ज्याकाळात स्त्रीयांना शिकण्याचा, शस्त्र चालविण्याचा स्वतंत्रपणे विचार करण्याचा अधिकार नव्हता. त्यांचे जीवन फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते त्याकाळात ज्यांनी स्त्रियांची फौज उभी केली, शस्त्र हाती घेऊन आपल्या राज्याचं रक्षण केलं, उत्तम प्रकारे राज्यकारभार सांभाळून राज्याची भरभराट केली, राज्यात सुशासन निर्माण करून राज्याचा नावलौकिक सर्वत्र केला, प्रजेचा आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करून कल्याणकारी राज्याची संकल्पना कृतीत उतरविली. त्या पराक्रमी, तत्वज्ञानी, प्रजाहितदक्ष वीरांगना म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर होय. त्यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. वडील माणकोजी शिंदे यांनी त्याकाळात स्त्रीशिक्षण प्रचलित नसतानाही अहिल्याबाई यांना लिहण्या वाचण्याचे, घोडेस्वारीचे, शस्त्र चालविण्याचे शिक्षण दिले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह माळवा राज्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचा पुत्र खंडेराव यांच्यासोबत झाला. त्यांना मुक्ता आणि मालेराव अशी दोन अपत्ये होती.
अहिल्याबाई यांना घडविण्यात मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. मल्हाररावांनी वेगवेगळ्या मोहिमेवर असताना अहिल्याबाई यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारावरून हे सष्ट होते. मल्हाररावांनी त्यांना शस्त्रास्त्रांचे, राज्यकारभाराचे, युद्धनीतीचे, न्यायदानाचे शिक्षण देऊन त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. अहिल्याबाई यांच्या क्षमतांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच कुंभेरच्या लढाईत (१७५४) खंडेरावांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अहिल्याबाई यांना त्याकाळच्या प्रथेप्रमाणे सती जाण्यापासून परावृत्त करून प्रजेच्या हितास प्राधान्य देण्यास सांगितले. पुढे मल्हारराव आणि पुत्र मालेराव यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढील एकोणतीस वर्षे राज्याचा कारभार अतिशय कुशलतेने सांभाळला.
मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासात अहिल्याबाई होळकर हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहले गेले आहे. होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट राज्यकर्त्यांसोबत त्यांची तुलना केली जाते. आज दोनशे वर्षानंतरही त्यांचं अस्तित्व अबाधित राहण्यामागे नक्की कोणत्या गोष्टी आहेत, काय वेगळेपण होतं त्यांच्या विचारांचं आणि कर्तृत्वाचं हे समजून घेणे आवश्यक ठरते.
पराक्रमी आणि मुत्सद्दी योद्धा
राणी अहिल्याबाई उत्कृष्ट धनुर्धर होत्या. शस्त्र चालविण्यात आणि युद्धतंत्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी स्त्रियांना शस्त्र चालविण्याचे, युद्धनीतीचे प्रशिक्षण देऊन जगातली पहिली स्त्रियांची फौज तयार केली होती. राणी अहिल्याबाई यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व करून राज्यावर आलेल्या संकटांना परतावून लावले होते. तुकोजीराव होळकर हे त्यांच्या सैन्याचे सेनापती होते. तुंग, राजस्थानचा चांद्रवत(१७७१), मुघल (१७८९), शिंद्याचा सरदार गोपाळराव (१७९२) यांचा त्यांनी युद्धात पराभव केला. हत्तीवर बसून त्या युद्धात सहभागी होत असल्याचे अनेक उल्लेख आढळून येतात.(त्यांच्या भैरव या आवडत्या हत्तीचा जेथे मृत्यू झाला तेथे त्याची समाधी बांधण्यात आली. आजही अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण राजवाड्याच्या मागच्या बाजूला हत्तीच्या समाधीची वास्तू उभी आहे) शौर्यासोबतच त्यांच्या अंगी असलेल्या मुत्सद्देगिरीचा उपयोग करून त्यांनी पन्नास हजाराची फौज घेऊन राज्यावर चालून आलेल्या रघुनाथराव पेशव्यास माघार घेण्यास भाग पाडले. याच मुत्सेद्दीगिरीच्या जोरावर त्यांनी आजूबाजूच्या राज्यांसोबत उत्तम हितसंबंध जोपासले होते. जगातील महिला राज्यकर्त्यांचे अभ्यासक ब्रिटिश लेखक लॉरेन्स यांनी राणी अहिल्याबाई होळकर यांना "भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट" असे संबोधले आहे. (त्यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्यासोबत केली आहे.)
