"स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारे भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्व म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. साडेतीनशे वर्षांनंतरही जनमानसात या व्यक्तिमत्वाबद्दलचं आकर्षण अबाधित राहण्याचे कारण म्हणजे स्वराज्याच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी केलेले आत्मबलिदान हे होय."
संभाजी महाराजांचा स्वराज्याप्रतीचा दृष्टिकोन हा शिवाजी महाराजांना जसा
अभिप्रेत होता अगदी तसाच होता. स्वराज्याच्या हितासमोर संभाजी महाराजांनी कशाचीही
पर्वा केली नाही, शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या हिताचा विचार केला. 'राजश्री
आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य' या भावनेनी त्यांनी स्वराज्याचा
राज्यकारभार सांभाळला, त्यांनी स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडील त्रिचनापल्लीच्या
पाषाणकोटापर्यंत आणि उत्तरेकडे बुऱ्हाणपुरापर्यंत वाढवला, स्वराज्याची फौज, आरमार आणि खजिना यामध्ये वाढ केली. सात लाखांची फौज घेऊन जेव्हा औरंगजेब स्वराज्यावर चालून आला तेव्हा धैर्याने आठ वर्षे
त्याच्याशी लढा दिला, स्वराज्यातील एकही महत्वपूर्ण किल्ला औरंगजेबाला मिळू दिला नाही
त्याचदरम्यान आलेल्या प्रचंड दुष्काळाच्या काळातही रयतेकडे दुर्लक्ष होऊ दिले
नाही. दुष्काळाच्या काळातही स्वराज्यातील प्रत्येक किल्ला जास्तीत जास्त काळ लढता
राहावा यासाठी धान्य, दारुगोळा इ. व्यवस्था चोखपणे बजावली त्यामुळेच तर
रामशेज सारखा टेकडीवरील किल्ला घ्यायलाही औरंगजेबाला पाच वर्षे लागली. संभाजी
महाराज एकाचवेळी मोगल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज अशा चार आघाड्यांवरती लढत होते. संभाजी
महाराजांना परकीयांसोबतच आप्तस्वकीयांशी आणि राजद्रोही वतनदाराशी लढावे लागले.
छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र नाटककार, कादंबरीकार आणि काही इतिहासकारांनी विकृत स्वरूपात
मांडले, यासाठी मुख्यतः मल्हारराव रामराव चिटणीसांची बखर
जबाबदार आहे जी त्यांनी शंभूराजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनंतर लिहली आपले पूर्वज
बाळाजी आवजी यांना हत्तीच्या पायी तुडवून मारल्याचा राग या बखरीतून दिसून येतो.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात चुकीची प्रतिमा निर्माण झाली. कारण बहुसंख्य मराठी
माणसं नाटक कादंबऱ्यातुन इतिहास पाहतात व वाचतात आणि त्यामधला इतिहास खरा मानतात.
वा.सी बेंद्रे ,डॉ. कमल
गोखले, जयसिंगराव पवार यांसारख्या इतिहास संशोधकांनी
उपलब्ध कागदपत्रे, पुरावे यांच्या आधारे महाराष्ट्रामध्ये शेदीडशे
वर्षे रूढ असलेली संभाजी महाराजांची विकृत प्रतिमा नष्ट करून पराक्रमी, शूर, मुत्सद्दी, दूरदर्शी व कर्तव्यदक्ष अशी तेजस्वी प्रतिमा जगासमोर
मांडली. ही प्रतिमा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविणे हे प्रत्येक शिवशंभू
अनुयायाचे कर्तव्य आहे.
इतिहास हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहला जातो. तत्कालीन पत्रव्यवहार, बखरी, प्रवास वृंतांत, ताम्रपट इत्यादी गोष्टी ऐतिहासिक साधनात मोडतात पण एकाही तत्कालीन
साधनांमध्ये संभाजी महाराजांनी धर्मासाठी मृत्यू पत्करल्याचे नमूद केलेलं नाही.
त्यामुळे धर्मवीर संभाजी ही महाराजांची प्रतिमा इतिहासाला धरून नाही. औरंगजेबाचा
चरित्रकार साकी मुस्तैदखान हा संभाजी महाराजांना बादशाही छावणीत आणले तेव्हा हजर
होता. औरंजेबाकडून धर्मांतराचा प्रस्ताव मांडला गेला असता तर खात्रीनेच त्याने तसा
उल्लेख आपल्या ग्रंथात केला असता पण त्याच्या ग्रंथात तसा कुठे उल्लेख नाही.
औरंगजेबाने संभाजी महाराजांना राहुल्लाखान या खास
अधिकाऱ्यामार्फत फक्त दोनच प्रश्न विचारले स्वराज्याचा खजिना
कोठे आहे? आणि बादशहाचे कोण कोण सरदार फितूर झालेत? याव्यतिरिक्त कसलेही प्रश्न किंबहुना प्रस्ताव औरंगजेबाने
संभाजी महाराजांसमोर मांडल्याचा उल्लेख नाही. ऐतिहासिक गोष्टी आत्मसात करताना
प्रत्येकाने त्या पडताळून बघणे गरजेचं आहे
संभाजी महाराजांची स्वातंत्र्यवीर, स्वराज्यरक्षक हीच प्रतिमा इतिहासाला धरून आहे
त्यामुळे तीच प्रतिमा सर्वानी स्वीकारली पाहिजे. आज देशाला संभाजी महाराजांच्या
याच स्वातंत्र्यप्रिय आणि स्वाभिमानी विचारांची गरज
आहे. देश सर्वप्रथम ही भावना तयार होण्यासाठी प्रत्येकाने संभाजी महाराजांचे विचार
समजून घेऊन ते कृतीत उतरविणे अत्यावश्यक आहे.