Translate

Tuesday, April 28, 2020

#भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.

     
   सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. सर्वच देशातील अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. भारत ही त्याला अपवाद नाही. देशातील डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस  हे आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटाशी लढत आहेत. आरोग्य सुविधा, जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्य करत आहे. असे असले तरी देशाच्या नागरिकांकडून मात्र कर्तव्यात कसूर होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. भरतीयत्वाचा अभाव हेच यामागचे प्रमुख कारण आहे.
             भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हा विचार फक्त प्रतिज्ञे पुरता मर्यादित असून त्याला कृतीची जोड नाही हे कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. भारतातील आर्थिक विषमतेची दरी ही किती खोल आहे हे  ही लॉकडाऊन मुळे अधिक स्पष्ट होत आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही गावांमध्ये वसलेली असून शेती आणि शेतीशी निगडित कामांवरती अवलंबून आहे. शहरांमध्येही कामगार, मजूर, आणि हातावर पोट असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. लॉकडाऊन मुळे या वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धताही या वर्गाला होत नाहीये. दुसरीकडे एक असा वर्ग आहे ज्यांच्याकडे सर्व सुख सोयी थोड्या अधिक प्रमाणात का होईनात उपलब्द्ध आहेत जो सर्वार्थाने सधन आहे. एका वर्गाला उद्या खायला मिळेल की नाही ही  काळजी सतावते तर दुसऱ्या वर्गाला उद्या नवीन काय खाद्यपदार्थ बनवायचे याची चिंता सतावत असते. या दोन वर्गातील आर्थिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी एका वर्गाने दुसऱ्या वर्गास मदतीचा हात देणे अपेक्षीत आहे. पण त्यासाठी आपल्याकडे जे काही आहे मग ते कमी असो किंवा जास्त, ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना गरजेपुरतं तरी दिले पाहिजे ही भावना निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोकांकडून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना मदत केली जात आहे पण त्याचं प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यल्प आहे.
        भाज्यांसाठी, मांसाहारासाठी, मॉर्निंग वॉकसाठी आणि घरात बसून कंटाळा येतो म्हणून लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून घराबाहेर पडणाऱ्यांना भारत माझा देश आहे हे म्हणण्याचा तसेच अशा संकटसमयी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वर्गाची जबाबदारी ही सरकारची आहे असा विचार करून फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाच्या सुख सुविधांचा विचार करणाऱ्यांना सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणण्याचा खरंच अधिकार आहे का? राष्ट्रीय आपत्तीच्या अशा प्रतिकूल परिस्थितीतुन मार्गक्रमण करत असताना देशाच्या नागरिकांनी त्यांच्या कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करून एकजुटीने देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे ही देशकार्यच आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
          लॉकडाऊनचे नियम मोडणार नाही  आणि एकाही भारतीय बांधवाची उपासमार होऊ देणार नाही असा निश्चय जर प्रत्येक भारतीयाने केला तर कोरोनाचे संकट लवकरच आपल्या देशातून  हद्दपारही होईल यात काही शंका नाही.



Thursday, April 23, 2020

#ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

      

            
        डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी पुस्तक व्यवस्थित जतन करता यावी आणि त्यांचे व्यवस्थित वाचन करता यावे याकरिता 'राजगृह' ही वास्तू बांधली. जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय म्हणजे राजगृह होय. मुंबई येथील राजगृह या बाबासाहेबांच्या घरात पन्नास हजारापेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह होता. ज्यामध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकांचा समावेश होता, जे बाबासाहेबांनी परदेशातून आणले होते.

       इंग्रजी, मराठी, फ्रेंच, जर्मन, उर्दू  आणि हिंदी अशा अनेक भाषेतील ग्रंथांचा त्यामध्ये समावेश होता. राजगृहाची रचना त्याचा आराखडा स्वतः बाबासाहेबांनी तयार केला, या इमारती मध्ये असलेल्या ग्रंथालयाची मांडणी न्यूयॉर्क मधल्या ग्रंथालयाच्या मांडणी सारखी आहे, त्याचबरोबर भरपूर सूर्यप्रकाश येईल अशा विशिष्ट अंतरावर भव्य अशा खिडक्या आहेत. रोमन पद्धतीप्रमाणे भव्य व उंच उंच खांब आहेत भिंतींमध्ये बांधलेली सज्जा आणि पोटमाळा हि पुस्तकांसाठी बांधलेल्या राजगृहाची वैशिष्ट्ये आहेत.

