Translate

Sunday, November 29, 2020

#बेडसे_बुद्धिस्ट_लेणी(पुणे)

          


        महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन मान्यता मिळाली असली तरी बेडसे लेणी ही दुर्लक्षितच राहिली आहे. अतिशय सुंदर व सुबक शिल्पकला अणि कोरीवकाम हेच इसवीसनाच्या पाहिल्या शतकातील या वास्तूचे वेगळेपण अधोरेखित करते.परिपूर्ण स्तूप आणि 26 कोरीव स्तंभाने युक्त असे भव्य चैत्यगृह, चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारात उमलत्या कमळाची रचना असणारे  दोन तीस फुटी  भव्यदिव्य रेखीव स्तंभ, बोधीवृक्षाच्या आकाराच्या कमानी असलेले विहार, बाहेरच्या बाजूस अरिहंत भिक्खूच्या स्मरणार्थ बांधलेले छोटे स्तूप आणि कातळात खोदलेल्या पाण्याचे टाके अशी या संपूर्ण लेणीची रचना आहे. लेणी पर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास चारशे दगडी पायर्‍या चढून जावे लागते. 

       लेणीचे नाव (मारकुट), या लेणीचे आणि पाण्याचे टाके याचे धम्मदान कोणी दिले आहे यासंदर्भातील प्राकृत भाषेतील धम्मलिपी मधील एकूण तीन शिलालेख येथे उपलब्ध आहेत. बोरघाट या प्राचीन व्यापारी मार्गावर ही लेणी स्थित आहे. या भागाचे प्राचीन नाव मामडे आहार होते सध्या आपण या भागाला मावळ प्रांत या नावाने ओळखतो. भाजे आणि पाटण लेण्या ज्या डोंगर रांगेत आहेत त्याच डोंगररांगेच्या दक्षिणेला बेडसे लेणी समूह आहे.

      अशा वास्तूंना भेट देताना हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा अनुभवण्याचा आणि आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याची संधीच या वास्तू आपल्याला उपलब्ध करून देतात अशी भावना मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. 

बेडसे लेणी, कामशेत, पुणे. (जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून कामशेत कडून पवना धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावर ही लेणी आहे. लेणीच्या पायथ्या पर्यंत दोनचाकी आणि चारचाकी वाहणे जाऊ शकतात)


पायथ्यापासून लेणीकडे जाणार्‍या पायर्‍या.



विहार किंवा संघाराम( बौद्ध भिक्खूच्या निवासाची जागा )



बाहेरील बाजूस असलेले छोटे स्तूप 


बोधीवृक्षाच्या (पिंपळ)पानाच्या आकाराच्या कमानी

चैत्यगृह











Friday, October 2, 2020

#हाथरस घटना आणि भारतीय



उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराची अमानवीय घटना आणि उपचारादरम्यान पीडितेचा झालेला  मृत्यू  हे  सर्व मन सुन्न करणारं आहे. जिवंतपणी त्या चार नराधमांकडून तर मृत्यनंतर पोलीस आणि  प्रशासनाकडून त्या मुलीच्या शरीराची विटंबना केली गेली आहे. त्या मुलीचा मृतदेह कटुंबीयांच्या स्वाधीन न करता पोलिसांकडून परस्पर अंत्यसंस्कार का केले गेले? उत्तर प्रदेशात पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला जाणाऱ्यांना का अडवलं जात आहे? उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस  काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? या सर्व  गोष्टींमुळे उत्तर प्रदेशात कायदयाचं राज्य अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न  मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

सारे भारतीय माझे बांधव आहेत ही भावना सत्तर वर्षांनंतरही आपण आपल्या देशवासीयांमध्ये उतरवू शकलो नाही ही खरंच खूप खेदाची बाब आहे. भरतीयत्वाच्या भावनेनं जर आपण खऱ्या अर्थाने जोडले गेलो असतो तर अशा घटना आपल्या देशात घडल्याच नसत्या. प्रशासन, पोलीस आणि राजकारण यामध्ये सक्रिय असणारे नीच आणि स्वार्थी मनोवृत्तीचे लोकंच अशी हिंस्र आणि क्रूर श्वापदे जन्माला घालण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्याचबरोबर जोपर्यंत आपल्या घरापर्यंत अशा घटनांची धग पोहचत नाही तोपर्यंत निपचित पडून राहणारा आणि आपल्या जबाबदाऱ्या विसरून स्वयंकेंद्री होत जाणारा समाज ही अशा घटनांसाठी तितकाच जबाबदार आहे. अशा घटना घडल्यानंतर काही दिवसांपुरतं त्वेषाने व्यक्त होणं आणि त्यानंतर सर्व विसरून आपापल्या जीवनात व्यस्त होणं हे आपल्या समाजाच्या अंगवळणी पडलं आहे. मेणबत्ती मार्च, सोशल मीडिया निषेध यांसारख्या गोष्टीं व्यतिरिक्त ठोस आणि परिणामकारक अशा गोष्टी करणे हे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांना आपण निवडून दिले आहे त्या राजकारण्यांना संसदेत, विधिमंडळात यासंबंधी प्रश्न विचारण्यास, सक्षम असे नवे कायदे बनविण्यास आणि कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी भाग पाडले पाहिजे. अशा घटनांमध्ये जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम न करणाऱ्या राजकारणी, पोलीस आणि प्रशकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी सर्व स्तरांतून एकत्रितरीत्या प्रयत्न केले गेले पाहिजेत.( जोपर्यंत अशा लोकांना शिक्षा होत नाही तोपर्यंत देश आणि राज्य पातळीवर जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींना जसे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री मुख्यमंत्री इत्यादींना  करोडोंच्या संख्येने पत्रं लिहली पाहिजेत) 

कुटुंब, समाज, राज्य आणि देशपातळीवर स्त्रीयांप्रति असणाऱ्या संकुचित मानसिकतेत बदल घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. (स्त्रियांना सुरक्षेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनविण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये अशा सर्व स्तरांवर प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे)      

वरील सर्व गोष्टी होण्यासाठी जात, धर्म, वंश, वर्ण, लिंग, भाषा, आर्थिक परिस्थिती, राहणीमान अशा सर्व प्रकारच्या भेदभावाची आणि द्वेषाची भावना नष्ट होऊन प्रत्येक भारतीयामध्ये भरतीयत्वाची भावना निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सरतेशेवटी अशी क्रूर आणि अमानवीय कृत्ये करणारी जनावरं समाजात निर्माण होण्याच्या मुळाशी जाऊन त्यावरती घाव घालणे हीच आपल्या सर्वांची आणि पर्यायाने देशाची प्राथमिकता होणे ही काळाची गरज आहे

Sunday, September 27, 2020

#महामानवाची गौरवगाथा

 


        स्टार प्रवाह या मराठी चॅनेलवर सादर केल्या जाणाऱ्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा" ह्या मालिकेत बाबासाहेबांचा जीवनप्रवास अतिशय उत्कृष्ट पध्दतीने उलगडून दाखविला जात आहे. याआधी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित इंग्रजी, हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत पण मालिका पहिल्यांदाच सुरू केली गेली आहे ज्यामुळे घरारात बाबासाहेबांचे विचार पोहचण्यास आणखीन मदत झाली आहे. सर्वसामान्य लोकांचं वाचनासोबतचं नातं तितकंसं दृढ नसतं त्यामुळे महापुरुषांच्या बाबतीत ऐकीव माहितीवरूनच त्यांची मते बनलेली असतात. अशा परिस्थितीत टेलिव्हिजनचं माध्यम हे खूप प्रभावी ठरतं त्यामुळेच ही मालिका सुरू झाल्याचा विशेष आनंद होतो.

        प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी उपलब्ध झाली पाहिजे ही बाबासाहेबांची सर्वसमावेशक अशी भुमिका या मालिकेच्या माध्यमातून अगदी उत्तमप्रकारे अधोरेखित केली जात आहे. बाबासाहेबांनी खोती पद्धत बंद करून कुळांना ( शेतकऱ्यांना) जमिनीचा मालकी हक्क मिळवून दिला, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून धार्मिक आणि पुरुषी गुलामगिरीतून स्त्रियांची मुक्तता केली त्यांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व अधिकार बहाल केले, दारिद्रय शोषण आणि अज्ञान यातून कामगारांची कायमची सुटका करून त्यांना आपल्या हक्कांप्रति जागृत करून संघटित केले 'स्वतंत्र मजूर पक्ष' या नावाने देशातील कामगारांचा पहिला राजकीय पक्ष स्थापन केला, आदिवासी भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी कमिशन नेमून घटनात्मक संरक्षण मिळण्याची तरतुद केली, वीज आणि पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून आधुनिक भारताचा पाया रचला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विविध धर्म, पंथ, जाती, भाषा, संप्रदाय इ. मध्ये विभागलेल्या लोकांना संविधानाच्या माध्यमातून एकत्र जोडले. या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा मालिकेत अंतर्भाव करून घेतल्यामुळे 'अस्पृश्यांचे उध्दारकर्ते' किंवा 'दलितांचे नेते' अशा संकुचित विचारसरणीत बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला बंदिस्त करण्याचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून जो प्रयत्न केला जात आहे तो हाणून पडण्यास मौलाची मदत होत आहे.

         बाबासाहेबांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाबरोबरच त्यांचे लहानपण, शैक्षणिक प्रवास, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकी याचे जे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे ते अगदी अचूक वाटते. विशेषतः बाबासाहेबांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहिलेले त्यांचे कुटुंब, बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांची दूरदृष्टीता याचे जे चित्रण या मालिकेत केले गेले आहे ते खूप कौतुकास्पद आहे. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे हिमालयाच्या उंचीचे आहे. त्यामुळे मालिकेच्या माध्यमातून ते चित्रित करणे हे खूप मोठे आव्हानच होते पण हे आव्हान या मालिकेची टीम यशस्वीरित्या पेलत आहे अशीच भावना बाबासाहेबांना मानणाऱ्या आणि त्यांच्या विचारांप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या करोडो अनुयायांमध्ये निर्माण झाली असणार हे नक्की. बाबासाहेबांची व्यक्तीरेखा साकारताना अभिनेते सागर देशमुख यांनी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. तसेच लेखकाने घेतलेले परिश्रमही अचूकपणे अधोरेखित होतात. या मालिकेशी संबंधित प्रत्येक सदस्याचे योगदान हे अतिशय महत्वपूर्ण असे आहे त्यामुळे या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या गौरवगाथेचे साक्षीदार होण्याची जी करोडो लोकांना संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी स्टार प्रवाह आणि टीमला कोटी कोटी धन्यवाद.

