ही गवत उगवत नाही, सागरी दळणवळणास ही हे ठिकाण जवळ आहे आणि या गडाच्या सुरक्षिततेसाठी आजुबाजुला 9 गड आहेत म्हणूनच महाराजांनी राजधानी साठी या गडाची निवड केली.
गडावरील बांधकामाची जबाबदारी महाराजांनी हिरोजी इंदळकर यांच्या वर सोपिवली होती आणि ती त्यांनी इमाने इतबारे पार पाडली. गडावरील बांधकामास जेव्हा पैशाची कमतरता भासु लागली तेव्हा हिरोजींनी स्वतःची संपत्ती विकुन गडाचे बांधकाम पुर्ण केले यावरुन त्यांची महाराजांप्रती स्वराज्याप्रती असलेली कर्तव्य निष्ठा दिसुन येते. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर गडावर जाणे किंवा गडावरुन उतरणे अशक्य आहे असे मजबूत आणि भक्कम बांधकाम हिरोजींनी केले.
      राजदरबार आणि बाकीचे ठिकाण बघितल्यानंतर आम्ही महाराजांच्या समाधी कडे गेलो रायगडाने सर्वात आनंदाचा आणि सर्वात दुखाचा असे दोन्ही क्षण अनुभवले महाराजांचा राज्यभिषेक सोहळा आणि महाराजांचा मृत्यु. महाराजांच्या समाधीला आभिवादन करुन आम्ही थोड्यावेळ तेथे बसलो त्या पवित्र वास्तुजवळ बसुन मन परत महाराजांच्या विचरांमध्ये हरवुन गेले. मनोमन महाराजांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या विचारांना मानाचा मुजरा करुन आम्ही तेथुन निघालो.
         गडावरुन उतरताना जास्त काही  अडचण नाही आली गडावर जाणाऱ्यांची गर्दी खुप होती जवळपास दोन तासात आम्ही पायथ्याला पोहचलो. घनदाट पसरलेले जंगल, खोल दऱ्या लांबच लांब पसरलेली सह्याद्रीची रांगा असे नयनरम्य दृष्य डोळ्यात साठवून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली .
Click during the night trek at Raygad Fort


camping at raygad fort


started return journey of Raygad Trek

Wednesday, October 31, 2018

#दिवाळी अणि फटाके





"फक्त दिवाळीतचं  फटाके उडविली जातात असे नाही अणि प्रदुषण फक्त फटाक्यांमुळेच होते असेही नाही जरी असे  असले तरी दिवाळीतील  फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत होणारी  वाढ ही लक्षणीय असते हे कोणीही नाकरणार नाही, त्यामुळे फटाक्यांचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे"


दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव, दिवाळी म्हणजे  फरळाचा गोड़वा अणि दिवाळी म्हणजे फटाके.  दिवाळीचे हेच  चित्र जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ऊभं  राहतं  भारतामध्ये प्राचीन काळापासून दिवाळी साजरी केलि जाते पण  दिवाळी अणि फटाके यांच नातं   मात्र तेवढे प्राचीन नाही. फटाक्यांचा शोध ११ व्या  शतकात चीन मध्ये लागला अणि भारतामध्ये १४व्या  शतकाच्या दरम्यान त्यांचा वापर सुरु झाला पण दिवाळीमध्ये  फटाक्यांचा वापर नक्की कधीपासून सुरु केला गेला याची माहिती उपलब्ध नाही.
         दिवाळी अणि फटाके यांच्यातील  नातं  मागील काही  दशकांमध्ये अधिक  दॄढ झाल्याचे जाणवते. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे होणारी हानी ही आधीही होतचं होती पण आता तीची तीव्रता वाढत चालली आहे याचं प्रमुख कारण म्हणजे  निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अणि स्वताचे जीवन अधिक आरामदायी बनविण्यासाठी  माणसाने निसर्गाचा समतोल बिघडवून टाकला  आहे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासांची जाणीव अधिक तीव्र होत  चालली आहे त्यामुळेच  दिवाळी अणि फटाके यावरून लोकं दोन  गटात विभाजीत होताना दिसत आहेत, एक फटाक्यांच्या बाजूने तर दूसरे फटाक्यांच्या विरोधात. 
               फक्त दिवाळीतचं  फटाके उडविली जातात असे नाही अणि प्रदुषण फक्त फटाक्यांमुळेच होते असेही नाही जरी असे  असले तरी दिवाळीतील  फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत होणारी  वाढ ही लक्षणीय असते हे कोणीही नाकरणार नाही, त्यामुळे फटाक्यांचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अनधिकृत फटाक्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली पाहिजे, ठरवून दिलेल्या नियमानुसार फटाक्यांची खरेदी विक्री न करणाऱ्यांवर कड़क करवाई केली  गेली पाहिजे, बऱ्याच संघटना,शाळा, महाविद्यालये  यांनी या विषयासंदर्भात जनजागृति सुरु केली  आहे आणि बऱ्याच लोकांनी स्वतः होऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरी  करायलाही सुरुवात केलि आहे  याची व्याप्ती वाढणे गरजेचे आहे. आपल्या घरातील दिवाळीच्या आनंदाचा प्रकाश  त्यांच्या पर्यंत पोहचवुया  ज्यांची दिवाळी अजूनही अंधारात होते, फटाक्यांच्या क्षणिक अनंदापेक्षा हा आनंद चिरकाल टिकणारा  असेल.
दैनिक लोकमत (५/११/२०१८)