                    बाबासाहेबांचं विद्यार्थीदशेपासूनच ग्रंथावर असलेलं प्रेम पुढील   एका प्रसंगावरून स्पष्ट होते. कोलंबिया विद्यापीठामध्येशिकत   असताना बाबासाहेबांची ओळख हि ग्रंथालयांमध्येसर्वप्रथम येणाराआणि सर्वात शेवटी जाणारा विद्यार्थी अशी होती जास्तीत जास्त   वेळ ते   ग्रंथालयांमध्ये व्यतीत करीत एकदा दुपारच्या जेवणामध्ये जाणारा वेळ वाचविण्याच्या उद्देशाने बाबासाहेबांनी दुपारचं जेवण   ग्रंथालयातच केलं तेथील सेवकाने हे पाहिलं आणि ग्रंथपालाकडे  तक्रार केली ग्रंथालयात न येण्याची शिक्षा ग्रंथपालाने त्यांना  सुनावली तेव्हा  बाबासाहेब खूप रडले त्यांनी विनंती केली कि  पुस्तकांपासून मला दूर करू नका मी त्यांच्या शिवाय नाही राहू शकत, त्यांचे हे पुस्तक प्रेम बघून ग्रंथपालाने परत असं न करण्याचं आश्वासन घेऊन त्यांची शिक्षा माफ केली. 

            

            १९५२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःचा ग्रंथ संग्रह सिद्धार्थ कॉलेजला प्रधान केला, तेव्हा बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले माझ्या जीवनातील स्नेही, सोबती मी तुम्हाला देत आहे. समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्या सारख्याला या थोर ग्रंथांनी जवळ केले. मला जगात त्यांच्या त्यांच्या इतका परमस्नेही कोणीही नाही. मला समाजाने लाथाडले जगापासून मी दूर झालो साऱ्यांनी मला दूर केले, परंतु ग्रंथांनी मला आसरा दिला म्हणून एखादे पुस्तक दुसऱ्याला द्यावयाचे म्हंटले की माझ्या अगदी जिवावर येते. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्या सारखा दुसरा आनंद नाही. पुस्तके मला शिकवतात, नवी दिशा दाखवितात म्हणून ती मला आनंदाचा लाभ करून देतात.

          

Tuesday, April 21, 2020

ई-कचरा आणि पुनर्प्रक्रिया.


       

       आपलं आयुष्य हे यंत्रांनी वेढलेलं आहे, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जवळपास सर्वच कामांसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर विसंबून राहण्याची जणू आपल्याला सवयच झाली आहे, आपले जीवन अधिकाधिक सुखसोयींनी समृद्ध करण्याच्या हव्यासापोटी जास्तीत जास्त अद्ययावत उपकरणांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची स्पर्धाचं माणसांमध्ये सुरू झाली आहे, अशा या स्पर्धेमुळे दिवसेंदिवस इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि हीच मागणी मोठ्या प्रमाणात ई-कचरा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. विकसित देशांसोबतच विकसनशील देशांमध्येही इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे ई-कचरा नियंत्रित करण्यासाठी देशपातळीवर ई- कचरा पुनर्प्रक्रिया प्रणाली राबविणे अत्यावश्यक बनले आहे.

ई -कचरा म्हणजे काय ?
                 ई-कचरा पुनर्प्रक्रिया समजून घेण्याआधी ई-कचरा म्हणजे काय? त्याची निर्मिती कशी होते? आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम कोणते? हे माहिती करून घेणे गरजेचे आहे. निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून तयार झालेला कचरा म्हणजे ई-कचरा. कॉम्प्युटर्सचे मॉनिटर,
की-बोर्ड, माऊस, मोबाइलचे खराब झालेले सुटे भाग, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल या सर्वांचा समावेश ई-कचऱ्यामध्ये होतो. दरवर्षी जवळपास ५० टन ई-कचऱ्याची निर्मिती संपुर्ण जगात होत आहे. ई-कचऱ्याच्या निर्मितीसाठी वाढती लोकसंख्या हे प्रमुख कारण आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी मोठया प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती केली जाते ज्यामुळे ई-कचरा तयार होण्याचे प्रमाणही वाढते. वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, लोकांची खरेदी करण्याची वाढलेली क्षमता, बाजारात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुट्या पार्ट्सची उपलब्धता नसणे, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कमी होत जाणाऱ्या किमती या ई कचऱ्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरत आहे. ई-कचरा पर्यावरणासाठी घातक आहे कारण इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आर्सेनिक, लिथियम, अँटिमनी, शिसे, पारा, कॅडमियम, निकेल असे अनेक धातू वापरले जातात, तसेच त्यामध्ये ‘पीसीबी’ (पॉलिक्लोरिनेटेड डायफेनाइल्स), ‘पीबीबी’ (पॉलिब्रोमिनेटेड बायफेनाइल्स), ‘सीएफसी’ (क्लोरोफ्ल्युरोकार्बन) असे रासायनिक पदार्थही (बहुतेक सर्व आम्ल पदार्थ) वापरले जातात. त्यामुळे ई-कचरा जर अयोग्यरीतीने नष्ट केला गेला तर अनेक विषारी रसायने (डायॉक्सिन, हायड्रोकार्बन) हवेत पसरतात. तसेच अनेक घातक रसायने, आम्ले, धातू हे जमिनीत जातात किंवा पाण्याच्या स्रोतांपर्यंत पोहोचतात. ज्यामुळे हवा, पाणी, जमीन प्रदूषित होते. नैसर्गिक स्त्रोतांची हानी रोखण्यासाठी ई-कचरा पुनर्प्रक्रिया गरजेची आहे.