         मी आणि माझे कुटुंबीय या मालिकेचे नियमित दर्शक आहोत. सर्वांनी ही मालिका पहावी आणि याच्या प्रचार प्रसारासाठी योगदान द्यावे ही विनांती.

        


Friday, September 25, 2020

#ऑक्टोबर मधील आकाश

       


           सध्या रात्रीच्यावेळी आकाशात मंगळ, गुरू शनि  आणि शुक्र हे ग्रह अगदी ठळकपणे दिसत आहे. दक्षिणपूर्व दिशेला रात्री आठच्या पुढे मंगळ दिसायला सुरू होतो. दिशा जरी नाही कळली तरी आकाशातील सर्वात प्रकाशमान आणि आकाराने मोठी तांबडी चांदणी म्हणजे मंगळ ग्रह असेही ओळखता येते. रात्री  बारा ते एक च्या दरम्यान तर मंगळ अगदी आपल्या डोक्यावर दिसून येतो, सकाळी आठ पर्यंत त्याचे अस्तित्व आपल्याला पाहता येते. याचबरोबर गुरू आणि शनि ही सध्या लगेच ओळखता येतात. चंद्राच्या मागे सरळ रेषेत एक  आकाराने मोठी आणि त्याच्या लगेच मागे आकाराने थोडी छोटी अशा दोन ज्या ठळकपणे चांदण्या दिसतात त्या म्हणजे गुरू आणि शनि ग्रह. मोठा आणि जास्त प्रकाशमान असणारा ग्रह म्हणजे गुरू. हे दोन्ही ग्रह जोडीने असल्यामुळे पटकण ओळखता येतात. रात्री 8 ते 9 च्या दरम्यान साऊथ वेस्ट डायरेक्शन मध्ये यांची उपस्थिती अगदी स्पष्टपणे दिसून येते. आणि पहाटेच्यावेळी  पूर्व दिशेला शुक्रतारा आकाशात आपले लक्ष वेधून घेतो.




          उगवताना, मध्यावर आणि मावळताना या ग्रहांना पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. तसेच अंधार पडायला सुरुवात झाल्यानंतर, अंधाऱ्या रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी जे आकाशात या ग्रहांची जी विविध दृश्यं पाहायला मिळतात ती खरंच अप्रतिम आहेत. जसे जसे तुम्ही ग्रह ताऱ्यांविषयी अधिकाधिक जाणून घेत जाता तसे तसे आकाशाशी एक प्रकारे जोडले जात असल्याचा आणि आकाशाशी जे नाते आहे ते दृढ होत असल्याचा अनुभव येतो.

      तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आकाशातील ग्रह तारे आणि आपल्या मधील अंतर हे एकदम कमी होत आहे. रात्रीचे आकाश कसे दिसेल किंवा विविध ग्रह ताऱ्यांची लोकेशन माहिती करून घेणे हे विविध अँप आणि वेबसाईटमुळे अतिशय सोपे झाले आहे.

खालील वेबसाइटवर ग्रह तारे सूर्यग्रहण चंद्रग्रहण याविषयीची सर्व माहिती दिली आहे तसेच रात्रीचं आकाश लाईव्ह पाहण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

timeanddate.com/astronomy/night/india/solapur

Thursday, July 30, 2020

नवे शैक्षणिक धोरण - २०१९

   

     २९/७/२०२० रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशाचे नवे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डॉ. कंस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. ३४ वर्षानंतर शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत. शालेय शिक्षणासोबतच उच्च शिक्षणातही आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. नक्की कोणते कोणते बदल या नव्या शैक्षणिक धोरणात केले गेले आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.

१०+२ पॅटर्न रद्द - नव्या धोरणानुसार १०+२ हा पॅटर्न रद्द करून  ५+३+३+४ हा नवीन पॅटर्न लागू करण्यात येईल. तीन वर्षाच्या अंगणवाडी शिक्षणासोबत बारा वर्षाच्या शालेय शिक्षणाचा यात समावेश असेल. पहिल्या टप्प्यात म्हणजेच पहिल्या पाच वर्षात पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरीचे शिक्षण देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण असेल.
तिसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवीपर्यंतचे शिक्षण असेल.
चौथ्या टप्प्यात उर्वरित चार वर्षम्हणजे नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण असेल. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे महत्व कमी करण्यात आले आहे.

मातृभाषेतून शिक्षण - सुरुवातीचे शालेय शिक्षण म्हणजेच पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. 

व्यावसायिक शिक्षणाचा समावेश - सहावीपासून व्यवसायिक शिक्षणाच्या विषयांचा समावेश अभ्यासक्रमात केला जाईल. सहावी ते आठवी दरम्यान व्यवसायिक कौशल्ये आणि कलाकुसर याविषयी संपूर्ण एक वर्षाचा सर्वेक्षण कोर्स करावा लागेल. इयत्ता नववी ते बारावीमधील मुलांना पारंपरिक शैक्षणिक विषयांसोबतच व्यवसायिक विषयांची निवड करण्याची संधी असेल.

लवचिक आभ्यासक्रम - नववी ते बारावीमध्ये शिक्षणासाठी कोणतीही एक शाखा नसेल तर विद्यार्थ्यांना विविध विषय निवडण्याची संधी असणार आहे. कला व विज्ञान किंवा व्यावसायिक व शैक्षणिक असा स्पष्ट भेद नसेल. कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा अशा विविध विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल.
महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन शाखा प्रवेश प्रक्रियेत आहेत. पण नवीन मसुद्यानुसार कला आणि विज्ञान या शाखांमधले काही विषय निवडून विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. यामध्ये मानवी शिक्षण, विज्ञान, कला, स्पोर्ट्स, वोकेशनल कोर्स असे पर्याय असतील. एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा अधिक काळानंतर दुसरा अभ्यासक्रम घ्यायचा असल्यास तसे करता येईल (तो अभ्यासक्रम जेवढा पूर्ण केलेला असेल तेवढे क्रेडिट ग्राह्य धरून दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल) विषय जरी विविध निवडले असेले तरी पदवी त्या मुख्य शाखेचीच दिली जाईल.

तिहेरी मूल्यांकन - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं तिहेरी रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे. विद्यार्थी स्वत:चं मूल्यांकन करणार, याशिवाय त्याचे मित्रही आणि शिक्षकही मूल्यांकन करणार. रिपोर्ट कार्डमध्ये विद्यार्थी, वर्गमित्र आणि शिक्षक यांचाही शेरा असणार आहे. शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थी काय शिकला याचाही उल्लेख रिपोर्ट कार्डमध्ये केला जाणार. मूल्यांकनासठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

उच्चशिक्षण विषयक बदल - संशोधनासाठी चार वर्षांचा पदवी कालावधी आणि जे नौकरी करू इच्छितात त्यांना तीन वर्षांचा कालावधी. संशोधनासाठी एक वर्षाचयस एमएसह चार वर्षाचा पदवी कालावधी पूर्ण केल्यावर पीएचडी करता येईल.

एम फीलची डिग्री कायमची बंद होणार, एमफीलची डिग्री न घेता पीएचडी करता येणार.

पाली, पर्शियन आणि प्राकृतसाठी भाषेसाठी विशेष सोय- स्वतंत्र संस्था उभी केली जाणार.

स्थानिक आठ भाषांमध्ये ई-कोर्सेस विकसित केले जाणार आहेत. व्ह्रर्च्यूअल लॅबदेखील तयार करण्यात येणार असून राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (NETF) निर्माण केला जाणार आहे.

खासगी आणि सार्वजनिक उच्च शिक्षण संस्थांना समान नियम लागू होणार. राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्याची शिफारस.

देशात ४५ हजाराहून अधिक महाविद्यालय आहेत. त्यांना ग्रेड देण्यासाठी उच्च शिक्षण नियामक अशी एकच संस्था संपूर्ण देशासाठी स्थापन करण्यात येईल.

शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण - शिक्षकाांना वारांवार प्रशिक्षण देऊन त्याांचे ज्ञान व कौशल्य अद्ययावत ठेवणे, शैक्षणिकदृष्ट्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटाांमधील किंवा वंचित गटाांमधील शिक्षकाांच्या भरतीसाठी पर्यायी मार्ग खुले करणे. छळ, धमक्या व लिंग आधारित हिंसा याविषयी उपाययोजना करणारी यंत्रणा प्रस्थापित करून सर्वसमावेशक शालेय वातावरण निर्माण करणे, बहिष्कार टाकण्याच्या कृती बंद पाडणे. सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाांमध्ये सुधारणा करणे.

          काळानुसार शिक्षणपद्धतीत बदल होत राहिले तरच एक गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली अस्तित्वात येऊ शकते. 
आधुनिक काळाला साजेशे बदल या नव्या शैक्षणिक धोरणात केले गेले आहेत. या धोरणाची परिणामकारकता ही याच्या अंमलबजावणी वरच अवलंबून आहे. तसेच यासाठी शिक्षकांच्या मानसिकतेत बदल घडविणे ही अत्यावश्यक ठरते. भारतातील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या आणि पायाभूत सुविधांच्या परस्थितीत आमूलाग्र सुधारणा करणे या नव्या शैक्षणिक धोरणासामोरल सर्वात मोठे आव्हान असेल. सरकारी शाळा आणि महाविद्यलयांची निर्मिती, प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांला परवडेल आणि उपलब्ध होईल असे उच्च शिक्षण, शिक्षणाच्या अधिकाधिक खासगीकरणास विरोध आणि शैक्षणिक संस्थाचं मूल्यमापन स्वतः संस्थांनी करणे इ. गोष्टींवरून या नव्या  धोरणावर टीका होत आहे याची सरकारने दखल घेऊन यात योग्य ती सुधारणा करून या शैक्षणिक धोरणाच्या सक्षमीकरणास प्राधान्य दिले पाहिजे.





Tuesday, July 21, 2020

#आम्ही भारताचे लोक.....

