Translate

Tuesday, June 30, 2020

#चिनची व्यपारातील मक्तेदारी आणि भारत

 
Image is downloaded from indiatvnews.com

परकीय व्यापारात वाढ झाली की जीडीपी मध्येही वाढ होते आणि जीडीपी मध्ये वाढ झाली की देशाची अर्थव्यवस्था  मजबूत होण्यास मदत मिळते त्यामुळे सर्वच राष्ट्रे परकीय व्यापाराला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असतात पण काही राष्ट्रे या व्यपराच्या माध्यमातून इतर देशांना नियंत्रित करण्याचा आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतात. चीन हे एक असेच राष्ट्र आहे.

चीनचे व्यापारी धोरण हे एकतर्फी आहे ज्यामध्ये निर्यातीला अधिक प्राधान्य दिले गेले आहे आणि आयात करण्याचे प्रमाण जाणीवपूर्वक कमी ठेवले आहे. त्यामुळे चीनच्या वस्तू जवळपास सर्व देशात दिसून येतात पण चीनमध्ये इतर देशांच्या वस्तू दिसून येत नाहीत. इतर देशातील अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्यासाठी, त्या देशाला अपल्यावरती विसंबून ठेवण्यासाठी चीनकडून डम्पिंग, आयपी थेफ्ट आणि करन्सी मॅनीप्युलेशन अशा बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब केला जातो. (डम्पिंग - अन्य देशातील बाजारपेठेत स्वदेशातील बाजारपेठेपेक्षा  कमी दराने वस्तूची विक्री करणे. बाजारपेठ काबीज करण्यासाठी किंवा त्या देशातील उत्पादन नेस्तनाबूत करण्यासाठी असं केलं जातं
आयपी थेफ्ट - म्हणजे इंटेलेकच्युअल प्रॉपर्टी थेफ्ट. एखाद्या कंपनी किंवा व्यक्तीचे विचार, शोध, संशोधन यांची चोरी करणे म्हणजे आयपी थेफ्ट. चायनामध्ये व्यापार करायचा असेल तर आयपी ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं जातं.
करन्सी मॅन्युपिलेशन - जाणिपूर्वक आपले चलन डॉलरच्या तुलनेत कमी ठेवायचे आणि किंमतीचा लाभ  उठवायचा)


जगावर सत्ता प्रस्थापित करण्याच्या हुकूमशाही प्रवृत्ती मुळे चीन फक्त भारतासाठीच  नव्हे तर लोकशाही मानणाऱ्या सर्व राष्ट्रांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे चीन आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे ही काळाची गरज बनत चालली आहे. चीन आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे हे व्यवहारिक आणि वास्तविक दृष्ट्या तितकंसं सोपं नाही. अमेरिकेने २०१८ मध्ये चीनसोबत जेव्हा ट्रेड वॉर (इम्पोर्ट टॅक्स वाढविणे) घोषित केला होता तेव्हा चीनसोबतच अमेरिकेलाही नुकसान सहन करावे लागले. अमेरिकेच्या आयात आणि निर्यातीवर याचा परिणाम झाला पण या ट्रेड वारमुळे अमेरिकेचं चिनी वस्तूंवरील अवलंबित्व कमी झालं. 


भारताने सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेसारखे करायचं ठरवलं म्हणजे इम्पोर्ट टॅक्सेस वाढवायचं ठरवलं तर भारताचं अतोनात नुकसान होणार कारण भारताची अर्थव्यवस्था आधीच कमजोर आहे आणि सध्या भारत यासाठी पूर्णपणे तयार नाही. भारत चीन व्यापारातील आयात आणि निर्यातीत मोठी तफावत आहे (भारताची २०१८-१९ मधील चीनकडून आयात जवळपास ७० बिलियन्स डॉलरची होती तर निर्यात १७ बिलियन्स डॉलरची होती) ही तफावत जेवढी जास्त तेवढा चीनचा फायदा अधिक. भारताचं चिनी वस्तूंवर अवलंबून राहण्याचं  प्रमाण मोठं आहे आणि पर्यायी व्यवस्थाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. (भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचं प्रमाण पुढील प्रमाणे आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू ४५%, मोबाईल मार्केट ७६%, औषधोत्पादने ७०%, फर्निचर बेडिंग इ. ५१%, ऑटोमोटिव्ह पार्टस २५%, कीटकनाशके २८%)