                         फटाक्यांची आतिषबाजी म्हणजे दिवाळी ही मानसिकता बदलली पाहिजे संस्कृति, रूढ़ि, अणि  परंपरा यांच्याशी जो फटाक्यांचा संबंध  जोड़ला जातो तो योग्य नाही.  कालानुरूप जर बदल आत्मसात केले गेले तरच कोणतीही गोष्ट तीचे अस्तित्व टिकवून ठेवू शकते त्यामुळे कालसुसंगत नसलेल्या प्रथा परंपरा जर बदलल्या गेल्या नाहीत तर त्या नामशेष होतील.  भारतीय संस्कृति ही निसर्गाला समृद्ध बनविणारी  आहे त्यामुळे या संस्कृतीतील  सण उत्सवसुद्धा  आपल्याला निसर्गापासून दूर नेणारे नाहीत तर आनखीन जवळ नेणारेच असणार याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे निसर्ग असेल  तर माणसाचे अस्तित्व असेल, माणसाचे अस्तित्व असेल तर धर्म सण उत्सव असतील त्यामुळे पुढील पीढीने उत्सव साजरे करायचे असतील तर निसर्गाची हानी टाळून त्याचे समृद्धीकरण करणे क्रमप्राप्त आहे.
                        






                    

Saturday, October 27, 2018

#ग्लोबल वार्मिंग - एक जटिल जागतिक समस्या.





ग्लोबल वार्मिंगवरती उपाययोजना करून त्याची तीव्रता जर कमी नाही केली तर पृथ्वीचा विनाश हा अटळ आहे. त्यामुळे हे संकट कमी करण्याची पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारीच नव्हे तर कर्त्यव्य आहे. ग्लोबल वार्मिंग वाढण्यामध्ये जसा प्रत्येकाचा वाटा आहे तसाच तो कमी करण्यासाठीही प्रत्येकाने हातभार हा लावलाच पाहिजे. वैद्यानिकांच्या आणि पर्यावरणवादींच्या मते ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाटी मुखत्वे क्लोरोफ्लोरो कार्बोनचे उत्सर्जन कमी करावे लागेल आणि त्यासाटी फ्रीज, एअर कंडीशनर आणि कुलिंगसाठी वापरल्या जाणार्या यंत्रांचा वापर कमी करावा लागेल ज्यातून हा वायू बाहेर पडतो.