पुनर्प्रक्रिया :
             ई-कचरा पुनर्प्रक्रिया ही अनेक टप्प्यांमध्ये केली जाते, जेव्हा ई-कचरा रिसायकलिंग प्लांटमध्ये येतो तेव्हा तो सर्वप्रथम वेगवेगळा केला जातो, मॅन्युअली ई-कचरा वेगळा केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे सर्व भाग डिसमेंटल केले जातात, त्यानंतर कोर मटेरियल आणि काम्पोनंट्स नुसार ई-कचऱ्याची वर्गवारी केली जाते, त्यानंतर फर्स्ट साईज रिडक्शन आणि सेकंड साईज रिडक्शन प्रक्रियेचा वापर करून ई-कचरा समप्रमाणात विभाजित केला जातो, त्यानंतर ओव्हर बँड मॅग्नेटचा उपयोग करून समप्रमाणात विभाजित केलेल्या ई-कचऱ्यातून मॅग्नेटिक मटेरियल वेगळे केले जाते, त्यानंतर मेटल आणि नॉनमेटल वेगळे करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते वर्गीकृत केलेला ई-कचरा कच्चा माल म्हणून विकला जातो किंवा नव्या उत्पादनासाठी वापरला जातो, शेवटी वॉटर सेप्रेशन प्रक्रियेचा वापर करून प्लास्टिकपासून ग्लास, मेटल वेगळे केले जातात आणि त्यांचा पुनर्वापर केला जातो.
उपाय :
         ई-कचरा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये पाचवा क्रमांक लागतो पण ई- कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेची स्थिती ही चांगली नाही. २०१२ मध्ये ई कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी कायदा लागू केला आहे पण उत्पादक आणि ग्राहक हे यापासून अनभिज्ञच असल्याचे दिसून येते, आपल्याकडे अजूनही सामान्य कचऱ्यासोबतच ई-कचराही टाकला जातो यामध्ये बदल होणे आवश्यक आहे त्यासाठी नागरिकांनी काही नियम पाळणे गरजेचे आहे जसे ई-कचरा कुठेही न टाकता किंवा भंगार मध्ये न देता  पुनर्प्रक्रिया करणाऱ्या संस्थांना दयावे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना रिसायकल होणाऱ्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देणे, जास्त कालावधीसाठी उपयोगात येतील अशा हार्डवेअरची निवड करणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर गरजेनुसारच करणे. सरकारच्या कडक अंमलबजावणीने तसेच उत्पादक कंपन्या, नागरिकांच्या पुढाकारानेच ई-कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि आपल्या पर्यावरणाची होणारी हानी थांबू शकेल.
            

Tuesday, April 14, 2020

पत्रकारिता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


      कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते, ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानत. त्यामुळेच त्यांनी वृत्तपत्रांचा आणि पत्रकारितेचा वापर चळवळीचे मुखपत्र आणि चळवळीच्या सैद्धांतिक बाजूची मांडणी करणारे विचारपत्र म्हणून केले. पत्रकारितेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजाच्या वेदना आणि विद्रोह प्रकट केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०) आणि प्रबुद्ध भारत (१९५६) ही वृत्तपत्रे सुरू केली. व्यवस्थेने हजारो वर्षापासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला या वृत्तपत्रांच्या रूपाने नवा आवाज मिळाला. बाबासाहेबांनी ३६ वर्षे जातीपाती तोडण्यापासून ते देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सर्व विषयांवर नेमकेपणाने लिखाण केले. त्यांच्या पत्रकारितेला समाजोद्धाराचे पर्यायाने राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठाण लाभलेले होते.
        मुकनायकचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर पुढील बिरुदावली छापली जात असे, जी संत तुकारामांच्या अभंगातून घेतली होती.