सध्या ट्रेड वॉर सोडून चायनाचं अवलंबित्व कमी करण्याचे जे मार्ग उपलब्ध आहेत त्यांचाच उपयोग करणे योग्य आहे. हे मार्ग दोन प्रकारात विभागता येतात एक वैयक्तिक पातळीवर आणि दुसरं सरकारी पातळीवर. चिनी कंपन्यांवर आणि त्यांनी बनविलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकणे, ज्या भारतीय कंपन्यांमध्ये  चायनीज इन्व्हेस्टमेंट ४०% पेक्षा जास्त आहे त्यांचा वापर कमी करणे, नॉट मेड इन चायनाला प्रमोट करणे या गोष्टी वैयक्तिक पातळीवर करता येऊ शकतात. इतर देशांसोबत फ्री ट्रेड ऍग्रीमेंट करणे, शेजारील राष्ट्रांसोबतच इतर राष्ट्रांसोबत असलेले संबंध मजबूत करणे, एक्सपोर्टवर भर देणे, चायनीज कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट ४०% पेक्षा जास्त होऊ न देणे, चायनाकडून केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या डम्पिंग बाबतीत सतर्क राहून कारवाई करणे, स्वदेशी उद्योगांना पाणी, वीज व इतर संसाधने स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे, नवीन उद्योग सुरू करण्यसाठी सबसिडी देणे मार्गदर्शन करणे इ. गोष्टी सरकारी पातळीवर होणे अत्यावश्यक आहे.
(ऑस्ट्रेलिया सोबतची फ्री ट्रेडिंग ऍग्रीमेंट मागच्या आठवर्षपासून आणि युरोपीय युनियन सोबतची फ्री ट्रेड ऍग्रीमेंट मागच्या दहा वर्षापासून चर्चेतच अडकून पडली आहे)

सोनम वांगचुक यांनी सांगितल्याप्रमाणे टप्याटप्याने चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सर्व भारतीयांनी आणि भारत सरकारने एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचं आहे. घुसखोरी केलेला भूभाग परत मिळविणे आणि चीनची भारतातील व्यापार क्षेत्रातील मक्तेदारी पूर्णपणे नष्ट करणे हेच आपल्या सर्वांचे अंतिम ध्येय असले पाहिजे.

संदर्भ - ध्रुव राठी युट्यूब चॅनेल (बॉयकॉट चायना एपिसोड)




        

Friday, June 26, 2020

#छत्रपती राजर्षी शाहू महाराज


          छत्रपतींचा रयतेच्या कल्याणाचा वारसा ज्यांनी आजन्म जपला अशा राजर्षी शाहू महाराजांचा आज जन्मदिवस. शाहू महाराजांनी २८ वर्षे राज्यकारभार केला त्यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य हे अलौकिक आहे. सामाजिक सुधारणेबरोबरच राजर्षींनी साहित्य, कला, कुस्ती, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत अजोड कामगिरी केली. 
      १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यरोहणनिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला तेथील भौतिक प्रगतीचा आणि आधुनिकीकरनाचा  त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला, शिक्षणाचे महत्त्व ओळखून  शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. संस्थानातील ५०% शासकीय नौकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवून आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. समता प्रस्थापित करण्यासाठी संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने प्रतिबंध केला, महार वतन खालसा करून महारांची वेठबिगारितून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची 'हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. खेड्यापाड्यातील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून शाहूंनी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार, ढोर इ. जातीजमातींसाठी वसतिगृहांची स्थापणा केली. आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देऊन आंतरजातीय विवाह घडवून आणले( मराठा धनगर), विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली.
             सामाजिक सुधारणांबरोबरच  शेती व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरवली शाहू मिलची स्थापणा करून आधुनिक वस्त्रोद्योगास चालना दिली राधानागरीचे धरण बांधून संस्थानातील कृषी क्षेत्राचा कायापालट केला, शेतीच्या अधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला नगदी पिके व तंत्रज्ञनाचा वापर वाढवण्यासाठी 'किंग एडवर्ड अग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट ची स्थापणा केली. संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या(कुस्ती) आदी कलांना राजाश्रय दिला रोमच्या आखाडयाच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदाने बांधली, संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर उभे केले. १८९७-९८ साली आलेल्या दुष्काळ आणि प्लेग या दोन्ही संकटाच्या काळात महाराज भक्कमपणे रयतेच्या पाठीशी उभे राहिले योग्य नियोनाद्वारे त्यांनी या संकटातून रयतेला बाहेर काढले.
              शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा(अश्वारूढ) शाहू महाराजांनी पुण्यात उभा केला, अनेक शिवस्मारके ऊभी केली , शिवकालीन वास्तूचं जतन आणि संवर्धन केलं. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी कृती करणे हाच त्यांना मनाचा  मुजरा ठरेल.