कुशल प्रशासक
राणी अहिल्याबाई यांच्या प्रशासनाबद्दल समकालीन इतिहासकार स्टीवर्ट गॉडर्न म्हणतो "राणी अहिल्याबाईंचे राज्य हे अठराव्या शतकातील सर्वात स्थिर राज्य होते". यावरून आपल्याला त्यांच्या राज्यातील प्रशासनाची कल्पना येऊ शकते. समान न्याय करणाऱ्या राज्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या प्रशासन आणि न्यायदानाबद्दल ब्रिटिश सेनानी आणि इतिहासकार जॉन माल्कम याने अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली आहे तो म्हणतो,
"Her first principle of government appears to have been moderate assessment, and an almost sacred respect for the native rights of village officers and proprietors of land. She heard every complaint in person; and although she continually referred cases to courts of equity and arbitration, and to her ministers for settlement, she was always accessible. So strong was her sense of duty on all points connected with the distribution of justice, that she is represented as not only patient but unwearied in the investigation of the most insignificant cases, when appeals were made to her decision."
राणी अहिल्याबाई होळकर यांनी आपली राजधानी इंदूरवरून महेश्वरी या ठिकाणी वसविली. विविध राज्यांतील विद्वान, कारागीर, कलाकार, आदींचा दरबारात सन्मान करून देणग्या देऊन त्यांना राज्यात समाविष्ट करून घेतले. महेश्वरीला वस्त्रोद्योग, वास्तुकला, शिक्षण, पर्यटन, व्यापार यांचे प्रमुख केंद्रे बनविले.
प्रजाहितदक्षक राज्यकर्त्या
राणी अहिल्याबाई होळकर यांनी प्रजेचे हित समोर ठेऊनच राज्यकारभार केला. धर्म, रूढी, परंपरा यापेक्षा जास्त प्रजेच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांनी प्रजेवरती जाचक अंमल केला नाही. प्रजेचे हित लक्षात घेऊन जाचक कायद्यात बदल केले करपद्धती सौम्य केली. गावोगावी लोकांना तत्काळ न्याय मिळावा म्हणून अधिकाऱ्यांची नेमणूक केली. सर्वसामान्यांची पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना कठोर शासन केले.
शेतीसाठी विहिरी, बारवा, तलावे बांधून शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध करून दिले. शेतीपूरक उद्योगधंदे करण्यास प्रोत्साहन दिले. विविध उद्योगांना चालना देऊन प्रत्येकाच्या हाताला काम दिले. कठीण परिस्थितीत लोकांना सरकारातून मदत केली.
दुर्गम भागात राहून वाटसरूंना लुटणाऱ्या भिल्ल आणि गौंड या जमातींना कसण्यासाठी जमिनी देऊन, त्यांच्या भागातून येणाऱ्या सामानावर कर घेण्याचा अधिकार देऊन त्यांचे जीवन स्थिरस्थावर केले.
प्रजेच्या हितासाठी त्यांनी मुलीचे आयुष्यही पणाला लावले होते. राज्यातील चोर, दरोडेखोरांचा जो बंदोबस्त करेल त्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यात येईल अशी दवंडी दिली आणि ती कृतीतही उतरविली. चोर, दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुक्ताबाईचा विवाह लावून त्याकाळातील पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणला. (त्याकाळात असलेली मुलीचे लग्न आठव्या वर्षी करण्याची परंपराही त्यांनी मोडीत काढली मुक्ताबाई यांचे वय लग्नावेळी अठरा वर्षे होते.मुक्ताबाईचा जन्म १७४८ आणि लग्न १७६६)
त्याकाळात पतीच्या निधनानंतर निपुत्रीक विधवांची संपत्ती सरकारजमा केली जात असे आणि दत्तक पुत्र घेण्यासाठी संपत्तीतील हिस्सा राज्याला द्यावा लागत होता. राणी अहिल्याबाई यांनी या दोन्ही प्रथा बंद केल्या. तसेच विधवांना मोफत दत्तकपुत्राचा अधिकार दिला.