                 काय करूं आता धरूनिया भीड।
                 निःशंक हे तोंड वाजविले।।
                 नव्हे जगी कोण मुकीयांचा जाण।
                 सार्थक लाजोनी नव्हे हित।।

मूकनायकच्या निर्मितीसाठी राजर्षी शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. प्रामुख्याने अस्पृश्य समाजातील समस्यांचे आकलन करणे आणि त्या अनुषंगाने समाजाला जागृत करणे हा या पक्षिकाचा उद्देश होता. मुकनायकच्या एकूण १३ अंकाचे संपादन बाबासाहेबांनी केले. मुकनायकचे एकूण १९ अंक प्रकाशित झाले. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह, पर्वती सत्याग्रह आदी आंदोलनांची वैचारिक भूमिका मांडण्यात या पक्षिकाची भूमिका मोलाची होती. तत्कालीन व्यवस्थेला तडाखे देण्याचे काम नेटाने चालू होते पण पुढे उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशी  गेल्यामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे हे पाक्षिक जास्त काळ सुरू नाही राहू शकले. मूकनायक अल्पकाळ जगले असले तरी तत्कालीन अस्पृश्य समाजाचा स्वाभिमान त्याने कायमचा जागविला.

          बाबासाहेबांचे दुसरे वृत्तपत्र म्हणजे ‘बहिष्कृत भारत’ हे होय. बहिष्कृत भारत मध्ये बिरुदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या ओळी वापरल्या होत्या. समाजातील दलित, पीडित, वंचित व शोषित अशा सर्वच बहिष्कृतांना संघटित करणे व त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे, ही ‘बहिष्कृत भारत’ची भूमिका बाबासाहेबांनी अधोरेखित केलेली आहे. या वृत्तपत्राचा पहिला अंक ३ एप्रिल १९२७ रोजी प्रकाशित झाला, तर शेवटचा अंक १५ नोव्हेंबर १९२९ रोजी प्रकाशित झाला. या अडीच वर्षांच्या काळात बहिष्कृत भारत या पाक्षिकाने विचारांची वादळे व चळचळीचा झंझावात निर्माण करून महाराष्ट्रातील विचारविश्व व समाजजीवन चांगलेच ढवळून काढले होते. या पाक्षिकाचे एकूण ३४ अंक प्रकाशित झाले. त्यातील ३३ अंकांत बाबासाहेबांचे विचारप्रवर्तक अग्रलेख आहेत. याचबरोबर बाबासाहेबांनी वैविध्यपूर्ण विषयांवर स्फुटलेखण केले आहे. प्रासंगिक प्रश्नांवर लेख हे साधारण स्फुटलेखणाचे स्वरूप असते, स्फुटलेखनात लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे, जीवनदृष्टीचे, चिकित्सक वृत्तीचे आणि विचार वैशिष्ट्याचे प्रतिबिंब उमटत असते. पहिल्या वर्षी 'आजकालचे प्रश्न' आणि दुसऱ्या वर्षी 'प्रासंगिक विचार' या सदराखाली बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत मधून स्फुटलेखण केले. (बालविवाहाचे फलित, मंदिर प्रवेश, मनुस्मृतीच्या दहनाचे वादळ, सहभोजन, मिश्रविवाह, पुजारी व भक्त क्रांती, रोटी व्यवहार व बेटी व्यवहार ही त्यांच्या स्फुटलेखनाच्या विषयांची काही नावे आहेत)

     २४ नोव्हेंबर १९३० मध्ये ‘जनता’ या वृत्तपत्राची सुरुवात झाली. या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून 'गुलामाला तू गुलाम आहेस याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल' असे वाक्य होते. जनता हे भारतातील सर्वात जास्त काळ सुरू असलेल्या दलित वृत्तपत्रांपैकी एक होते. जवळपास २५ वर्षे ते प्रकाशित झाले. पुढे १९५६ साली ‘जनता’चे ‘प्रबुद्ध भारत’ मध्ये रुपांतर झाले. ‘जनता’ची आवश्यकता सांगताना बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘आपल्या स्वावलंबनाच्या व भावी राजकीय हक्काच्या लढ्यासाठी आपले वृत्तपत्र आपणास भरभराटीस आणले पाहिजे. ‘जनता’ पत्राची त्यासाठी गरज आहे.’’ बाबासाहेबांनी विलायतेहून लिहून पाठवलेली पत्रे जनतामधून प्रकाशित केली जात होती.