Wednesday, June 24, 2020

#महापुरुषांची दूरदृष्टी आणि चीन समस्या

    


     मागच्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सीमेवर तणावाची परस्थिती आहे. गलवान खोऱ्यातील हल्ल्यात आपले वीस जवान शहीद झाले आहेत त्यामुळे परस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. सैन्य आणि सरकारी पातळीवर या परिस्थितीत सुधारणा करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. चिनी वस्तुंना विरोध करून तसेच आंदोलने, निदेर्शने अशा विविध मार्गाने भारतीय जनता चीनच्या विरोधात उभी राहत आहे.  वरवर पाहता हा वाद सीमेपुरता मर्यादित आहे असे जरी दिसत असले तरी ते सत्य नाही. भारतासोबतच इतरही अनेक देशांना चीनच्या घुसखोरीचा सामना करावा लागत आहे. चिनी राज्यकर्त्यांची अतिमहत्वाकांक्षा आणि हुकूमशाही वृत्ती यासाठी मुख्यतः जबाबदार आहे.

कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि सुरक्षिततेमध्ये  व्यापार व परराष्ट्रधोरण या बाबतीतील भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण ठरते. व्यापार आणि परराष्ट्र धोरण याबाबतीत भारताचा इतिहास काशाप्रकारचा होता याचा खोलात जाऊन आभ्यास केल्यास सद्यस्थितीतील समस्यांचे नक्कीच निराकरण होऊ शकते. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार याबाबतीत कसे उपयुक्त आणि प्रेरक ठरू शकतात हे आपण पाहणार आहोत.

स्वराज्याचा व्यापार, संपत्ती संरक्षण आणि अर्थनियोजन याबाबत शिवाजी महाराजांचे विचार आणि योजना या त्याकाळातील इतर शासनकर्त्यां पेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारच्या होत्या.

 शिवाजी महाराजांच्या काळात पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, चिनी व बेहेरोनी, ग्रीक, अरब या परदेशी व्यपाऱ्यांसोबत स्वराज्याचा वापर चालत असे. किनारपट्टीवरील बंदरे ही व्यापाराची प्रमुख केंद्रे होती. त्यांना आरमाराच्या माध्यमातून सुरक्षा पुरवली जात होती.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याच्या मालाच्या विक्री बाबतीत किती जागरूक आणि दक्ष होते तसेच त्यांनी स्वराज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वराज्यातील उद्योगांना कशाप्रकारे संरक्षण पुरविले होते हे पुढील उदाहरणावरून दिसून येते.

कोकण किनारपट्टीवरील लोकांचा मीठ व्यापार हा शेतीसोबतच प्रमुख व्यवसाय होता. इथून मीठ स्वराज्यातील विविध भागात पोहचविले जात असे. जेव्हा पोर्तुगीजांनी  मिठाच्या व्यवसाय करण्यास प्रारंभ केला तेव्हा बारदेशातून आणत असल्यामुळे त्यांचे मीठ स्वराज्यतील म्हणजेच संगमेश्वरी मिठापेक्षा स्वस्त दरात उपलब्द्ध होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या मिठाला मोठी मागणी मिळू लागली आणि संगमेश्वरी मिठाची मागणी कमी होऊ लागली. त्यामुळे व्यपार करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले.  ही गोष्ट जेव्हा महाराजांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी ६ डिसेंबर १६७१ रोजी  कुडाळच्या सुभेदारा नरहरी आनंदराव यांना पत्र लिहून आदेश दिले त्यात ते म्हणतात 'तुम्ही घाटी जबर जकात बसविणे बारदेशी मीठ संगमेश्वरी मिठापेक्षा महाग पडेल ऐसा निरह करणे , बारदेशी मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे'.

महाराजांच्या या आदेशावरून त्यांनी प्रोटेक्टेड इकॉनॉमिक पॉलिसी इम्पोसिंग इम्पोर्ट ड्युटी हा सिद्धांत सोळाव्या शतकातच प्रत्यक्षात अंमलात आणून परकीय व्यपारावर नियंत्रण आणि स्वराज्याच्या उत्पन्नात वाढ या दोन्ही गोष्टी कशाप्रकारे साध्य केल्या होत्या हे स्पष्ट होते.


       डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. त्यांच्या अर्थशास्त्राच्या प्रबंधांचा, लेखांचा आणि पुस्तकांचा आजही जगभरात मोठया प्रमाणात उपयोग केला जात आहे.  चलन व्यवस्थापन, परकीय व्यापार, कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्दय़ांवर त्यांनी व्यवस्थित भाष्य करून ठेवले आहे जे आजही मार्गदर्शक ठरत आहे.

भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे यासाठी बाबासाहेबांनी संविधानाच्या कलम ५१ मध्ये  परराष्ट्र धोरणासाठीची मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत.

१९५१मध्ये बाबासाहेबांनी ज्या पाच कारणांसाठी भारताच्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यातील चुकीचे परराष्ट्र धोरण हे एक महत्वाचे कारण होते.

२९ एप्रिल १९५४ रोजी संसदेत भारताने चीनसाठी तयार केलेले पंचशील धोरण चर्चेसाठी सादर केले गेले होते त्यावर टीका करताना बाबासाहेबांनी पुढील मत मांडले होते.
चीन हे धूर्त राष्ट्र आहे त्याच्यापासून भारताने सावध राहिले पाहिजे व त्याच्यासोबत आदर्शवादी धोरण न स्वीकारता अतिशय स्पष्ट आणि व्यावसायिक धोरण स्वीकारले पाहिजे.

२६ ऑगस्ट १९५४ रोजी संसदेत चीनच्या बाबतीत बोलताना बाबासाहेबांनी जे महत्वाचे इशारे दिले होते ते पुढीलप्रमाणे आहेत. साम्यवादी चीन हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे.

भारताने चीनशी मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी.

 साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजाऱ्यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी, हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण याला मान्यता दिलेली असली, तरी माओचा पंचशिलावर विश्वास नाही.

बाबासाहेबांचे परराष्ट्र धोरण विषयक विचार हे वास्तववादी होते. आर्थिक हितसंबंध साधण्याचे साधन या दृष्टिकोनातून ते त्याच्याकडे पाहत होते. नैतिक मूल्यांसोबतच राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारे परराष्ट्र धोरण त्यांना अपेक्षित होते.

स्वराज्याचा जो संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर केला होता तोच संस्कार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशावर केला आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अत्यावश्यक आहे.

      वरील सर्व गोष्टींवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांची विचारसरणी ही काळाच्या किती पुढची होती याचा प्रत्यय आपल्याला येतो. या महापुरुषांना जयंती, निवडणूक, जात, धर्म यापुरतेच मर्यादित न करता त्यांच्या विचारांना समजून घेऊन ते आत्मसात करणे हे राज्यकर्ते आणि जनता या दोघांसाठी अत्यंत गरजेचे आहे. भारताला जो ऐतिहासिक वारसा लाभला आहे त्याचा खोलात जाऊन आभ्यास केल्यास अशा बिकट समस्यांचा सामना कसा करायचा याचे उत्तर मिळू शकते. फक्त तसे प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. वर्तमान आणि भविष्याच्या वाटांवरील समस्यांचा अंधार दूर करण्यासाठी ज्या प्रकाशाची आवश्यकता भासते तो प्रकाश इतिहासातुनच उपलब्द्ध होऊ शकतो हे सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे.







            

Saturday, June 20, 2020

सूर्यग्रहण

     
Image downloaded from wikipedia.

       आदिम काळापासूनच माणसाचं अवकाशासोबत नातं जडलेलं आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आणि अथांग अशा ब्रम्हांडाचे  मानवी जीवनातील स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे.
 खगोलीय घटना या अद्धभूत आणि असामान्य अशा असतात त्यामुळेच या घटनांबद्दल आधीपासूनच माणसाच्या मनात प्रचंड आकर्षक आणि कुतूहल आहे. अशीच एक अद्धभूत आणि दुर्मिळ खगोलीय घटना येत्या रविवारी म्हणजे २१ जून २०२०२ रोजी घडणार आहे. जी आपल्या सर्वांना पाहता आणि अनुभवता येणार आहे. ही घटना आहे दुर्मिळ अशा कंकणाकृती सुर्यग्रहणाची.
              सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आल्यानंतर ग्राहणाची घटना घडते. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळेस सूर्यग्रहण घडते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण घडते. सुर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. जेव्हा सूर्य चंद्राकडून पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीला  खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्य चंद्राकडून काही प्रमाणात झाकला जातो त्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. कंकणाकृती सूर्यग्रहण हे विशिष्ट परिस्थितीतच घडते त्यामुळेच ते दुर्मिळ आहे. (चंद्राची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्यामुळे पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर एकसारखे नाही) कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो . या सूर्यग्रहणात चंद्र  पृथ्वीपासून जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा चंद्राच्या मागे निर्माण होते. त्या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
सुर्यग्रहणाचे प्रकार  (image is downloaded from www.timeanddate.com)