राज्यात हुंडा देण्यावर आणि घेण्यावर बंदी घातली. याबाबतीला त्यांचा हुकूम पुढीलप्रमाणे होता. "श्री शंकर आज्ञेवरुन हुकूम जारी करण्यात येतो की, कोणत्याही जाती किंवा जमातीत विवाहाचे समयी कोणी कन्येचे, द्रव्य देईल त्यांच्याकडून जितके द्रव्य मिळाले असेल तेवढे सरकारकडून भरणा करून घेतले जाईल याशिवाय दंडही भरावा लागेल विदित होय"
राणी अहिल्याबाई यांनी वैयक्तिक आयुष्यात खूप जास्त दुःख सहन केले. त्यांनी पती, सासरे, मुलगा, सुना, जावई आणि मुलगी या सर्वांचे मृत्यू डोळ्यांनी बघितले. पण त्यांनी आपल्या या दुःखाची झळ प्रजेपर्यंत कधीही पोहचू दिली नाही. शेवटपर्यंत त्यांनी प्रजेच्याहितालाच प्राधान्य दिले.
राणी अहिल्याबाई यांनी वैयक्तिक आयुष्यात खूप जास्त दुःख सहन केले. त्यांनी पती, सासरे, मुलगा, सुना, जावई आणि मुलगी या सर्वांचे मृत्यू डोळ्यांनी बघितले. पण त्यांनी आपल्या या दुःखाची झळ प्रजेपर्यंत कधीही पोहचू दिली नाही. शेवटपर्यंत त्यांनी प्रजेच्याहितालाच प्राधान्य दिले.
जोआना बेली या स्कॉटिश कवयितत्रीने १८४९ मध्ये त्याच्या प्रजावात्सल्याचं वर्णन करणारा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. त्यातील काही ओळी खालील प्रमाणे आहेत.
“For thirty years her reign of peace,
The land in blessing did increase;
And she was blessed by every tongue,
By stern and gentle, old and young.
Yea, even the children at their mothers feet
Are taught such homely rhyming to repeat"
“In latter days from Brahma came,
To rule our land, a noble Dame,
Kind was her heart, and bright her fame,
And Ahlya was her honored name.”
राणी अहिल्याबाई होळकर या धार्मिक होत्या पण त्या धर्मांध नव्हत्या. त्यांची धर्मावर श्रद्धा होती त्याप्रमाणे त्या दान धर्म करीत. त्यांनी राज्यात तसेच राज्याबाहेरही अनेक मंदिरे बांधली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, मंदिरांना देणग्या दिल्या. फक्त मंदिरेच बांधली नाहि तर मस्जिद, दर्गेही बांधले, मुस्लिम फकीरानाही दान दिले. यासोबतच त्यांनी राज्यातील आणि राज्याबाहेरील लोकांच्या कल्याणासाठीही विहरी खोदल्या, बारवे बांधले, नदीवर घाट बांधले, रस्ते केले, पूल बांधले, धर्मशाळा आणि अन्नछत्रे सुरू केली. त्यांच्या कार्याचा गौरव करताना ऐनी बेझंट लिहते, "त्यांच्या राज्यातील रस्ते दुतर्फा वृक्षांनी वेढलेले होते. प्रवाश्यांसाठी जागोजागी विहिरी आणि धर्मशाळा बांधल्या होत्या. गरीब आणि बेघर लोकांच्या गरजा नेहमी पूर्ण केल्या जात होत्या. आदिवासी जमातींना त्यांनी जंगलातलं भटके जीवन सोडून गावांमध्ये शेती करून स्थायिक होण्यास तयार केले होते. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांची राणीवर समान श्रद्धा असून ते राणीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात".
राणी अहिल्याबाई होळकर यांच्या सारख्या वीरांगना घडविण्यासाठी माणकोजी शिंदे, खंडेराव होळकर आणि मल्हारराव होळकर यांच्यासारखे पुरुष निर्माण होणे गरजेचे आहे जे स्त्रियांच्या क्षमतांवर संपूर्ण विश्वास दाखववून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. वरील सर्व माहितीवरून असे म्हणता येईल की हातात पिंड घेतलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या धार्मिक प्रतिमेपेक्षा पराक्रमी, तत्वज्ञानी, कर्तृत्ववान, लोककल्याणकारी राज्यकर्त्या ही प्रतिमाच स्त्रियांच्या, युवकांच्या पर्यायाने समाजाच्या आणि देशाच्या उत्कर्षास अधिक उपयुक्त ठरेल.
संदर्भ -
१) "A memoir of central India including Malwa and adjoining" - John Malcolm.
२) "आहिल्या बाई" कविता संग्रह - जोआना बेली.
(या कथासंग्रहाची लिंक - Ahalya baee )
३) "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" - श्यामा घोणसे.
४)"Children of The motherland" - Anni Besant