         प्रखर बुद्धिमत्ता, उच्च कोटीचे तत्वज्ञान, गाढा अभ्यास, अजोड युक्तिवाद, नेटकी व नेमकी भूमिका आणि आक्रमक तितकीच संयमी ही त्यांच्या पत्रकारितेची विशेषता होती. आपल्या लिखाणात बाबासाहेब जनमानसात प्रचलित असणाऱ्या म्हणी आणि वाक्यप्रचारांचा आवर्जुन उपयोग करत होते त्यामुळे वाचकांच्या मनाला भिडणारी अशी त्यांची पत्रकारितेची भाषा होती. भारतातच नव्हे तर जगाच्या वेशीवर त्यांनी अस्पृश्यतेची समस्या मांडली, लंडनच्या 'द टाईम्स', ऑस्ट्रेलियाच्या 'डेली मर्करी', न्यूयॉर्कच्या 'न्यूयॉर्क टाईम्स', 'न्यूयॉर्क एमस्टर्डम न्यूज', 'बाल्टिमोर अफ्रो-अमेरिकन'. 'द नॉरफॉक जर्नल' यांसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात बाबासाहेबांच्या वृत्तपत्रातील विचार प्रकाशित 
केले जात होते.
            डॉ.गंगाधर पानतवणे म्हणतात त्याप्रमाणे, मराठीतील कोणत्याही एका वृत्तपत्राला जी बाब करता आली नाही. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविली ती म्हणजे अस्पृश्य समाजाला त्यांनी आपल्या लेखणीने विचारप्रवृत्त, कर्तव्यसन्मुख आणि अंतर्मुख बनविले. एवढेच नाही, तर स्वतःच्या समाजपलीकडे पाहण्याच्या दृष्टीचा परिचयही त्यांनी आपल्या लेखणीने घडविला.
     सामाजिक परिवर्तनातुन नवभारताच्या उभारणीचं काम बाबासाहेबांच्या पत्रकारितेने केले आहे. आजच्या बाजारू पत्रकारितेमध्ये बदल घडविण्यासाठी, लोकशाही दृढ करणारी पत्रकारिता समृद्ध करण्यासाठी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात मानवी मूल्यांना केंद्रभागी ठेवणाऱ्या बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा समावेश हा अनिवार्य ठरतो.



Tuesday, April 7, 2020

केंद्रीय असेंम्बली बॉम्बस्फोट - भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची सुरुवात

     
केंद्रीय विधान परिषदेत बॉम्बस्फोटानंतर फेकलेल्या पत्रकाची मूळ प्रत आणि भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांची मूळ छायाचित्रे.