         भारतातील काही भागात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. उत्तर भारतात कंकणाकृती तर महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सकाळी दहा वाजता हे ग्रहण सुरू होईल आणि दुपारी दीड वाजता संपेल. आयुष्यात प्रत्येकाला कांकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळेल याची काही शाश्वती नाही. पुढचे कंकणाकृती ग्रहण २३ मे २०३१ मध्ये होणार आहे जे दक्षिण भारतातून दिसेल. महाराष्ट्रात कंकणाकृती ग्रहण ३ नोव्हेंबर २४०४ मध्ये होणार आहे.(सूर्य ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघणे धोकादायक आहे त्यासाठी सुरक्षित सौर चष्म्याचा आणि प्रोजेक्शन पद्धतीचा वापर करावा)
           सूर्यग्रहण ही विज्ञानावर आधारित असलेली एक खगोलीय घटना आहे. जी पुर्णतः नैसर्गिक आहे. असे असले तरी आजही ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात म्हणून सूर्यग्रहण होते, ग्रहण काळात अन्न, पाणी दूषित होते, प्रेग्नेंट महिलांना विशेष करून ग्राहणाचा खूप मोठा धोखा असतो यासारखे  गैरसमज आणि  ग्रहनकाळात अन्न व पाण्याचे सेवन न करणे, घराबाहेर न पडणे, ग्रहणकाळ अशुभ मानणे यासारख्या अंधश्रद्धा आजही आपल्या आजूबाजूला पाळल्या जात आहेत. आधी अज्ञानामुळे भारतातच नव्हे इतर देशातही सुर्यग्रहणाबाबतीत  गैरसमज होते पण जसे जसे हे अज्ञान दूर होत गेले तसे तसे इतर देशांतील गैरसमज दूर होत गेले. पण भारतातील स्थिती अजूनही जवळपास तशीच आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. आपल्याकडे विज्ञानाला शिक्षण आणि नौकरी यापुरते मर्यादित केले गेले आहे. त्यामुळेच शिकलेली लोकं ही अंधश्रद्धेमध्ये अडकली असल्याचे दिसून येते. जोपर्यंत विज्ञानाला आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवत नाही तोपर्यंत या स्थितीत बदल होणार नाही.
        देशाला अंधश्रद्धेच्या ग्रहणातून मुक्त करण्यासाठी लहान वयातच विद्यार्थ्यांवर विज्ञानाचा संस्कार करणे अत्यावश्यक आहे.

(पिन होल प्रोजेक्टर - सूर्यग्रहण बघण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणजे पिन होल प्रोजेक्टर. यासाठी दोन कार्ड शीटचा उपयोग केला जातो. एका कार्ड शिटवर पिनने एक होल करायचं आणि दुसरं कार्ड शिट स्क्रीन म्हणून वापरायचं. सूर्याकडे पाठ करून ज्या कार्ड शिटवर होल केलं आहे ते खांद्यावर धरायचं अशाप्रकारे की सूर्याची किरणे त्यावर पडावीत. त्याच रेषेत दुसरे कार्ड शीट थोड्या अंतरावर पकडायचे. तेव्हा दुसऱ्या कार्ड शिटवर सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळते. सूर्याचं प्रतिबिंब मोठं करण्यासाठी दोन शीट मधील अंतर वाढवायचं.
पिन होल प्रोजेक्टर (image is downloaded from www.timeanddate.com)


अजून एक सोपी पद्धत म्हणजे होल असणारी चाळणी वापरूनही सूर्यग्रहण बघता येते. सूर्याकडे पाठ करून चाळणी अशाप्रकारे पकडायची की त्यावर सूर्य किरणे पडली पाहिजेत. चाळणीला जेवढे होल असतील तेवढे सूर्याचे प्रतिबिंब आपल्याला समोर पकडलेल्या कागदावर दिसतील)


       
         
         
   
       
       
       

     

       
     
         
     
         
       

Thursday, June 18, 2020

#सुशांत आणि त्याची स्वप्ने....