       

   
      देशातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून भारतीय संविधानाची रचना केली गेली आहे त्यामुळेच आम्ही भारताचे लोक या वाक्याने भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची सुरुवात होते. संवैधानिक मूल्यांमुळे जी राष्ट्रीयत्वाची भावना नागरिकांमध्ये रुजवली जाते त्याआधारेच राष्ट्रामध्ये कोणत्याही संकटाला तोंड देण्याची क्षमता निर्माण होते. कोरोना सारख्या महामारीविरोधात आज आपला देश ज्या एकजुटीने लढतो आहे तो भारतीय संविधानाने केलेल्या भरतीयत्वाच्या संस्काराचाच परिणाम आहे. असे असताना कोरोनाचेच कारण पुढे करत शैक्षणिक अभ्यासक्रमातील संविधानाचा पाया कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
         मागच्या पंधरवड्यात सीबीएसई  बोर्डाने लॉकडाउनचे कारण पुढे करत नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या आभ्यासक्रमातील ३०% भाग या  वगळण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये प्रामुख्याने संविधान विषयक आभ्यासक्रमाचा समावेश आहे. स्वतःहून स्वतःचा आत्मघात करून घेण्याचा हा प्रकार आहे. विविध जाती, धर्म, प्रांत, भाषा, संप्रदाय इ. मध्ये विभागलेल्या लोकांना संविधानाने एकत्र जोडले आहे. संविधान हाच आपल्या राष्ट्राचा पायाभूत आधार आहे. हा आधारच जर कोसळला तर आपल्या राष्ट्राचे अस्तित्वच नष्ट होईल. अशा आत्मघातकी निर्णयाच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. मुळातच हे असे का केले जाते आणि अशा राष्ट्रविरोधी निर्णयास शासनस्तरावरच का रोखलं जात नाही हे प्रश्न महत्वाचे ठरतात.
        याआधीही संविधान विरोधी कृत्ये केली गेली आहेत अशा कृत्यांमुळे संविधान विरोधी घटक हे आजही आपल्या देशात विविध स्तरांवर कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा घटकांना रोखणे ही देशाची प्राथमिकता असली पाहिजे.  संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. आणि संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी देशहिताला प्राधान्य देणारे नागरिक संसदेत पाठविणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
        देशहिताला प्राधान्य देणारे नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांवर विद्यार्थी दशेतच संवैधानिक मूल्यांचे संस्कार होणे  अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये संविधानाचा आभ्यासक्रम अनिवार्य केला जाणे ही देशाची गरज आहे. आम्ही भारताचे लोक या विचारसरणीमुळेच भारतात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकते हे प्रत्येकाने ध्यानात घेणे अत्यंत जरुरीचे आहे.

नेमकं काय वगळण्यात आलं?
             नववीच्या  सामाजिकशास्त्र या विषयातून लोकशाहीतील नागरी अधिकारांचा संपूर्ण भाग, दहावीच्या याच विषयातील लोकशाही आणि विविधता, लैगिक-धार्मिक चळवळी आणि आंदोलने, वने आणि वन्यजीव हा भाग, अकरावीच्या राज्यशास्त्र या विषयातून संघराज्यपद्धती, स्थानिक प्रशासन, स्वराज्य संस्थांचा विकास, नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद हे घटक आणि बारावीच्या समाजशास्त्र या विषयातील भारतीय लोकशाही, जागतिकीकरण, सामाजिक बदल हा भाग तर राज्यशास्त्राच्या विषयातून सामाजिक चळवळी, धार्मिक भावना हे घटक वगळण्यात आले आहेत. 

संदर्भ - डॉ. गणेश देवी यांचा दिव्यमराठी 'रसिक' मध्ये प्रकाशित झालेला लेख. " संविधानाचा सूर्य असाच उजळत राहावा..." 

Wednesday, July 15, 2020

EIA2020 - पर्यावरण विरोधी ड्राफ्ट


(Image is downloaded from thehindu.com)
   
दैनिक दिव्यमराठी मधुरीमा 28/7/2020
    समृद्ध अशा पर्यावरणाचा आणि जैवविविधतेचा वारसा आपल्या देशाला लाभला आहे. भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीमुळे जगभरात भारताची वेगळी ओळख आहे. पण ही ओळख हळू हळू पुसट होत चालली आहे कारण विकासाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली पर्यावरणाची लूट केली जात आहे. जंगलेच्या जंगले नष्ट केली जात आहेत, नदी पात्रांवर अतिक्रमणे केली जात आहेत, डोंगर दऱ्या नष्ट केले जात आहेत, समुद्रातील जीवसृष्टी नष्ट केली जात आहे. असेच जर सुरू राहीले तर एक दिवस भारताला लाभलेला हा पर्यावरणाचा समृद्ध वारसा लुप्त होऊन जाईल आणि भारताच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. हे जर टाळायचे असेल तर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन युद्धपातळीवर होणे अत्यंत गरजेचे आहे.
        पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जसे जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत तसेच ते  देशपातळीवरही केले जात आहेत. भारतात यासाठी स्वतंत्र मंत्रालय अस्तित्वात आहे, विशेष कायदे केले आहेत. असे असले तरी या कायद्यांची अंमलबजावणी मात्र काटेकोरपणे होताना दिसत नाही. सद्यस्थितीत पर्यावरण विषयक कायदे आणखीन कठोर करण्याची गरज असताना सरकारी पातळीवर त्याला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. इन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट (EIA)  ड्राफ्ट 2020 हे याचेच एक उत्तम उदाहरण आहे.
         EIA (पर्यावरण प्रभाव मूल्यांकन) ही पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८ अंतर्गत एक प्रक्रिया आहे जी औद्योगिक व पायाभूत प्रकल्पांना योग्य देखरेखीशिवाय मंजूर होण्यास प्रतिबंधित करते. प्रत्येक प्रकल्पाला या ईआयए प्रक्रियेनंतरच परवानगी दिली जाईल हे सुनिश्चित केले जाते. ईआयएमध्ये कोळसा किंवा अन्य खनिजांच्या खाणकाम, पायाभूत सुविधा विकास, औष्णिक, अणु आणि जल विद्युत प्रकल्प, रिअल इस्टेट आणि अन्य औद्योगिक प्रकल्प यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामाच्या आधारे प्रकल्पांचे मूल्यांकन केले जाते. मूल्यांकनांच्या आधारावर, त्यांना तज्ञांच्या पॅनेलद्वारे पर्यावरणीय परवानगी मंजूर केली जाते किंवा नाकारली जाते.
          सरकारने ईआयए या प्रक्रियेत बदल करून  ईआयए 2020 हा मसुदा तयार केला आहे. पर्यावरण कायद्याला कमकुवत करणारे हे बदल आहेत त्यामुळे या नव्या पर्यावरण विरोधी ड्राफ्टला सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. मोठ्या प्रमाणात केले जाणारे पर्यावरणीय उल्लंघन नियमित करण्याची ही युक्ती आहे असे तज्ञांचे मत आहे. खालील गोष्टींच्या सामावेशामुळे हा ड्राफ्ट पर्यावरण विरोधी ठरत आहे.
१) Post-Facto Clearance :  आधीच्या प्रक्रियानुसार ईआयएची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाला परवानगी मिळू शकत नव्हती पण ईआयएच्या या नवीन मसुद्यानुसार २०२० नंतरच्या पोस्ट क्लिअरन्सला परवानगी देता येते. याचा अर्थ असा की एखाद्या प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी नाही मिळाली तरी, तो नवीन ईआयए 2020 च्या मसुद्यानुसार कार्यवाही करू शकेल.
२) Public Hearing Reduced to 20 days : ज्या भागात प्रकल्प सुरू होणार आहे तेथील लोकांना प्रकल्पाच्या परिणामाबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी आधी तीस दिवसांचा कालावधी दिला जात होता जो की आधीच कमी होता आता नव्या ईआयए 2020 च्या मसुद्यानुसार तो कालावधी वीस दिवसांचा केला आहे. ( सुप्रीम कोर्टानेही या बदलास विरोध दर्शविला आहे)
३) Exemptions from public participation : प्रकल्प सुरू झाल्यानंतर जर पर्यावरण विषयक नियमांचे उल्लंघन केले जात असेल तर जनतेला त्याबाबतीत काहीच करता येणार नाही फक्त स्वतः कंपनी किंवा गव्हर्नमेंट त्याबाबतीत पॉईंट आऊट करू शकते.
४) Strategic exemptions : देशाच्या सुरक्षा संदर्भातील प्रकल्प विषयक माहिती लोकांना दिली जाणार नाही हे आधीच्या प्रक्रियेमध्ये होत जे बरोबरच होतं पण आता नव्या मसुद्यानुसार सरकार ज्या प्रकल्पाला स्ट्रॅटेजीक घोषित करेल मग त्या प्रकल्पाची माहिती संवेदनशील असो किंवा नसो त्याबाबतची कसलीच माहिती जनतेला दिली जाणार नाही.
५) Additional exemptions from Public consultation
          ईआयए 2020 हा अजून मसुदा आहे तो कायद्यात रुपांतरीत झालेला नाही या मसुद्याला कायद्यात रुपांतरीत होण्यापासून वाचवायचे असल्यास या मसुद्यातील त्रुटी सरकारच्या निदर्शनास आणून देणे आणि यात सुधारणा सुचविणे अत्यंत आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाच्या दबावानंतर सरकारने आक्षेप नोंदविण्याचा कालावधी वाढवून दिला आहे जो 31 ऑगस्ट 2020 पर्यंत आहे. पुढील ई-मेल आयडीवर आपण आपले आक्षेप सरकारपर्यंत पोहचवू शकता
 eia2020-moefcc@gov.in
       पर्यावरणाचा ऱ्हास होणं ही संपूर्ण देशासाठी धोकादायक अशी गोष्ट आहे त्यामुळे सर्वांनी अंतर्गत मतभेद विसरून एकत्र येऊन याबाबतीत आवाज उठविणे अत्यंत गरजेचे आहे.  सर्व भारतीयांनी मिळून जर या ड्राफ्टचा विरोध केला तर सरकारला हा ड्राफ्ट माघे घेण्यावाचून काही पर्यायच उरणार नाही. 