         आजच्याच दिवशी म्हणजे ८ एप्रिल १९२९ रोजी शाहिद भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील केंद्रीय विधान परिषदेत बॉम्बस्फोट केला होता आणि त्यानंतर स्वतःला अटक करवून घेतली होती. बॉम्बस्फोटाने इंग्रजांची राजवट हादरवून टाकणाऱ्या या दोन्ही क्रांतिकारकांचे वय त्यावेळी अनुक्रमे २१ आणि १९ असे होते. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील ही एक अनन्यसाधारण अशी घटना आहे. आजच्या लेखात आपण त्याचीच माहिती घेणार आहोत.
सॉंडर्स हत्याकांड :
         ३० ऑक्टोबर १९२८ रोजी लाहोर येथे सायमन कमिशनला विरोध करणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करीत असताना झालेल्या अमानुष लाठीचार्जमध्ये लाला लजपतराय हे गंभीररीत्या जखमी होतात आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू होतो. या घटनेमुळे सारा देश हळहळतो, संपूर्ण देशात संतापाची लाट उसळते. या राष्ट्रीय अपमानाचा बदला घेण्याचा हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन निर्धार करते, त्याप्रमाणे लाठीचार्जची ऑर्डर देणाऱ्या स्कॉट या पोलीस अधीक्षकाच्या हत्येचा कट रचला जातो. १७ डिसेंबर १९२८ रोजी भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून हा कट कृतीतही उतरविला जातो पण ओळख करण्यात चुकी झाल्यामुळे स्कॉटच्या जागी उपअधीक्षक सॉंडर्स मारला जातो(याचाही त्या लाठीचार्जमध्ये सहभाग असतो). दुसऱ्या दिवशी संपूर्ण लाहोरमध्ये हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन कडून लाला लजपत राय यांच्या खुनाचा बदला घेतला असल्याची पत्रके लावली जातात. सर्व क्रांंतीकारी सुरक्षितरीत्या लाहोरमधून बाहेर पडतात.
बॉम्बस्फोटाचा उद्देश :
         या घटनेचा आणि असेंम्बलीमध्ये बॉम्बस्फोट करण्याच्या घटनेचा काय संबंध असा प्रश्न अनेकांना पडला असणार, त्याचं उत्तर असं आहे. सॉंडर्सची हत्या करून राष्ट्रीय अपमानाचा बदला घेतल्यानंतरही क्रांतिकारकांची विचारसरणी, त्यांचा उद्देश देशातील जनतेपर्यंत पोहचला नव्हता. क्रांतीकारकांना देशाच्या जनतेमध्ये जी क्रांती घडवून आणायची होती ते साध्य झालं नव्हतं. आपल्याच लोकांकडून आमची निंदा आणि अपमान केला जातोय तरी त्याची पर्वा न करता आम्ही देशासाठी लढत राहणार असा उल्लेख सॉंडर्सची हत्या केल्यानंतर जी पत्रके लावण्यात आली होती त्यात केलेला आहे (जी आताही उपल्ब्ध आहेत). असेंम्बली बॉम्बस्फोटासाठी अजून एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे  ब्रटिशांकडून जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या 'सार्वजनिक सुरक्षा' आणि 'औद्योगिक विवाद' या विधेयकांना विरोध करणे.
          सार्वजनिक सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून कोणालाही विना पुरावा, विना खटला तुरुंगात डांबण्याचा इंग्रजांना अधिकार प्राप्त होणार होता आणि औद्योगिक विवाद विधायकाच्या माध्यमातून कामगारांचा अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा, आवाज उठविण्याचा आणि युनियन बनविण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढून घेतला जाणार होता. जर हे दोन्ही विधेयक मंजूर झाले तर इंग्रजांकडून  केल्या जाणाऱ्या अन्याय आणि अत्याचारात आणखीन भर पडणार होती त्यामुळे त्याला विरोध करणे गरजेचे होते. बॉम्बस्फोटाच्या या घेटनेमुळे हे दोन्ही विधेयक ब्रिटिशांना मंजूर करून घेता आले नाहीत.
       बलिदानातून स्वातंत्र्याची क्रांती घडविण्याचा विचारपूर्वक निर्धार करूनच भगतसिंग आणि सहकाऱ्यांनी ही योजना आखली होती. बहिऱ्या इंग्रज सरकारपर्यंत आणि जनतेपर्यंत आपला आवाज पोहचविण्यासाठी, इंग्रजांना निर्वाणीचा इशारा देण्यासाठी (जो त्यांच्याकडून दुर्लक्षीत केला जाऊ नये यासाठी) बॉम्बचा वापर केला होता. जीवित हानी करणे हा या बॉम्बस्फोटाचा उद्देश नव्हता म्हणूनच कमी तीव्रतेचा बॉम्ब बनविला होता आणि तो मोकळ्या जागेत फेकला होता.  बॉम्बस्फोट केल्यानंतर तेथून पळून न जाता भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त आत्मसमर्पण करतात, ब्रिटिशांकडून चालविल्या जाणाऱ्या खटल्याचा माध्यमातून आपले विचार जनतेपर्यंत पोहचविणे आणि त्याद्वारे लोकांमध्ये क्रांती निर्माण करणे हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. पुढे झालेही तसेच.
क्रांतीची सुरुवात :
            क्रांतिकारकांची स्वातंत्र्याची संकल्पना फक्त इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळविण्यापूरती मर्यादित नव्हती, प्रत्येक वर्गाला बरोबरीने जगण्याचा अधिकार असावा, धर्माच्या नावाने भेदाभेद नसावा, एक असं राष्ट्र असावं जे एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवरील शोषण अमान्य करतं. असा त्यांचा ध्यास होता. क्रांतीचा अर्थ केवळ बंदुका आणि बॉम्ब यांचा वापर करून इंग्रजांना देशातून हद्दपार करणे हा नव्हता तर समाजात एक मूलभूत परिवर्तन निर्माण करणे, भांडवलशाही समाप्त करून कामगारांचं, कष्टकऱ्यांचं शासन निर्माण करणे हा होता. याच क्रांतीच्या ध्येयासाठी शाहिद भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजीवन संघर्ष केला. त्यांच्यावर चालविल्या जाणाऱ्या खटल्यांच्या माध्यमातून देशातील कामगार, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला ब्रिटिशांकडून होणाऱ्या शोषणाची, जुलमाची जाणीव करून दिली आणि त्याविरोधात संघटित होऊन लढण्यास प्रवृत्त केले. क्रांतिकारी आपल्या हक्कासाठी, देशासाठी लढत आहेत हे जसं जसं जनतेच्या लक्षात येऊ लागलं तसं तसं क्रांतीकारकांना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये वाढ होत गेली. दरम्यान एक काळ असा आला की भगतसिंग हे महात्मा गांधी इतकेच लोकप्रिय झाले. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीनंतर जनतेत क्रांतीची लाट उसळली आणि स्वातंत्र्याचे कारण बनली.
          या घटनेतून प्रेरणा घेऊन त्यागातून, बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याप्रति जागरूक राहून, देशाला समृध्द करण्यात हातभार लावणे आणि पुढच्या पिढीपर्यंत हा ऐतिहासिक वारसा पोचविण्यासाठी प्रयत्न करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
१) केंद्रीय विधान परिषदेत बॉम्बस्फोटानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्याकडून फेकण्यात आलेल्या पत्रकाची प्रत -
http://naubhas.in/archives/813
२) सॉंडर्स या पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येनंतर दुसऱ्यादिवशी लाहोरमध्ये लावण्यात आलेल्या पत्रकाची प्रत -
http://naubhas.in/archives/977
३)शाहिद भगतसिंग यांनी सेशन कोर्ट आणि हायकोर्ट यांच्यासमोर दिलेल्या साक्षीची प्रत -
http://naubhas.in/archives/968
४)http://www.shahidbhagatsingh.org/letters.asp



       
     


     
 
       
         
         
             
       
         
        

Sunday, April 5, 2020

#टाटा समूह - मानवी मूल्यांची जपणूक करणारा उद्योगसमूह.