      
       सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी मन सुन्न करणारी होती. असे का केले असेल? हा प्रश्न सर्वच स्तरांतून विचारला जात आहे. मलाही हाच प्रश्न सतावत होता. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी आधी हे व्यक्तिमत्त्व नक्की काय होतं हे जाणून घेणं गरजेचं आहे असं वाटल्यामुळे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ज्या गोष्टी मला समजल्या त्याने सुशांत सिंग बद्दलचा आदर आणखीनच वाढला.
           सुशांतच्या आत्महत्येनंतर न्युज चॅनेल्सनी जे असंवेदनशील वर्तन केले त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी त्यांचा आधार घेणे व्यर्थच होते. त्यामुळे त्याच्या मुलाखती आणि सोशल मीडिया अकाउंटचा आधार मी घेतला. त्यातुन त्याच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू उलगडत गेले.
      सुशांत हा एक अतिशय प्रतिभावान विद्यार्थी होता इंजिनिअरिंगच्या  प्रवेश परीक्षेत तो भारतात सातवा आला होता. सुशांतच्या मनात असलेलं विज्ञान आणि अंतरिक्ष याबद्दलचं प्रचंड आकर्षण त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या पोस्टवरून दिसून येते. "फोटॉन इन डबल स्लिट" हे वाक्य सुशांतने ट्विटर आणि इन्स्टाग्राम या दोन्ही अकाऊंटच्या  बायो (स्वतःबद्दल थोडक्यात सांगायचे) मध्ये लिहलं आहे. हे वाक्य एकोणिसाव्या शतकात झालेल्या फिजिक्सच्या सुप्रसिद्ध अशा "डबल स्लिट" या प्रयोगाशी संबंधित आहे. कण आणि तरंग या दोन्हींचे गुणधर्म प्रकाशामध्ये असल्याचे सिद्ध करून या प्रयोगाने वैज्ञानिक जगताला एक नवा दृष्टिकोन दिला होता. सामान्यतः आपलं व्यक्तिमत्त्व व्यक्त करणारे वाक्य बायो मध्ये लिहले जाते. सुशांतने लिहलेल्या या वाक्यावरून त्याचं व्यक्तिमत्व विज्ञानाशी कशाप्रकारे जोडलं गेलं होतं हे स्पष्ट होतं. माझंही व्यक्तीमत्व प्रकाशाप्रमाणे बहुआयामी आहे असंच काहीसं सुशांतला यातून सांगायचं असेल.

     सुशांत एक प्रतिभावान अभिनेता होता त्याबरोबरच तो प्रतिभावान विद्यार्थीही होता. इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत  तो भारतात सातवा आला होता तसेच त्याने फिजिक्सचा नॅशनल ऑलम्पियाडही जिंकला होता. आपल्या आवडीच्या म्हणजेच अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याने इंजिनिअरिंग जरी अर्ध्यात सोडले असले तरी विज्ञानाला स्वतःपासून वेगळे केले नव्हते हे त्याच्या स्वप्नांच्या यादिवरून दिसून येते. सुशांतने ५० स्वप्नांची यादी तयार केली होती जी त्याला जगायची होती. या स्वप्नांना त्याने आपल्या जीवनाचा भाग बनविला होता. शिस्तबद्ध पद्धतीने एक एक स्वप्नांवर काम करत प्रचंड इच्छाशक्तीच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्याने एक एक स्वप्नं सत्यात उतरवायला सुरू केले होते. यातली काही स्वप्ने पूर्ण करतानाचे व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत या व्हिडिओ मधील त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील आनंद पहिला की त्याचे व्यक्तिमत्त्व त्याच्या स्वप्नांसोबत कशाप्रकारे एकरूप झाले होते याची जाणीव आपल्याला होते.
          विमान उडविणे  हे त्याच्या यादीतील पाहिलं स्वप्नं होत त्याने तसे प्रशिक्षण घ्यायला सुरवातही केली होती आणि पायलट सोबत तसा एक प्रयत्नही त्याने केला होता. युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिर रिसर्च म्हणजेच CERN या संस्थेला भेट देणे जिथे गॉड पार्टिकलचा यशस्वी प्रयोग केला गेला होता. हे स्वप्नं सुशांतने पूर्णही केले.(नासा या जगविख्यात आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेलाही सुशांतने भेट दिली होती आणि तिथे एक कार्यशाळाही पूर्ण केली होती) डबल स्लीट आणि सायमॅटिक प्रयोग करून पाहणे, यातील सायमॅटिक म्हणजेच वेगवेगळ्या कंपनांचा अभ्यास करण्याचा प्रयोग त्याने करून बघितला आहे. चंद्र, मंगळ, गुरू आणि शनि या ग्रहांच्या मार्गाचा चार्ट तयार करायचा यासाठी सुशांतने शक्तिशाली आणि आधुनिक असे टेलिस्कोप गॅलरीमध्ये बसवून घेतले होते. अवकाश निरीक्षणाची त्याला खूप आवड होती. चंद्र, इतर ग्रह, आणि आकाशगंगा यांच्या निरीक्षणाचे अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर शेयर केलेले आहेत.  मोर्स कोड ज्यामध्ये सर्व शब्द आणि संख्या फक्त दोन चिन्हाने दर्शीवली जातात ते शिकणे आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यासारख्या एक्सपोनेंशियल तंत्रज्ञानावर काम करणे याही स्वप्नांचा यादीत समावेश होता. याचबरोबर विद्यार्थ्यांना अवकाशाची माहिती मिळण्यासाठी मदत करणे, शंभर विद्यार्थ्यांना नासा किंवा इसरो या संस्थेत कार्यशाळेसाठी पाठविणे, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्द्ध होण्यासाठी मदत करणे, तरुणांना सैन्य दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करणे, महिलांना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देणे, स्वामी विवेकानंद यांच्यावर डॉक्यूमेंट्री करणे, शेती करणे, १००० झाडे लावणे, एका घोड्याचे संगोपन करणे, जंगलात एक आठवडा राहणे अशा शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्राशी संबंधित स्वप्नांचाही यादीत समावेश होता.
      सुशांतच्या स्वप्नांच्या निवडीवरून त्याच्या व्यक्तिमत्वातील वेगळेपण स्पष्टपणे अधोरेखित होते. देश, समाज, पर्यावरण, विद्यार्थी, तरुण आणि महिला याबाबतचे त्याचे विचारही यातून प्रतिबिंबित होतात.सुशांतच्या वाचनाच्या आवडीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व वैचारिक दृष्टया किती प्रगल्भ होते याचाही अंदाज येतो.
      वरील सर्व गोष्टींवरून देशाने आणि समाजाने नक्की काय गमावले आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना येऊ शकतो. शरीर रूपाने जरी हे व्यक्तिमत्त्व आपल्यात राहिले नसले तरी विचारांच्या माध्यमातून ते कायमस्वरूपी आपल्या सोबतच असणार आहे. स्वप्नं पाहण्याची आणि ती सत्यात उतरविण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्याची, विज्ञानाच्या आणि अवकाशाच्या दुनियेत भराऱ्या मारण्याची, कामाप्रति समर्पित राहण्याची, सर्वांप्रति संवेदनशील राहून मानवतेला प्राधान्य देण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रेरणा जी या व्यक्तिमत्वाने आतापर्यंत दिली आहे ती इथुनपुढेही अशीच देत राहणार आहे. 
        सुशांतने जी स्वप्ने पहिली आणि ज्या स्वप्नांना आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनविला त्या स्वनांमुळेच सुशांत तुमच्या माझ्या सारख्या करोडो लोकांच्या स्वप्नांमध्ये कायमस्वरूपी या जगात राहणार हे नक्की.