            सध्या आपण सगळेच वाढत्या उन्हामुळे त्रस्त झालो आहोत, वरचेवर उन्हाळा आणखीनच असह्य होत चालला आहे. मागच्या काही वर्षापासून उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता वाढतच आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती, शेतकर्यांना करावे लागणारे स्थलांतरण, जनावरांची असहायता अशा गोष्टींमुळे उन्हाळ्याची भयानकता आणखीनच वाढत आहे त्याचबरोबर पावसाळ्यातील पावसाचे सातत्य ही कमी होत चालले आहे ज्यामुळे कधी अतिवृष्टी होते तर कधी अल्पवृष्टी या सगळ्या बदलांमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चलला आहे आणि या सर्वांसाठी आपणच जबाबदार आहोत कारण प्रत्येक उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात आपण तीच तीच चर्चा करतो आणि विसरून जातो. हे सगळे बदल क होतात? त्याची करणे काय आहेत? त्यावर उपाय काय आहेत हे माहिती करण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. जर आपण तसा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल कि, एक भलंमोठं संकट आपल्या समोर उभं आहे. ज्याचं नाव आहे ग्लोबल वार्मिंग.
ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय?
         पृथ्वीच्या वातावरणात उष्णता साचून किंवा अडकून राहण्याची प्रक्रिया म्हणजे ग्रीन हॉउस ईफेकट. विशिष्ट प्रकारच्या गासेसमुळे ही प्रक्रिया घडते, सूर्यप्रकाश वातावरणात प्रवेश करतो, सूर्याकडून मिळणाऱ्या एकूण उर्जेपैकी एक तृतीयांश सौरुउर्जा वातावरणातून आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तत्काळ अवकाशात परत जाते, उर्वरित सौरऊर्जा पृथ्वीचा पृष्ठभाग शोषून घेतो आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वीला ऊब मिळते. पृथ्वी जेव्हा थंड होते तेव्हा ती शोषुन घेतालेली उष्णता वातावरण भेदून परत अवकाशात मिसळते. मात्र पृथ्वीची सर्वच उष्णता परत अवकाशात जात  नाही वातावरणात उपस्थित असलेले कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्ल्रोरो कार्बन  आणि पाण्याची वाफ हे सर्व घटक ही उष्णता अवकाशात जाण्यापासून रोखतात, त्यामुळे ही उष्णता पृथ्वीच्या वातावरणात अडकून पडते आणि परिणामी तापमान वाढते हेच आहे ‘ग्लोबल वार्मिंग’.

ग्लोबल वार्मिंगची कारणे?
    वाढत्या श्हारीकरणामुळे वाढत चाललेली जंगलतोड, अधुनुकीकरणासाठी, विकासासाठी आणि ऐशोरामासाठी होणारा उर्जेचा अतीवापर या गोष्टी ग्लोबल वार्मिंगसाठी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ज्या वेगाने आपण उर्जेची निर्मिती करतोय त्यापेक्षा जास्त वेगाने आपण ती वापरतोय. कोळसा, नैसर्गिक वायू, कच्चे तेल यांची निर्मिती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. उर्जेचे स्त्रोत हे मर्यादित आहेत आणखीन ४० वर्षे उर्जेची निर्मिती करता येईल एवढेच इंधन आता बाकी आहे आपण जे उर्जास्त्रोत वापरत आहोत त्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती शक्य नाही. मोठ्या प्रमाणावरील कोळसा व पेट्रोलचा वापर आणि त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली.
     घन कचरा, लाकूड तेल, नैसर्गिक गॅस  आणि कोळसा आदींच्या ज्वलनातून  कार्बनडाय ऑक्साईडची निर्मिती होते. जैविक कचरा सडला कि त्यातून मिथेन वायू बाहेर पडतो. मिथेन वायू कार्बनडाय ऑक्साईड पेक्षा २० पट घातक आहेऔद्योगिक वसाहतीमधील अनेक प्रक्रीयामधून हा वायू वातावरणात सोडला जातो. क्लोरोफ्लोरो कार्बन हा वायू शीतपेटी(फ्रीज), वातानुकूलन(AC) इ. यंत्रांमधून बाहेर पडतो या वायुमुळे ओझोनचा थर विरळ होऊन साच्छिद्रता वाढण्याचा धोका आहे त्यामुळे सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर पोहचून मनुष्यास त्वचेचा कर्करोग तसेच जनुकीय बदल होतात आणि एकूण तापमानात वाढ होते

ग्लोबल वार्मिंगचे परिणाम
     १९५८ सालापासून ते आजपर्यंत वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडच्या प्रमाणात जवळजवळ ६८ टक्क्यांनी वाढ झाली असून भविष्यकाळात त्यात अधिक वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे पृथ्वीचे तापमान ३-४० अंशाने वाढेल. शेतीवर अनिष्ठ परिणाम होऊन धान्य सामग्री आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर अनेक आवश्यक उत्पादनात घट होईल.
       ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून सागरजल पातळी वाढल्याने किनार्यांचा काही भाग, शेते जलमय होतील. मुंबई, चेन्नई, नुयोर्क, लंडन, टोकियो, फ्लोरिडा व कोलकत्ता या शहरांचा पुष्कळसा भाग समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची भीती आहे. एकीकडे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत आहे तर दुसरीकडे वाळवंटे पसरत चालली आहे, पावसाला ही अनियमित होत चालला आहे, कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी कोरडा दुष्काळ पडतो.

ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचे उपाय 
   वरील सर्व गोष्टींवरून ग्लोबल वार्मिंग हे आपल्यासमोरील किती मोठे संकट आहे हे लक्षात आलेच असेल, ग्लोबल वार्मिंगवरती उपाययोजना करून त्याची तीव्रता जर कमी नाही केली तर पृथ्वीचा विनाश हा अटळ आहे. त्यामुळे हे संकट कमी करण्याची पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारीच नव्हे तर कर्त्यव्य आहे. ग्लोबल वार्मिंग वाढण्यामध्ये जसा प्रत्येकाचा वाटा आहे तसाच तो कमी करण्यासाठीही प्रत्येकाने हातभार हा लावलाच पाहिजे. वैद्यानिकांच्या आणि पर्यावरणवादींच्या मते ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाटी मुखत्वे क्लोरोफ्लोरो कार्बोनचे उत्सर्जन कमी करावे लागेल आणि त्यासाटी फ्रीज, एअर कंडीशनर आणि कुलिंगसाठी वापरल्या जाणार्या यंत्रांचा वापर कमी करावा लागेल ज्यातून हा वायू बाहेर पडतो.
औद्योगिक कारखान्यामधून बाहेर पडणारा धूर आणि वाहनामधून बाहेर पडणारा धूर कार्बनडाय ऑक्साईडचे  प्रमाण वाढवण्यासाठी मुखत्वे जबाबदार आहे त्यामुळे त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कारखान्यांवरती कडक निर्बंध लावायला पाहिजे वाहनाच्या वापरावर आणि त्यातून बाहेर पडणार्या कार्बनडाय ऑक्साईडचवर मर्यादा घालून नियंत्रित करायला पाहिजे.
      सगळ्यात महत्वाचे म्हणजे जंगलतोड थांबवून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे झाडांची संख्या जर वाढली तरच या संकटाची तीव्रता कमी करता येईल.
   वरील उपायांकडे बघून असे वाटेल कि ही तर विकसित राष्ट्रांची, गव्हर्मेंटची, सरकारची जबाबदारी आहे एकट्याने काय होणार? पण प्रत्येकाने जर ठरविले कि शितयंत्राचा वापर गरजेनुपुरताच करेन, वाहनांसाठी कार्बनडाय ऑक्साईडची जी मर्यादा घालून दिलीय त्याचे पालन करेन, वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा जास्त वापर करेन, उर्जेचा अपव्यय  टाळून तिचा काटकसरीने वापर करेन, पारंपारिक (कोळशापासून जी वीजनिर्मिती होते) उर्जेचा वापर कमी करून अपारंपरिक उर्जेचा (सौरऊर्जा, पवनउर्जा, बयोगँस, जलविद्युत इ.) वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेन, वृक्षतोडीला विरोध करेन, जास्तीत जास्त झाडे लावून ते जागवण्याचा प्रयत्न करेन,   तरच पृथ्वीला या संकटापासून वाचवता येईल आणि आणखीन समृद्ध बनवता येईल.

                               

#वासोटा - एक अविस्मरणीय जंगल ट्रेक.

View of vasota fort from boat

 या एकाच वाटेवर आम्हाला चार पाचशे फूट खोल पाण्यावरून जाणाऱ्या बोटीचा थरार, रक्त पिणाऱ्या जळवांच्या भागातून जतानाची भीती आणि  सुरक्षितपणे (हळद, मीठ आणि तंबाखूचे पाणी सोबत घेऊन) तेथून बाहेर पडण्याचा आनंद, प्राण्यांचा वावर असणाऱ्या घनदाट जंगलातुन किल्ल्यावर पोहचण्यासाठी लागणारे धाडस हे एकत्रितरित्या अनुभवता आलं यामुळेचं हा ट्रेक आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय असा होता.