              संपूर्ण जगभरात उद्योग हा फक्त नफा देणारा मार्ग म्हणून सर्व उद्योगसंमूहांकडून वापरला जात असताना,  या मार्गाचा अवलंब न करता देशाची आणि लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा नवा मार्ग निवडण्याचे धाडस करणारा आणि  जगात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा उद्योगसमहू म्हणजे टाटा उद्योग समूह. आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी धडपडणारा भारत ते आता आर्थिक महासत्ता बनू पाहणारा भारत यामध्ये टाटा समूहाचं योगदान हे अतिशय महत्वपूर्ण आहे.

टाटा समूहाची सुरुवात :
         भारतातील सामान्य माणसाला जोवर देशासाठी काम करून पैसा उभा करता येणार नाही तोवर देश आर्थिकदृष्ट्या स्वालंबी होऊ शकणार नाही असा जमशेदजी टाटा यांचा विचार होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर युरोप, इंग्लंड, अमेरिका इ. देशांचा दौरा केल्यानंतर, तिथली औद्योगिकीकरणामुळे झालेली प्रगती बघून भारतालाही उद्योगक्षेत्रात मोठी संधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जमशेदजी नसारवान टाटा यांनी १८६८ मध्ये ब्रिटिश काळात कापसाचे व्यवहार करणारी कंपनी स्थापन करून आणि १८७७ मध्ये नागपूर येथे इम्प्रेस मिल सुरू करून भारतात औद्योगिकीकरणाचा पाया घातला. औदयोगिक विकास साधण्यासाठी परदेशी तंत्रज्ञान भारतात आणले. ताज हॉटेलची सुरवात जमशेदजी टाटा यांच्या कार्यकाळातच करण्यात आली होती. १९०४ मध्ये जमशेदजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र दोराबजी टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने पोलादनिर्मिती आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्प सुरू केले. सर दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नावरोतजी सकवातवाला यांनी पुढची चार वर्षे समूहाचे कामकाज बघितले.

जेआरडी टाटा :
        पुढे जे.आर.डी अर्थात जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांनी टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविले. जे.आर.डी टाटा हे भारतातील आजवरचे सर्वात लोकप्रिय उद्योजक आहेत, त्यांना यंत्रांसोबतच माणसंही जोडण्याची कला अवगत होती. जेआरडी यांनी विमान वाहतूक (एयर इंडिया), रसायन उद्योगनिर्मिती (टाटा केमिकल्स), माहिती तंत्रज्ञान (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आणि सौंदर्यप्रसाधन निर्मिती (लॅक्मे) या उद्योगांसोबतच कर्मचाऱ्यांसाठी एचआर (ह्यूमन रिसोर्स) विभागाची भारतात सर्वप्रथम सुरवात केली. त्यामुळेच त्यांना भारतीय उद्योगजगताचे पितामहा असे संबोधले जाते. भारतात आतंरराष्ट्रीय विमान सेवेची सुरुवात जेआरडी यांनीच केली त्यामुळे त्यांना भारतीय विमान सेवेचे जनक असेही म्हंटले जाते. जेआरडी यांनी १९३८ मध्ये अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर टाटा समूहात फक्त १४ कंपन्या होत्या, निवृत्तीपर्यंत हा आकडा त्यांनी ९५ वर पोहचवला. भारताला महासत्ता बनविण्याण्यापेक्षा आनंदी राष्ट्र बनविण्यास जेआरडी यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना 'भारतरत्न' या  भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रतन टाटा : 
          जेआरडी यांच्या दुरदृष्टीमुळेच रतन टाटा यांच्यासारखा उद्योजक टाटा समूहाला आणि भारताला लाभला. रतन टाटा यांनी जेआरडी यांच्याकडून १९११ मध्ये सूत्रे स्वीकारली. कोरस, टेटली यांसारखे जगभरातील मोठेमोठे उद्योग, जॅग्वार रेंज रोव्हर यांसारखे ब्रँड्स  टाटा समूहात सामील करून रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहचविले आहे. भारतामध्ये वाहननिर्मीतीची सुरवात रतन टाटा यांनीच केली. मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा रतन टाटांचा स्वभाव याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. हे यश मिळवत असतांना रतन टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. संकटकाळात आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे कसं उभारायचं याचा आदर्शच रतन टाटा यांनी २००८ च्या आतंकवादी हल्ल्याच्या घटनेनंतर घालून दिला. रतन टाटा यांनी स्वतःहून निवृत्ती स्वीकारली आणि आता नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम ते करीत आहेत. सध्या नटराजन चंद्रशेखरन हे टाटा समूहाचं कामकाज पाहत आहेत.