सुशांतच्या स्वप्नांची यादी -




 

   
     
        (२०१८ मधील केरळ आणि नागालँड पूरग्रस्तांना त्याने एक एक करोड रुपयांची मदत केली होती. सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याने अनेक गरजूंना मदत केल्याचे दिसून येते)
     
         
          

Monday, June 15, 2020

#कोरोना आणि आजचे राशिभविष्य

          
१५/६/२०२० रोजीचे राशिभविष्य
         आज वृत्तपत्र वाचताना राशिभविष्य या कॉलमकडे लक्ष गेले कोरोना आणि सध्याच्या परिस्थितीशी निगडित काहीतरी सांगितलं असेल का? या उत्सुकतेपोटी एक एक राशीचं भविष्य तपासून पाहिलं पण पदरी निराशाच पडली. मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगातील मानवी जीवन कोरोना या महामारीमुळे प्रभावित झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतातील मानवी जीवन ही त्याला अपवाद नाही. असे असले तरी भारतीय लोकांवर  कोरोनाचा किंवा कोरोनामुळे उद्धभवलेल्या परस्थितीचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र राशि भविष्य यातून दिसून येते. याचा काय अर्थ घ्यायचा या परिस्थिती पासून भविष्य सांगणारे, लिहणारे अजूनही अनभिज्ञ आहेत की राशी भविष्य आणि वास्तव यांचा काहीही संबंध नसतो.