           वासोट्याची पायवाट ही सर्व बाजूने डोंगरांनी वेढलेल्या  पाण्यातून सुरू होते पंधरा किलोमीटर पाण्यातून गेल्यानंतर ती जंगलातल्या पायवाटेला मिळते. जंगलातल्या या पायवाटेवर  रक्त पिणाऱ्या जळवांचा वावर असलेला भाग हा तीन ते चार किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे, त्यानंतर  झाडांच्या गर्दीतून नागमोडी वळणे घेत, मोठ मोठ्या दगड गोट्यातून उभी चढणं घेत ही वाट किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचते, येथून पुढच्या वाटेवर घनदाट जंगलामुळे झाडांची डोक्यावर असलेली छत्री नाहीशी झाल्याचे तीव्रतेने जाणवते, तीव्र चढाईची थकवणारी  वाट  किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जाते.
  या एकाच वाटेवर आम्हाला चार पाचशे फूट खोल पाण्यावरून जाणाऱ्या बोटीचा थरार, रक्त पिणाऱ्या जळवांच्या भागातून जतानाची भीती आणि  सुरक्षितपणे (हळद, मीठ आणि तंबाखूचे पाणी सोबत घेऊन) तेथून बाहेर पडण्याचा आनंद, प्राण्यांचा वावर असणाऱ्या घनदाट जंगलातुन किल्ल्यावर पोहचण्यासाठी लागणारे धाडस हे एकत्रितरित्या अनुभवता आलं यामुळेचं हा ट्रेक आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय असा होता. ढगांशी स्पर्धा करणारी उंचच उंच डोंगरं, दूरच दूर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा त्यामधून  वाट काढणारं कोयनेचं पाणी, हिरव्या गर्द झाडीने व्यापलेली डोंगरांची जमीन असं हे किल्ल्यावरून दिसणारं मनमोहक दृश्य डोळ्यांचे पारणे फेडतात.
       १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला आणि व्याघ्रगड असे त्याचे नामकरण केले. किल्ल्यावरील वास्तूंची बरीच पडझड झाल्यामुळे मंदिर, राजवाडा, बुरुज इ. चे अवशेष दिसतात. किल्ल्यावर असणारं एकमेव बारमाही पाण्याचं टाकं बाबू कड्याकडे जाताना दिसतं यातलं पाणी पिण्यायोग्य आहे बाबुकड्यावरून दिलेल्या आवाजाचे तीन प्रतिध्वनी ऐकू येतात परतीचा प्रवास त्यामानाने कमी कष्टदायक होता. पहाटे पाचला सताऱ्यातून  सुरू झालेला आमचा प्रवास वासोट्याचा जंगल ट्रेक पूर्ण करून  संध्याकाळी पाच वाजता बामणोलीला संपला.हळू हळू सूर्य अस्तकडे चालला होता, सुर्यास्तावेळी पडणाऱ्या तांबड्या क्षितीजाच्या छटा पाण्यामध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. बामणोली येथे कॅम्पिंग करण्यासाठी जागा आहे गावात जेवणाची सोय पण होते आम्हीही येथेच टेंट उभा केला पाणी असलेल्या बाजूला टेंटचा दरवाजा केल्याने सुंदर असा नजारा टेंट मधून पाहता येत होता जेवण झाल्यानंतर शेकोटी पेटवली आणि ट्रेकच्या अविस्मरणीय आठवणीमध्ये सर्वजण  हरवून गेले आणि नंतर एक एक करत झोपी गेले.सिमेंटच्या जंगलापेक्षा या वातावरणात माझे मन जास्त रमते कारण सर्वाना सामावून घेणाऱ्या, सर्वाना सोबत घेणाऱ्या निसर्गाची दिव्यता आणि भव्यता येथे अनुभवता येते (या ट्रेकदारम्यान एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे माणसांचा हस्तक्षेप जिथे कमीत कमी असतो तेथील नैसर्गिक सुंदरता, साधन संपत्ती आणि जैवविविधता अबाधित राहते. या भागात माणसांचा वावर कमी असल्यामुळे विविध प्रकारची झाडे, वेली, पशु, पक्षी, कीटक आपलं अस्तित्व टिकवून आहेत. ते तसेच टिकून राहावं याची जबाबदारी येथे येणाऱ्या प्रत्येकाने घेतली पाहिजे)

starting point of vasota jungle trek