विश्वासाचं नात :
         सध्या टाटा समूहाच्या १०० पेक्षा जास्त कंपन्या १०० पेक्षा अधिक देशात कार्यरत आहेत. रसायने, पोलाद, वाहन निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, वीजनिर्मिती, चहा,मीठ, आणि हॉटेल या क्षेत्रात टाटा समूहाच्या कंपन्या आघाडीवर आहेत. उद्योगासोबतच  देशाच्या संशोधन, शैक्षणिक, स्वास्थ्य आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारनीमध्येही टाटा समूहाचे योगदान आहे. कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस आठ तासांचा ही संकल्पना मांडून प्रत्यक्षात अवलंब करणारा तसेच  वैद्यकीय सेवा, आधुनिक निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई, मेटरर्निटी बेनिफिट आणि नफ्याचे समभाग वितरण देऊ करणारा टाटा हा जगभरातील आद्य उद्योगसमूह आहे. टाटा समुहाच्या उत्पन्नाचा निम्म्यापेक्षा जास्त हिस्सा आजही सामाजिक कार्यासाठी खर्च होतो. देशाच्या विकासासोबत सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा म्हणून टाटा समूह एका शातकाहून अधिक काळ कार्यरत आहे. मूळ ध्येयापासून, तत्वापासून विचलित न होता टाटा समूह अग्रेसर आहे, फक्त नफा कमविण्यासाठी टाटा समूहाने तत्वांशी कधीही तडजोड केली नाही त्यामुळेच जगामध्ये, देशामध्ये आणि लोकांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.  आपल्या कामाच्या माध्यमातून मानवी मूल्यांची जपणूक कशी करायची याची शिकवण टाटा समूह साऱ्या जगाला देत आहे आणि देत राहील. जेव्हा जेव्हा देशावर संकट येते तेव्हा तेव्हा टाटा समूह पूर्ण ताकदीनिशी देशासाठी उभा राहतो. त्यामुळे आपणही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
         

Friday, April 3, 2020

राष्ट्रीय एकात्मता आणि धर्मांधता

   
       मागच्या काही दिवसांमध्ये विविध धर्मातील धर्मांध लोकांकडून धार्मिक कृती करण्यासाठी लॉक डाऊनचे नियम मोडल्याचे, मेडिकल स्टाफ आणि पोलिसांवर हल्ला केल्याचे, पोलिसांशी हुज्जत घालत असल्याच्या बातम्या सर्वजण बघत असतीलच. याचबरोबर वॉट्सऍप ग्रुपमध्ये, काही धर्मांध लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे पूर्ण धर्माला चुकीचे ठरवून विशिष्ट धर्माला लक्ष्य केले जात असल्याचा आणि स्वतःच्या धर्मातील लोकांकडून तशाच चुका  झाल्यास त्यावेळी त्यावर मौन बाळगले जात असल्याचा अनुभव अनेकांना आला असणार. 
         शिक्षितपणाच्या, सभ्यपणाच्या चेहऱ्यामागे धर्मांधतेचा चेहरा लपवून राष्ट्रीय आपत्तीतही धर्माला कवटाळून बसणारी मानसिकता ही देशास अपायकारक आहे. याच धर्मांधळेपणामुळे आधीही देशाचे अतोनात नुकसान झाल्याचा इतिहास आपल्या समोर असताना त्यातून काहीही बोध न घेता पुन्हा त्याच गोष्टी करणं हा एकप्रकारचा देशद्रोहचं आहे. धर्माने माणसाला नाही तर माणसाने धर्माला बनविले आहे त्यामुळे  माणूस जर जगला तरच धर्मही जगणार तसेच चांगल्या आणि वाईट प्रकारच्या प्रवृत्तीची माणसं ही प्रत्येक धर्मात असतात त्यामुळे काही माणसांच्या चुकांमुळे तो धर्मच चुकीचा  ठरत नाही हे ही अशा धर्मांध लोकांच्या लक्षात येत नाही. राष्ट्र संकटात असतानाही यांना धार्मिक कृत्य महत्वाचं वाटतं यावरूनच यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची बीजं अंकुरितच झाली नाहीत हे स्पष्ट होतं. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा अभाव असणाऱ्या अशा मानसिकता देशासाठी अत्यंत धोखादायक ठरू शकतात. अशावेळी देशाला धर्मापेक्षा, जातीपेक्षा देश सर्वोच्च मानणारी मानसिकता अधिक गरजेची आहे. 
         कोरोनामुळे उद्धभविलेल्या या गंभीर परिस्थितीत एकेमेकांबद्दल आणि एकमेकांच्या धर्माबद्दल द्वेष न बाळगता, राष्ट्रीहिताला प्राधान्य देऊन, विविधतेत एकता ही आपली संस्कृती जपण्याची आणि ती समृद्ध करण्याची आवश्यकता आहे.

  • जय हिंद.