[EIA2020 हा संपूर्ण draft वाचण्यासाठी लिंक - Read EIA 2020draft

EIA 2020 या ड्राफ्टला विरोध दर्शविण्यासाठी पिटीशन साईन करण्याची लिंक - http://chng.it/9Q8FZnnq

ज्यांना मेल करण्यासाठी अडचण येत आहे त्यांना आम्ही तयार केलेल्या खलील मेलचा फॉरमॅट डायरेक्ट कॉपी पेस्ट करून मेल करता येईल किंवा गरज वाटल्यास आवश्यक बदल करून  मेल करता येईल👇👇(sample mail)

Subject - NEW EIA 2020 DRAFT CONCERNS AND SUGGESTIONS

To

The MINISTRY OF ENVIRONMENT, FOREST AND CLIMATE CHANGE
GOVERNMENT OF INDIA


It’s much needed draft, EIA 2020 will lookout for ecology, sensitivity and fragility of the environment.
But even with the frailties, the EIA process is essential. Especially, as it gives a chance to the local population to weigh in on the project and express their misgivings.


Would like to raise important concerns that i found after reading the draft,

1) Post Facto Clearance :- It's like an open play ground for Environmental MAFIA to find loopholes for their projects.

2) Public Hearing :- No need to reduce Public Hearing time instead of such draft should be circulated through all respective social media as many good citizens not aware of such hearings.

3) Strategic & National Security Project :- This project needs to be examine precisely as we are aware such thing doesn't need to publish out.

4) Action :- There are several project which already damaged our environment drastically, need strict action on that to avoid future instances.

Kindly requesting to review highlighted concerns for the Greener & brighter INDIA.


Thanks & Regards,

This mail format is prepared by rohan khandare

  • माहिती उपयुक्त वाटली तर जास्तीत जास्त लोकांसोबत हा ब्लॉग शेयर करा आणि मेल किंवा पिटीशन साईन केलेलं कंमेंट मध्ये नक्की कळवा]




       
     
     
       
        

Friday, July 10, 2020

#राजगृह आणि भारतीय समाज

Image is downloaded from maharashtratimes.com

बाबासाहेबांचे राजगृह येथील छायाचित्र
(Image is downloaded from wikipedia.org)
 

        ७ जुलै २०२० रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई (दादर) येथील निवासस्थान राजगृहवरती हल्ला केला. या वास्तूच्या परिसरातील वस्तूंची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला गेला. सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला गेला. राजकीय वर्तुळातूनही निषेध व्यक्त केला गेला. सरकारने तातडीने यावर कारवाई करीत दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे चौकशी सुरू आहे लवकरच सर्व गोष्टींचा खुलासा होईल. आता राजगृहवर चोवीस तास पोलीस बंदोबस्त पण ठेवण्यात आला आहे.

         राजगृह ही वास्तू बाबासाहेबांनी १९३० मध्ये बांधली होती. १९३४ ते १९५६ हा काळ बाबासाहेब राजगृह येथे राहिले. पुस्तकांचे व्यवस्थित जतन करता यावे आणि वाचन करता यावे यासाठी बाबासाहेबांनी ही वास्तू बांधली होती. जवळपास ५०००० पुस्तकांची ग्रंथसंपदा या वास्तूमध्ये बाबासाहेबांनी जतन केली होती. बाबासाहेबांच्या ज्ञानार्जनाच्या आणि ज्ञान निर्मितीच्या ध्यासाची ही वास्तू साक्षीदार आहे. या वास्तूला बाबासाहेबांच्या विचारांचा आणि सहवासाचा प्रदीर्घ वारसा लाभला आहे. त्यामुळे फक्त भारतातीलच नव्हे तर तमाम जगातील आंबेडकरी अनुयायांचे हे प्रेरणास्थान आहे.

       राजगृह या वास्तूवरील हल्ला हा खरंतर भारतीय अस्मितेवरील हल्ला आहे. त्यामुळे सर्वच भरतीयांकडून त्याचा निषेध व्यक्त केला गेला पाहिजे होता पण तसे होताना दिसत नाही कारण अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाबद्दल अनेकांच्या मनात अढी आहे. जातीयतेच्या मानसिकतेतुन बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला एका समाजापूरतेच मर्यादित करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित होत आहे. मनातील जातीयतेची जळमटे दूर करून ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता प्रत्येकाने स्वतः महापुरुषांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे ही भारतीय समाजाची गरज बनली आहे.

         बाबासाहेबांना प्रज्ञासूर्याची उपमा दिली जाते. प्रज्ञासूर्य म्हणजे ज्ञानाचा सूर्य. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश कसलाही भेदभाव न करता संपूर्ण सृष्टीला आपल्या प्रकाशाने उजळून टाकतो त्याप्रमाणेच बाबासाहेब या प्रज्ञासूर्याचा  ज्ञानरुपी प्रकाशसुद्धा कसलाही भेदभाव न बाळगता संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराचे कार्य करतो. बाबासाहेबांनी भारतातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाची तरतूद संविधानाच्या माध्यमातून केली आहे. जातीवर आधारित श्रेष्ठत्व नाकारून गुणवत्ता सिद्ध करण्याची सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी फक्त  जाती धर्मावर आधारित भेदभावच नाकारले नाहीत तर स्त्री, पुरुष, काळा गोरा, गरीब श्रीमंत असे सर्व प्रकारचे भेदभाव नाकारून वैश्विक मूल्यांची जोपासना केली. त्यामुळेच मानवी मूल्यांना सर्वोच्च  स्थान देणारे सर्वश्रेष्ठ संविधान अशी भारतीय संविधानाची जगात ओळख आहे.
           संविधान निर्मितीच्या आधीही बाबासाहेबांनी अस्पृश्यांसोबतच शेतकरी, स्त्रिया, कामगार, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त, आदिवासी या सर्वांसाठीही भरीव असे कार्य केले आहे. असे असले तरी जेव्हा राजगृह सारखी घटना घडते तेव्हा फक्त अस्पृश्य समाजच (त्यातलेही फक्त काहीच घटक) याविरोधात उभा राहतो. शेतकरी, स्त्रिया, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त, आदिवासी हे सर्व याबाबतीत शांत राहणेच पसंत करतात. सामाजिक बंधुभाव बळकट होण्यासाठी समाजातील घटकांनी एकमेकांसाठी उभे राहणे गरजेचे असते.  बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली एक व्यक्ती एक मूल्य यावर आधारित विषमतामुक्त सामाजिक लोकशाही देशात प्रस्थापित करण्यासाठी देशातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजाच्या एका घटकाने कितीही प्रयत्न केले तरी हे शक्य होणार नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
          वरील सर्व गोष्टी मांडण्याचा उद्देश हा बाबासाहेबांच्या कार्याप्रति कृतज्ञ नसणाऱ्यांबद्दल द्वेष पसरविणे किंवा त्यांना अधोरेखित करणे हा नसून सामाजिक बांधिलकीची जीवनदृष्टी देणाऱ्या आंबेडकरी विचारांनी सर्व घटकांना जोडणे हा आहे. आंबेडकरी विचार हा भरतीयत्वाची जाणीव आणखीन दृढ करणारा आहे. जेव्हा भारतीयात्वाची जाणीव इतर सर्व जाणिवांपेक्षा अधिक बळकट होईल तेव्हाच संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल. आणि जेव्हा संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल तेव्हाच सर्वार्थाने आपला देश समृद्ध होईल.


बाबासाहेबांचे राजगृह येथील छायाचित्र
(image is downloaded from wikipedia.org)

     
     
     
       

     
     

Sunday, July 5, 2020

#ज्ञानाचा प्रथम उपदेश

     
    

आपल्याला जे सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले आहे त्याचा उपयोग मानवी जीवनाच्या कल्याणासाठी करण्याचा निर्णय घेऊन तथागतांनी २६०० वर्षापूर्वी सारनाथ येथे आपल्या पाच सहकाऱ्यांना प्रथम उपदेश केला. ज्ञान प्रसाराची सुरुवात याच दिवशी म्हणजे आषाढ पूर्णिमेला केली होती. धम्माचे म्हणजेच ज्ञानाचे चक्र तथागतांनी याच दिवशी प्रवर्तित (गतिमान)केले म्हणून या दिवसाला प्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात. बुद्धाने गतिमान केलेले धम्मचक्र आजही संपूर्ण जगात फिरत आहे.
          सिद्धार्थ गौतमाला अनेक प्रयोगानंतर स्वप्रयत्नाने बोधी (ज्ञान) प्राप्त झाली. या प्रक्रियेत त्यांना जी सत्ये गवसली त्यांचा त्यांनी धम्म बनविला. पण या धम्माचा उपदेश करावा की नाही याबाबतीत त्यांचे मन द्विधा मनःस्थितीत होते. कारण आपल्याला जे सत्य गवसले आहे ते लोकांना समजेल का? त्यांना ते रुचेल का? तृष्णा, आसक्ती आणि स्वार्थ यापासून मुक्त होऊन ते या सत्याला आत्मसात करतील का? असे प्रश्न  त्यांच्या मनात उपस्थित होत होते. त्यामुळेच ज्ञानप्राप्ती नंतर लगेच त्यांनी उपदेश केला नाही. 
          ज्ञान प्राप्त केल्यानंतर बुद्धांनी सुमारे सहा आठवडे उरुवेलाच्या परिसरात चिंतन केले. याकाळात त्यांनी प्राप्त झालेले ज्ञान विविध कसोट्यांवर तपासून पाहिले, लोक आपल्या विचारांचे कसे स्वागत करतील, आपल्याला कसा प्रतिसाद देतील यांसारख्या गोष्टींवर सखोल विचार केला. आणि शेवटी आपल्याला प्राप्त झालेले कल्याणकारी ज्ञान  आपल्याजवळच न ठेवता ते इतरांना दिले पाहिजे ते आपले कर्तव्यच आहे असा निर्णय त्यांनी घेतला. अलार कालाम आणि उदक रामपुत्त हयात नसल्याने तपश्चर्या करताना सोबत असलेल्या पाच सहकाऱ्यांना प्रथम उपदेश करण्याचे त्यांनी ठरविले.
         प्रथम उपदेशात गौतम बुद्धांनी चार आर्य सत्ये सांगितली, जगात दुःख आहे दुःखाला कारण आहे, दुःखा नष्ट करता येते, आणि दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे. अष्टांगिक मार्ग हाच दुःख निवारण्याचा मार्ग आहे. अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे म्हणजेच मध्यम मार्गाचा अवलंब करणे. ऐकीव माहितीवरून, कल्पनेने अथवा निराधार  तर्काने आपण कुठलीही गोष्ट सांगत नाही, स्वानुभवाच्या कसोटीवर घासून पुसून घेतलेली गोष्टच सांगत आहोत असे त्यांनी त्या पाच जणांना सांगितले.
         

Saturday, July 4, 2020

स्वामी विवेकानंद यांचे स्त्रीविषयक विचार


       पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. ज्या समाजात स्त्रियांना समान हक्क मिळणार नाहीत, तो समाज उभा राहूच शकणार नाही, असे सांगणाऱ्या विवेकानंदांनी अमेरिकेत पोचल्यावर आपल्या शिष्यांना पत्र पाठवून कळवले, ‘अमेरिका समृद्ध आणि प्रगत आहे. कारण येथील स्त्रिया मुक्त आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून निर्भयपणे उभ्या आहेत. त्या साक्षात जगदंबा आहेत. मी जर मृत्यूपूर्वी अशा १०० स्त्रिया भारतात निर्माण करू शकलो, तर मी सुखाने मरेन.’ आणि हे जमणार नाही, हे लक्षात आल्यावर मार्गारेट नोबेलला म्हणजे भगिनी निवेदितांना पत्र पाठवून त्यांनी लिहिले, ‘स्त्रियांच्यामध्ये जाऊन, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन, त्यांना मदत व मार्गदर्शन करण्याचे काम फक्त स्त्रियाच करू शकतील. आज हे काम करू शकणाऱ्या स्त्रिया मला भारतात दिसत नाहीत. त्यामुळे असे काम करण्यासाठी आज मी अमेरिकेकडून असे काम करण्यासाठी स्त्रिया उसन्या घेत आहे. तू व ख्रिस्तीन यांनी येथे येऊन हे काम सुरू करा.’

       स्त्री समानता म्हणजे काय हे विवेकानंद अनेकदा रेखांकित करतात. रजस्वलेने मंदिरात जाऊ नये, म्हणून सांगत आजही धर्ममार्तंड उभे आहेत. विवेकानंद खूप पुढे गेलेत. ते पत्रातून आपल्या शिष्यांना विचारतात, ‘दक्षिणेश्वरच्या मंदिरात तुम्ही वेश्यांना प्रवेश देत नाही, हा भयावह प्रकार आहे. मग वेश्येकडे जाणाऱ्या पुरुषांचे काय करणार? देवी, आई, बहीण, गृहलक्ष्मी आणि मुलगी या रूपांत असलेली स्त्री कधीच अपवित्र नसते. काही अपवित्र पुरुष तिला अपवित्र बनविण्याचा प्रयत्न करून बघतात एवढेच काय ते! मंदिर सर्वासाठी आहे. थकलेल्या, भागलेल्या, पीडित बनलेल्या या आपल्या अभागी बहिणींना तर देवाच्या आधाराची अधिक गरज आहे. त्यांच्यासाठी मंदिरे मोकळी करा आणि ते जमत नसेल तर मंदिराला कुलूप लावून मोकळे व्हा!’

लोकसत्ता संपादकीय लेख(२०१३) -  दत्तप्रसाद दाभोलकर.

Tuesday, June 30, 2020

#चिनची व्यपारातील मक्तेदारी आणि भारत

 
Image is downloaded from indiatvnews.com

परकीय व्यापारात वाढ झाली की जीडीपी मध्येही वाढ होते आणि जीडीपी मध्ये वाढ झाली की देशाची अर्थव्यवस्था  मजबूत होण्यास मदत मिळते त्यामुळे सर्वच राष्ट्रे परकीय व्यापाराला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असतात पण काही राष्ट्रे या व्यपराच्या माध्यमातून इतर देशांना नियंत्रित करण्याचा आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतात. चीन हे एक असेच राष्ट्र आहे.

चीनचे व्यापारी धोरण हे एकतर्फी आहे ज्यामध्ये निर्यातीला अधिक प्राधान्य दिले गेले आहे आणि आयात करण्याचे प्रमाण जाणीवपूर्वक कमी ठेवले आहे. त्यामुळे चीनच्या वस्तू जवळपास सर्व देशात दिसून येतात पण चीनमध्ये इतर देशांच्या वस्तू दिसून येत नाहीत. इतर देशातील अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्यासाठी, त्या देशाला अपल्यावरती विसंबून ठेवण्यासाठी चीनकडून डम्पिंग, आयपी थेफ्ट आणि करन्सी मॅनीप्युलेशन अशा बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब केला जातो. (डम्पिंग - अन्य देशातील बाजारपेठेत स्वदेशातील बाजारपेठेपेक्षा  कमी दराने वस्तूची विक्री करणे. बाजारपेठ काबीज करण्यासाठी किंवा त्या देशातील उत्पादन नेस्तनाबूत करण्यासाठी असं केलं जातं
आयपी थेफ्ट - म्हणजे इंटेलेकच्युअल प्रॉपर्टी थेफ्ट. एखाद्या कंपनी किंवा व्यक्तीचे विचार, शोध, संशोधन यांची चोरी करणे म्हणजे आयपी थेफ्ट. चायनामध्ये व्यापार करायचा असेल तर आयपी ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं जातं.
करन्सी मॅन्युपिलेशन - जाणिपूर्वक आपले चलन डॉलरच्या तुलनेत कमी ठेवायचे आणि किंमतीचा लाभ  उठवायचा)


जगावर सत्ता प्रस्थापित करण्याच्या हुकूमशाही प्रवृत्ती मुळे चीन फक्त भारतासाठीच  नव्हे तर लोकशाही मानणाऱ्या सर्व राष्ट्रांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे चीन आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे ही काळाची गरज बनत चालली आहे. चीन आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे हे व्यवहारिक आणि वास्तविक दृष्ट्या तितकंसं सोपं नाही. अमेरिकेने २०१८ मध्ये चीनसोबत जेव्हा ट्रेड वॉर (इम्पोर्ट टॅक्स वाढविणे) घोषित केला होता तेव्हा चीनसोबतच अमेरिकेलाही नुकसान सहन करावे लागले. अमेरिकेच्या आयात आणि निर्यातीवर याचा परिणाम झाला पण या ट्रेड वारमुळे अमेरिकेचं चिनी वस्तूंवरील अवलंबित्व कमी झालं. 


भारताने सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेसारखे करायचं ठरवलं म्हणजे इम्पोर्ट टॅक्सेस वाढवायचं ठरवलं तर भारताचं अतोनात नुकसान होणार कारण भारताची अर्थव्यवस्था आधीच कमजोर आहे आणि सध्या भारत यासाठी पूर्णपणे तयार नाही. भारत चीन व्यापारातील आयात आणि निर्यातीत मोठी तफावत आहे (भारताची २०१८-१९ मधील चीनकडून आयात जवळपास ७० बिलियन्स डॉलरची होती तर निर्यात १७ बिलियन्स डॉलरची होती) ही तफावत जेवढी जास्त तेवढा चीनचा फायदा अधिक. भारताचं चिनी वस्तूंवर अवलंबून राहण्याचं  प्रमाण मोठं आहे आणि पर्यायी व्यवस्थाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. (भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचं प्रमाण पुढील प्रमाणे आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू ४५%, मोबाईल मार्केट ७६%, औषधोत्पादने ७०%, फर्निचर बेडिंग इ. ५१%, ऑटोमोटिव्ह पार्टस २५%, कीटकनाशके २८%)

सध्या ट्रेड वॉर सोडून चायनाचं अवलंबित्व कमी करण्याचे जे मार्ग उपलब्ध आहेत त्यांचाच उपयोग करणे योग्य आहे. हे मार्ग दोन प्रकारात विभागता येतात एक वैयक्तिक पातळीवर आणि दुसरं सरकारी पातळीवर. चिनी कंपन्यांवर आणि त्यांनी बनविलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकणे, ज्या भारतीय कंपन्यांमध्ये  चायनीज इन्व्हेस्टमेंट ४०% पेक्षा जास्त आहे त्यांचा वापर कमी करणे, नॉट मेड इन चायनाला प्रमोट करणे या गोष्टी वैयक्तिक पातळीवर करता येऊ शकतात. इतर देशांसोबत फ्री ट्रेड ऍग्रीमेंट करणे, शेजारील राष्ट्रांसोबतच इतर राष्ट्रांसोबत असलेले संबंध मजबूत करणे, एक्सपोर्टवर भर देणे, चायनीज कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट ४०% पेक्षा जास्त होऊ न देणे, चायनाकडून केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या डम्पिंग बाबतीत सतर्क राहून कारवाई करणे, स्वदेशी उद्योगांना पाणी, वीज व इतर संसाधने स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे, नवीन उद्योग सुरू करण्यसाठी सबसिडी देणे मार्गदर्शन करणे इ. गोष्टी सरकारी पातळीवर होणे अत्यावश्यक आहे.
(ऑस्ट्रेलिया सोबतची फ्री ट्रेडिंग ऍग्रीमेंट मागच्या आठवर्षपासून आणि युरोपीय युनियन सोबतची फ्री ट्रेड ऍग्रीमेंट मागच्या दहा वर्षापासून चर्चेतच अडकून पडली आहे)

सोनम वांगचुक यांनी सांगितल्याप्रमाणे टप्याटप्याने चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सर्व भारतीयांनी आणि भारत सरकारने एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचं आहे. घुसखोरी केलेला भूभाग परत मिळविणे आणि चीनची भारतातील व्यापार क्षेत्रातील मक्तेदारी पूर्णपणे नष्ट करणे हेच आपल्या सर्वांचे अंतिम ध्येय असले पाहिजे.

संदर्भ - ध्रुव राठी युट्यूब चॅनेल (बॉयकॉट चायना एपिसोड)




        

Friday, June 26, 2020

#छत्रपती राजर्षी शाहू महाराज


          छत्रपतींचा रयतेच्या कल्याणाचा वारसा ज्यांनी आजन्म जपला अशा राजर्षी शाहू महाराजांचा आज जन्मदिवस. शाहू महाराजांनी २८ वर्षे राज्यकारभार केला त्यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य हे अलौकिक आहे. सामाजिक सुधारणेबरोबरच राजर्षींनी साहित्य, कला, कुस्ती, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत अजोड कामगिरी केली. 
      १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यरोहणनिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला तेथील भौतिक प्रगतीचा आणि आधुनिकीकरनाचा  त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला, शिक्षणाचे महत्त्व ओळखून  शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. संस्थानातील ५०% शासकीय नौकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवून आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. समता प्रस्थापित करण्यासाठी संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने प्रतिबंध केला, महार वतन खालसा करून महारांची वेठबिगारितून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची 'हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. खेड्यापाड्यातील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून शाहूंनी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार, ढोर इ. जातीजमातींसाठी वसतिगृहांची स्थापणा केली. आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देऊन आंतरजातीय विवाह घडवून आणले( मराठा धनगर), विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली.
             सामाजिक सुधारणांबरोबरच  शेती व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरवली शाहू मिलची स्थापणा करून आधुनिक वस्त्रोद्योगास चालना दिली राधानागरीचे धरण बांधून संस्थानातील कृषी क्षेत्राचा कायापालट केला, शेतीच्या अधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला नगदी पिके व तंत्रज्ञनाचा वापर वाढवण्यासाठी 'किंग एडवर्ड अग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट ची स्थापणा केली. संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या(कुस्ती) आदी कलांना राजाश्रय दिला रोमच्या आखाडयाच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदाने बांधली, संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर उभे केले. १८९७-९८ साली आलेल्या दुष्काळ आणि प्लेग या दोन्ही संकटाच्या काळात महाराज भक्कमपणे रयतेच्या पाठीशी उभे राहिले योग्य नियोनाद्वारे त्यांनी या संकटातून रयतेला बाहेर काढले.
              शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा(अश्वारूढ) शाहू महाराजांनी पुण्यात उभा केला, अनेक शिवस्मारके ऊभी केली , शिवकालीन वास्तूचं जतन आणि संवर्धन केलं. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी कृती करणे हाच त्यांना मनाचा  मुजरा ठरेल.

Wednesday, June 24, 2020

#महापुरुषांची दूरदृष्टी आणि चीन समस्या

    


     मागच्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सीमेवर तणावाची परस्थिती आहे. गलवान खोऱ्यातील हल्ल्यात आपले वीस जवान शहीद झाले आहेत त्यामुळे परस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. सैन्य आणि सरकारी पातळीवर या परिस्थितीत सुधारणा करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. चिनी वस्तुंना विरोध करून तसेच आंदोलने, निदेर्शने अशा विविध मार्गाने भारतीय जनता चीनच्या विरोधात उभी राहत आहे.  वरवर पाहता हा वाद सीमेपुरता मर्यादित आहे असे जरी दिसत असले तरी ते सत्य नाही. भारतासोबतच इतरही अनेक देशांना चीनच्या घुसखोरीचा सामना करावा लागत आहे. चिनी राज्यकर्त्यांची अतिमहत्वाकांक्षा आणि हुकूमशाही वृत्ती यासाठी मुख्यतः जबाबदार आहे.

कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि सुरक्षिततेमध्ये  व्यापार व परराष्ट्रधोरण या बाबतीतील भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण ठरते. व्यापार आणि परराष्ट्र धोरण याबाबतीत भारताचा इतिहास काशाप्रकारचा होता याचा खोलात जाऊन आभ्यास केल्यास सद्यस्थितीतील समस्यांचे नक्कीच निराकरण होऊ शकते. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार याबाबतीत कसे उपयुक्त आणि प्रेरक ठरू शकतात हे आपण पाहणार आहोत.

स्वराज्याचा व्यापार, संपत्ती संरक्षण आणि अर्थनियोजन याबाबत शिवाजी महाराजांचे विचार आणि योजना या त्याकाळातील इतर शासनकर्त्यां पेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारच्या होत्या.

 शिवाजी महाराजांच्या काळात पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, चिनी व बेहेरोनी, ग्रीक, अरब या परदेशी व्यपाऱ्यांसोबत स्वराज्याचा वापर चालत असे. किनारपट्टीवरील बंदरे ही व्यापाराची प्रमुख केंद्रे होती. त्यांना आरमाराच्या माध्यमातून सुरक्षा पुरवली जात होती.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याच्या मालाच्या विक्री बाबतीत किती जागरूक आणि दक्ष होते तसेच त्यांनी स्वराज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वराज्यातील उद्योगांना कशाप्रकारे संरक्षण पुरविले होते हे पुढील उदाहरणावरून दिसून येते.

कोकण किनारपट्टीवरील लोकांचा मीठ व्यापार हा शेतीसोबतच प्रमुख व्यवसाय होता. इथून मीठ स्वराज्यातील विविध भागात पोहचविले जात असे. जेव्हा पोर्तुगीजांनी  मिठाच्या व्यवसाय करण्यास प्रारंभ केला तेव्हा बारदेशातून आणत असल्यामुळे त्यांचे मीठ स्वराज्यतील म्हणजेच संगमेश्वरी मिठापेक्षा स्वस्त दरात उपलब्द्ध होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या मिठाला मोठी मागणी मिळू लागली आणि संगमेश्वरी मिठाची मागणी कमी होऊ लागली. त्यामुळे व्यपार करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले.  ही गोष्ट जेव्हा महाराजांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी ६ डिसेंबर १६७१ रोजी  कुडाळच्या सुभेदारा नरहरी आनंदराव यांना पत्र लिहून आदेश दिले त्यात ते म्हणतात 'तुम्ही घाटी जबर जकात बसविणे बारदेशी मीठ संगमेश्वरी मिठापेक्षा महाग पडेल ऐसा निरह करणे , बारदेशी मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे'.

महाराजांच्या या आदेशावरून त्यांनी प्रोटेक्टेड इकॉनॉमिक पॉलिसी इम्पोसिंग इम्पोर्ट ड्युटी हा सिद्धांत सोळाव्या शतकातच प्रत्यक्षात अंमलात आणून परकीय व्यपारावर नियंत्रण आणि स्वराज्याच्या उत्पन्नात वाढ या दोन्ही गोष्टी कशाप्रकारे साध्य केल्या होत्या हे स्पष्ट होते.


       डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. त्यांच्या अर्थशास्त्राच्या प्रबंधांचा, लेखांचा आणि पुस्तकांचा आजही जगभरात मोठया प्रमाणात उपयोग केला जात आहे.  चलन व्यवस्थापन, परकीय व्यापार, कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्दय़ांवर त्यांनी व्यवस्थित भाष्य करून ठेवले आहे जे आजही मार्गदर्शक ठरत आहे.

भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे यासाठी बाबासाहेबांनी संविधानाच्या कलम ५१ मध्ये  परराष्ट्र धोरणासाठीची मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत.

१९५१मध्ये बाबासाहेबांनी ज्या पाच कारणांसाठी भारताच्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यातील चुकीचे परराष्ट्र धोरण हे एक महत्वाचे कारण होते.

२९ एप्रिल १९५४ रोजी संसदेत भारताने चीनसाठी तयार केलेले पंचशील धोरण चर्चेसाठी सादर केले गेले होते त्यावर टीका करताना बाबासाहेबांनी पुढील मत मांडले होते.
चीन हे धूर्त राष्ट्र आहे त्याच्यापासून भारताने सावध राहिले पाहिजे व त्याच्यासोबत आदर्शवादी धोरण न स्वीकारता अतिशय स्पष्ट आणि व्यावसायिक धोरण स्वीकारले पाहिजे.

२६ ऑगस्ट १९५४ रोजी संसदेत चीनच्या बाबतीत बोलताना बाबासाहेबांनी जे महत्वाचे इशारे दिले होते ते पुढीलप्रमाणे आहेत. साम्यवादी चीन हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे.

भारताने चीनशी मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी.

 साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजाऱ्यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी, हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण याला मान्यता दिलेली असली, तरी माओचा पंचशिलावर विश्वास नाही.

बाबासाहेबांचे परराष्ट्र धोरण विषयक विचार हे वास्तववादी होते. आर्थिक हितसंबंध साधण्याचे साधन या दृष्टिकोनातून ते त्याच्याकडे पाहत होते. नैतिक मूल्यांसोबतच राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारे परराष्ट्र धोरण त्यांना अपेक्षित होते.

स्वराज्याचा जो संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर केला होता तोच संस्कार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशावर केला आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अत्यावश्यक आहे.

      वरील सर्व गोष्टींवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांची विचारसरणी ही काळाच्या किती पुढची होती याचा प्रत्यय आपल्याला येतो. या महापुरुषांना जयंती, निवडणूक, जात, धर्म यापुरतेच मर्यादित न करता त्यांच्या विचारांना समजून घेऊन ते आत्मसात करणे हे राज्यकर्ते आणि जनता या दोघांसाठी अत्यंत गरजेचे आहे. भारताला जो ऐतिहासिक वारसा लाभला आहे त्याचा खोलात जाऊन आभ्यास केल्यास अशा बिकट समस्यांचा सामना कसा करायचा याचे उत्तर मिळू शकते. फक्त तसे प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. वर्तमान आणि भविष्याच्या वाटांवरील समस्यांचा अंधार दूर करण्यासाठी ज्या प्रकाशाची आवश्यकता भासते तो प्रकाश इतिहासातुनच उपलब्द्ध होऊ शकतो हे सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे.







            

Saturday, June 20, 2020

सूर्यग्रहण

     
Image downloaded from wikipedia.

       आदिम काळापासूनच माणसाचं अवकाशासोबत नातं जडलेलं आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आणि अथांग अशा ब्रम्हांडाचे  मानवी जीवनातील स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे.
 खगोलीय घटना या अद्धभूत आणि असामान्य अशा असतात त्यामुळेच या घटनांबद्दल आधीपासूनच माणसाच्या मनात प्रचंड आकर्षक आणि कुतूहल आहे. अशीच एक अद्धभूत आणि दुर्मिळ खगोलीय घटना येत्या रविवारी म्हणजे २१ जून २०२०२ रोजी घडणार आहे. जी आपल्या सर्वांना पाहता आणि अनुभवता येणार आहे. ही घटना आहे दुर्मिळ अशा कंकणाकृती सुर्यग्रहणाची.
              सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आल्यानंतर ग्राहणाची घटना घडते. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळेस सूर्यग्रहण घडते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण घडते. सुर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. जेव्हा सूर्य चंद्राकडून पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीला  खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्य चंद्राकडून काही प्रमाणात झाकला जातो त्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. कंकणाकृती सूर्यग्रहण हे विशिष्ट परिस्थितीतच घडते त्यामुळेच ते दुर्मिळ आहे. (चंद्राची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्यामुळे पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर एकसारखे नाही) कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो . या सूर्यग्रहणात चंद्र  पृथ्वीपासून जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा चंद्राच्या मागे निर्माण होते. त्या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
सुर्यग्रहणाचे प्रकार  (image is downloaded from www.timeanddate.com)

         भारतातील काही भागात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. उत्तर भारतात कंकणाकृती तर महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सकाळी दहा वाजता हे ग्रहण सुरू होईल आणि दुपारी दीड वाजता संपेल. आयुष्यात प्रत्येकाला कांकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळेल याची काही शाश्वती नाही. पुढचे कंकणाकृती ग्रहण २३ मे २०३१ मध्ये होणार आहे जे दक्षिण भारतातून दिसेल. महाराष्ट्रात कंकणाकृती ग्रहण ३ नोव्हेंबर २४०४ मध्ये होणार आहे.(सूर्य ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघणे धोकादायक आहे त्यासाठी सुरक्षित सौर चष्म्याचा आणि प्रोजेक्शन पद्धतीचा वापर करावा)
           सूर्यग्रहण ही विज्ञानावर आधारित असलेली एक खगोलीय घटना आहे. जी पुर्णतः नैसर्गिक आहे. असे असले तरी आजही ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात म्हणून सूर्यग्रहण होते, ग्रहण काळात अन्न, पाणी दूषित होते, प्रेग्नेंट महिलांना विशेष करून ग्राहणाचा खूप मोठा धोखा असतो यासारखे  गैरसमज आणि  ग्रहनकाळात अन्न व पाण्याचे सेवन न करणे, घराबाहेर न पडणे, ग्रहणकाळ अशुभ मानणे यासारख्या अंधश्रद्धा आजही आपल्या आजूबाजूला पाळल्या जात आहेत. आधी अज्ञानामुळे भारतातच नव्हे इतर देशातही सुर्यग्रहणाबाबतीत  गैरसमज होते पण जसे जसे हे अज्ञान दूर होत गेले तसे तसे इतर देशांतील गैरसमज दूर होत गेले. पण भारतातील स्थिती अजूनही जवळपास तशीच आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. आपल्याकडे विज्ञानाला शिक्षण आणि नौकरी यापुरते मर्यादित केले गेले आहे. त्यामुळेच शिकलेली लोकं ही अंधश्रद्धेमध्ये अडकली असल्याचे दिसून येते. जोपर्यंत विज्ञानाला आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवत नाही तोपर्यंत या स्थितीत बदल होणार नाही.
        देशाला अंधश्रद्धेच्या ग्रहणातून मुक्त करण्यासाठी लहान वयातच विद्यार्थ्यांवर विज्ञानाचा संस्कार करणे अत्यावश्यक आहे.

(पिन होल प्रोजेक्टर - सूर्यग्रहण बघण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणजे पिन होल प्रोजेक्टर. यासाठी दोन कार्ड शीटचा उपयोग केला जातो. एका कार्ड शिटवर पिनने एक होल करायचं आणि दुसरं कार्ड शिट स्क्रीन म्हणून वापरायचं. सूर्याकडे पाठ करून ज्या कार्ड शिटवर होल केलं आहे ते खांद्यावर धरायचं अशाप्रकारे की सूर्याची किरणे त्यावर पडावीत. त्याच रेषेत दुसरे कार्ड शीट थोड्या अंतरावर पकडायचे. तेव्हा दुसऱ्या कार्ड शिटवर सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळते. सूर्याचं प्रतिबिंब मोठं करण्यासाठी दोन शीट मधील अंतर वाढवायचं.
पिन होल प्रोजेक्टर (image is downloaded from www.timeanddate.com)


अजून एक सोपी पद्धत म्हणजे होल असणारी चाळणी वापरूनही सूर्यग्रहण बघता येते. सूर्याकडे पाठ करून चाळणी अशाप्रकारे पकडायची की त्यावर सूर्य किरणे पडली पाहिजेत. चाळणीला जेवढे होल असतील तेवढे सूर्याचे प्रतिबिंब आपल्याला समोर पकडलेल्या कागदावर दिसतील)


       
         
         
   
       
       
       

     

       
     
         
     
         
       

Thursday, June 18, 2020

#सुशांत आणि त्याची स्वप्ने....

      
       सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी मन सुन्न करणारी होती. असे का केले असेल? हा प्रश्न सर्वच स्तरांतून विचारला जात आहे. मलाही हाच प्रश्न सतावत होता. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी आधी हे व्यक्तिमत्त्व नक्की काय होतं हे जाणून घेणं गरजेचं आहे असं वाटल्यामुळे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ज्या गोष्टी मला समजल्या त्याने सुशांत सिंग बद्दलचा आदर आणखीनच वाढला.
           सुशांतच्या आत्महत्येनंतर न्युज चॅनेल्सनी जे असंवेदनशील वर्तन केले त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी त्यांचा आधार घेणे व्यर्थच होते. त्यामुळे त्याच्या मुलाखती आणि सोशल मीडिया अकाउंटचा आधार मी घेतला. त्यातुन त्याच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू उलगडत गेले.
      सुशांत हा एक अतिशय प्रतिभावान विद्यार्थी होता इंजिनिअरिंगच्या  प्रवेश परीक्षेत तो भारतात सातवा आला होता. सुशांतच्या मनात असलेलं विज्ञान आणि अंतरिक्ष याबद्दलचं प्रचंड आकर्षण त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या पोस्टवरून दिसून येते. "फोटॉन इन डबल स्लिट" हे वाक्य सुशांतने ट्विटर आणि इन्स्टाग्राम या दोन्ही अकाऊंटच्या  बायो (स्वतःबद्दल थोडक्यात सांगायचे) मध्ये लिहलं आहे. हे वाक्य एकोणिसाव्या शतकात झालेल्या फिजिक्सच्या सुप्रसिद्ध अशा "डबल स्लिट" या प्रयोगाशी संबंधित आहे. कण आणि तरंग या दोन्हींचे गुणधर्म प्रकाशामध्ये असल्याचे सिद्ध करून या प्रयोगाने वैज्ञानिक जगताला एक नवा दृष्टिकोन दिला होता. सामान्यतः आपलं व्यक्तिमत्त्व व्यक्त करणारे वाक्य बायो मध्ये लिहले जाते. सुशांतने लिहलेल्या या वाक्यावरून त्याचं व्यक्तिमत्व विज्ञानाशी कशाप्रकारे जोडलं गेलं होतं हे स्पष्ट होतं. माझंही व्यक्तीमत्व प्रकाशाप्रमाणे बहुआयामी आहे असंच काहीसं सुशांतला यातून सांगायचं असेल.

     सुशांत एक प्रतिभावान अभिनेता होता त्याबरोबरच तो प्रतिभावान विद्यार्थीही होता. इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत  तो भारतात सातवा आला होता तसेच त्याने फिजिक्सचा नॅशनल ऑलम्पियाडही जिंकला होता. आपल्या आवडीच्या म्हणजेच अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याने इंजिनिअरिंग जरी अर्ध्यात सोडले असले तरी विज्ञानाला स्वतःपासून वेगळे केले नव्हते हे त्याच्या स्वप्नांच्या यादिवरून दिसून येते. सुशांतने ५० स्वप्नांची यादी तयार केली होती जी त्याला जगायची होती. या स्वप्नांना त्याने आपल्या जीवनाचा भाग बनविला होता. शिस्तबद्ध पद्धतीने एक एक स्वप्नांवर काम करत प्रचंड इच्छाशक्तीच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्याने एक एक स्वप्नं सत्यात उतरवायला सुरू केले होते. यातली काही स्वप्ने पूर्ण करतानाचे व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत या व्हिडिओ मधील त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील आनंद पहिला की त्याचे व्यक्तिमत्त्व त्याच्या स्वप्नांसोबत कशाप्रकारे एकरूप झाले होते याची जाणीव आपल्याला होते.
          विमान उडविणे  हे त्याच्या यादीतील पाहिलं स्वप्नं होत त्याने तसे प्रशिक्षण घ्यायला सुरवातही केली होती आणि पायलट सोबत तसा एक प्रयत्नही त्याने केला होता. युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिर रिसर्च म्हणजेच CERN या संस्थेला भेट देणे जिथे गॉड पार्टिकलचा यशस्वी प्रयोग केला गेला होता. हे स्वप्नं सुशांतने पूर्णही केले.(नासा या जगविख्यात आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेलाही सुशांतने भेट दिली होती आणि तिथे एक कार्यशाळाही पूर्ण केली होती) डबल स्लीट आणि सायमॅटिक प्रयोग करून पाहणे, यातील सायमॅटिक म्हणजेच वेगवेगळ्या कंपनांचा अभ्यास करण्याचा प्रयोग त्याने करून बघितला आहे. चंद्र, मंगळ, गुरू आणि शनि या ग्रहांच्या मार्गाचा चार्ट तयार करायचा यासाठी सुशांतने शक्तिशाली आणि आधुनिक असे टेलिस्कोप गॅलरीमध्ये बसवून घेतले होते. अवकाश निरीक्षणाची त्याला खूप आवड होती. चंद्र, इतर ग्रह, आणि आकाशगंगा यांच्या निरीक्षणाचे अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर शेयर केलेले आहेत.  मोर्स कोड ज्यामध्ये सर्व शब्द आणि संख्या फक्त दोन चिन्हाने दर्शीवली जातात ते शिकणे आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यासारख्या एक्सपोनेंशियल तंत्रज्ञानावर काम करणे याही स्वप्नांचा यादीत समावेश होता. याचबरोबर विद्यार्थ्यांना अवकाशाची माहिती मिळण्यासाठी मदत करणे, शंभर विद्यार्थ्यांना नासा किंवा इसरो या संस्थेत कार्यशाळेसाठी पाठविणे, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्द्ध होण्यासाठी मदत करणे, तरुणांना सैन्य दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करणे, महिलांना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देणे, स्वामी विवेकानंद यांच्यावर डॉक्यूमेंट्री करणे, शेती करणे, १००० झाडे लावणे, एका घोड्याचे संगोपन करणे, जंगलात एक आठवडा राहणे अशा शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्राशी संबंधित स्वप्नांचाही यादीत समावेश होता.
      सुशांतच्या स्वप्नांच्या निवडीवरून त्याच्या व्यक्तिमत्वातील वेगळेपण स्पष्टपणे अधोरेखित होते. देश, समाज, पर्यावरण, विद्यार्थी, तरुण आणि महिला याबाबतचे त्याचे विचारही यातून प्रतिबिंबित होतात.सुशांतच्या वाचनाच्या आवडीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व वैचारिक दृष्टया किती प्रगल्भ होते याचाही अंदाज येतो.
      वरील सर्व गोष्टींवरून देशाने आणि समाजाने नक्की काय गमावले आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना येऊ शकतो. शरीर रूपाने जरी हे व्यक्तिमत्त्व आपल्यात राहिले नसले तरी विचारांच्या माध्यमातून ते कायमस्वरूपी आपल्या सोबतच असणार आहे. स्वप्नं पाहण्याची आणि ती सत्यात उतरविण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्याची, विज्ञानाच्या आणि अवकाशाच्या दुनियेत भराऱ्या मारण्याची, कामाप्रति समर्पित राहण्याची, सर्वांप्रति संवेदनशील राहून मानवतेला प्राधान्य देण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रेरणा जी या व्यक्तिमत्वाने आतापर्यंत दिली आहे ती इथुनपुढेही अशीच देत राहणार आहे. 
        सुशांतने जी स्वप्ने पहिली आणि ज्या स्वप्नांना आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनविला त्या स्वनांमुळेच सुशांत तुमच्या माझ्या सारख्या करोडो लोकांच्या स्वप्नांमध्ये कायमस्वरूपी या जगात राहणार हे नक्की.

सुशांतच्या स्वप्नांची यादी -




 

   
     
        (२०१८ मधील केरळ आणि नागालँड पूरग्रस्तांना त्याने एक एक करोड रुपयांची मदत केली होती. सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याने अनेक गरजूंना मदत केल्याचे दिसून येते)
     
         
          

Monday, June 15, 2020

#कोरोना आणि आजचे राशिभविष्य

          
१५/६/२०२० रोजीचे राशिभविष्य
         आज वृत्तपत्र वाचताना राशिभविष्य या कॉलमकडे लक्ष गेले कोरोना आणि सध्याच्या परिस्थितीशी निगडित काहीतरी सांगितलं असेल का? या उत्सुकतेपोटी एक एक राशीचं भविष्य तपासून पाहिलं पण पदरी निराशाच पडली. मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगातील मानवी जीवन कोरोना या महामारीमुळे प्रभावित झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतातील मानवी जीवन ही त्याला अपवाद नाही. असे असले तरी भारतीय लोकांवर  कोरोनाचा किंवा कोरोनामुळे उद्धभवलेल्या परस्थितीचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र राशि भविष्य यातून दिसून येते. याचा काय अर्थ घ्यायचा या परिस्थिती पासून भविष्य सांगणारे, लिहणारे अजूनही अनभिज्ञ आहेत की राशी भविष्य आणि वास्तव यांचा काहीही संबंध नसतो.

        सध्याच्या परिस्थितीत तूम्हाला कोरोना संसर्ग होण्याचा धोखा आहे किंवा नाही, तुमची टेस्ट पॉसिटीव्ह येणार आहे किंवा निगेटिव्ह येणार आहे, कोरोनामुळे तुमचा किंवा तुमच्या कुटुंबीयांचा मृत्यू होणार आहे किंवा नाही, तुमचा एरिया कन्टोन्मेंट झोनमध्ये सामील होणार आहे किंवा नाही, कन्टोन्मेंट झोनमधून तुमचा एरिया बाहेर पडणार आहे की नाही, मास्क लावलं नाही म्हणून किंवा डबल सीट असल्यामुळे किंवा लॉक डाउनच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे तुमच्यावर पोलीस कारवाई होणार आहे किंवा नाही, लॉकडाऊन मध्ये ट्रेन, बसेस कधी आणि कोणत्या राशिच्या लोकांसाठी सुरू होणार आहेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोनाची लस येणार की नाही आणि आली तर ती कोणत्या राशिच्या लोकांना उपलब्द्ध होईल? अशा आशयाची भविष्यवाणी राशिभविष्य या सदरात अपेक्षित आहे मात्र तसं काहीच होताना दिसत नाही. अजूनही तीन महिन्याआधी जसे भविष्य वर्तविले जात होते तसेच ते आताही वर्तविले जात आहे.(वरील इमेज पाहिल्यावर हे लक्षात येईल) फक्त सोलापुरचाच जरी विचार केला तरी आज रविवार असल्यामुळे लॉकडाऊनच्या नियमाप्रमाणे  कोणत्याच राशीचा माणूस घराबाहेर पडू शकणार नाही त्यामुळे वाहन खरेदी, जामिनीचा व्यवहार, नौकरदारांवर कामाचा ताण या गोष्टी ज्या राशिभविष्य मध्ये सांगितल्या गेल्या आहेत त्या घडणं केवळ अशक्य ठरतं. अजून खोलात जाऊन वर्षभराच्या डेटाचा म्हणजे भविष्य वर्तविल्याच्या माहितीचे विश्लेषण केले असता या गोष्टी किती अर्थहीन आहेत हे स्पष्ट होऊ शकते.

              राशी भविष्य मध्ये सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पाहिले तर त्यातला फोलपपणा हा अगदी सहजपणे अधोरेखित होतो. यामध्ये जाणीवपूर्वक अशाच गोष्टींचा अंतर्भाव केला जातो ज्या दैनंदिन जीवनात घडत असतात आणि ज्या गोष्टिंशी प्रत्येकजण कधीनाकधी जोडला गेलेला असतो. एकच राशी असणारे करोडो लोकं जरी असली तरी प्रत्येकाचे जीवन सर्वांगी भिन्न असते, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आणि त्यांचा प्रभावही भिन्न असतो. त्यामुळे वरवर जरी सर्व एकसारखं भासत असलं तरी प्रत्यक्षात मात्र सर्वकाही वेगळं असल्याचे स्पष्ट होते.                    
           संभाव्य (प्रोबेबीलिटी जास्त असणाऱ्या) गोष्टींचाच उपयोग केला गेल्यामुळे आणि एकच गोष्ट अनेकांना लागू होत असल्याने राशिभविष्य मध्ये सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी सत्य आहेत असेच भासते मात्र हा निव्वळ योगायोगच असतो. राशिवरून किंवा इतर कोणत्याही प्रकारे भविष्य सांगणे हे थोतांड आहे. अशा गोष्टींमध्ये न अडकता  प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा आणि मनगटाचा योग्य उपयोग करून स्वतःचे भविष्य स्वतः घडविण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. बुद्धीच्या जोरावर आणि प्रयत्नशील राहूनच मानवाने आतापर्यंतची प्रगती साधली आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

Monday, June 8, 2020

#कोरोना आणि पुन्हा नवी सुरुवात....

     
        मागील काही दिवसांपासून जगातील अनेक देशांसोबतच भारतानेही लॉकडाऊन संपवून जनजीवन पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. लोकांचाही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत ज्याप्रकारचे बदल झाले आहेत त्या बदलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन त्याप्रमाणे वागणे हे आपल्या सर्वांनाच क्रमप्राप्त आहे. 
          मानवी उत्क्रांतीच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येते की बदल आणि त्या बदलासाठी करावा लागणारा संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.  'Survival of the fittest' या डार्विनच्या सिद्धांतासोबत सर्वांची तोंडओळख शाळेतच झाली असणार डार्विन म्हणतो, 'सर्वात शक्तिशाली  किंवा सर्वात बुद्धिमान प्रजाती नाही तर जी सर्वात जास्त बदलला अनुकूल राहील तीच प्रजाती या पृथ्वीवर टिकून राहील'. परस्थितीनुसार ज्या ज्या प्रजातींनी वेळोवेळी स्वतःमध्ये योग्य ते बदल केले त्यांचेच अस्तित्व आज टिकून आहे आणि ज्या प्रजातींनी बदलास अनुनकुलता दर्शीवली नाही त्या नामशेष झाल्या आहेत. मानवाने बदलाला अनुकूलता दर्शीवली म्हणूनच त्याचे अस्तित्व आजही कायम आहे.
        संघर्षाविना मानवी जीवनाची व्याख्याच होऊ शकत नाही. आजपर्यंतचा मानवाचा इतिहास बघितला तर अनेक जीवघेण्या संकटांना तोंड देऊनच तो इथपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे कोरोना नंतरच्या जीवनात संघर्ष करावा लागणार नाही किंवा कोरोना नंतरचे जीवन आधीप्रमाणेच कसल्याही बदलाविना जगता येईल असे ज्यांना वाटत आहे त्यांचा भ्रमनिरास होणार हे नक्की. याचबरोबर सध्या असे काही लोक आहेत जे या नवीन परस्थितीला सामोरे जाण्यास घाबरत आहेत (घराच्या बाहेर पडण्यास नकार देत आहेत) आणि काही असेही लोक आहेत जे कसलीच पर्वा न करता निष्काळजीपणे वावरत आहेत. या दोन्ही गोष्टी समाजाच्या आणि राष्ट्राच्या हिताच्या नाहीत. सध्या या दोन्ही टोकाच्या भूमिका टाळून मध्यम मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
          कोरोनामुळे जे बदल आपल्या जीवनात घडले आहेत त्यांना आत्मसात करून, त्यांच्याशी जुळवून घेऊन, आवश्यक ती खबरदारी घेऊन आपापले जीवन पूर्ववत करण्याच्या संघर्षासाठी प्रत्येकाने स्वतःला सज्ज केले पाहिजे. तसेच याकाळात ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याप्रति सदैव कृतज्ञ राहून मानवतेशी आणि निसर्गाशी आपलं असलेलं नातं अधिक दृढ करण्यावर भर दिला पाहिजे.
दि १०/६/२०२०
दैनिक तरुण भारत सोलापूर.