        सध्याच्या परिस्थितीत तूम्हाला कोरोना संसर्ग होण्याचा धोखा आहे किंवा नाही, तुमची टेस्ट पॉसिटीव्ह येणार आहे किंवा निगेटिव्ह येणार आहे, कोरोनामुळे तुमचा किंवा तुमच्या कुटुंबीयांचा मृत्यू होणार आहे किंवा नाही, तुमचा एरिया कन्टोन्मेंट झोनमध्ये सामील होणार आहे किंवा नाही, कन्टोन्मेंट झोनमधून तुमचा एरिया बाहेर पडणार आहे की नाही, मास्क लावलं नाही म्हणून किंवा डबल सीट असल्यामुळे किंवा लॉक डाउनच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे तुमच्यावर पोलीस कारवाई होणार आहे किंवा नाही, लॉकडाऊन मध्ये ट्रेन, बसेस कधी आणि कोणत्या राशिच्या लोकांसाठी सुरू होणार आहेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोनाची लस येणार की नाही आणि आली तर ती कोणत्या राशिच्या लोकांना उपलब्द्ध होईल? अशा आशयाची भविष्यवाणी राशिभविष्य या सदरात अपेक्षित आहे मात्र तसं काहीच होताना दिसत नाही. अजूनही तीन महिन्याआधी जसे भविष्य वर्तविले जात होते तसेच ते आताही वर्तविले जात आहे.(वरील इमेज पाहिल्यावर हे लक्षात येईल) फक्त सोलापुरचाच जरी विचार केला तरी आज रविवार असल्यामुळे लॉकडाऊनच्या नियमाप्रमाणे  कोणत्याच राशीचा माणूस घराबाहेर पडू शकणार नाही त्यामुळे वाहन खरेदी, जामिनीचा व्यवहार, नौकरदारांवर कामाचा ताण या गोष्टी ज्या राशिभविष्य मध्ये सांगितल्या गेल्या आहेत त्या घडणं केवळ अशक्य ठरतं. अजून खोलात जाऊन वर्षभराच्या डेटाचा म्हणजे भविष्य वर्तविल्याच्या माहितीचे विश्लेषण केले असता या गोष्टी किती अर्थहीन आहेत हे स्पष्ट होऊ शकते.

              राशी भविष्य मध्ये सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पाहिले तर त्यातला फोलपपणा हा अगदी सहजपणे अधोरेखित होतो. यामध्ये जाणीवपूर्वक अशाच गोष्टींचा अंतर्भाव केला जातो ज्या दैनंदिन जीवनात घडत असतात आणि ज्या गोष्टिंशी प्रत्येकजण कधीनाकधी जोडला गेलेला असतो. एकच राशी असणारे करोडो लोकं जरी असली तरी प्रत्येकाचे जीवन सर्वांगी भिन्न असते, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आणि त्यांचा प्रभावही भिन्न असतो. त्यामुळे वरवर जरी सर्व एकसारखं भासत असलं तरी प्रत्यक्षात मात्र सर्वकाही वेगळं असल्याचे स्पष्ट होते.                    
           संभाव्य (प्रोबेबीलिटी जास्त असणाऱ्या) गोष्टींचाच उपयोग केला गेल्यामुळे आणि एकच गोष्ट अनेकांना लागू होत असल्याने राशिभविष्य मध्ये सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी सत्य आहेत असेच भासते मात्र हा निव्वळ योगायोगच असतो. राशिवरून किंवा इतर कोणत्याही प्रकारे भविष्य सांगणे हे थोतांड आहे. अशा गोष्टींमध्ये न अडकता  प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा आणि मनगटाचा योग्य उपयोग करून स्वतःचे भविष्य स्वतः घडविण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. बुद्धीच्या जोरावर आणि प्रयत्नशील राहूनच मानवाने आतापर्यंतची प्रगती साधली आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

Monday, June 8, 2020

#कोरोना आणि पुन्हा नवी सुरुवात....

     
        मागील काही दिवसांपासून जगातील अनेक देशांसोबतच भारतानेही लॉकडाऊन संपवून जनजीवन पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. लोकांचाही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत ज्याप्रकारचे बदल झाले आहेत त्या बदलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन त्याप्रमाणे वागणे हे आपल्या सर्वांनाच क्रमप्राप्त आहे. 
          मानवी उत्क्रांतीच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येते की बदल आणि त्या बदलासाठी करावा लागणारा संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.  'Survival of the fittest' या डार्विनच्या सिद्धांतासोबत सर्वांची तोंडओळख शाळेतच झाली असणार डार्विन म्हणतो, 'सर्वात शक्तिशाली  किंवा सर्वात बुद्धिमान प्रजाती नाही तर जी सर्वात जास्त बदलला अनुकूल राहील तीच प्रजाती या पृथ्वीवर टिकून राहील'. परस्थितीनुसार ज्या ज्या प्रजातींनी वेळोवेळी स्वतःमध्ये योग्य ते बदल केले त्यांचेच अस्तित्व आज टिकून आहे आणि ज्या प्रजातींनी बदलास अनुनकुलता दर्शीवली नाही त्या नामशेष झाल्या आहेत. मानवाने बदलाला अनुकूलता दर्शीवली म्हणूनच त्याचे अस्तित्व आजही कायम आहे.
        संघर्षाविना मानवी जीवनाची व्याख्याच होऊ शकत नाही. आजपर्यंतचा मानवाचा इतिहास बघितला तर अनेक जीवघेण्या संकटांना तोंड देऊनच तो इथपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे कोरोना नंतरच्या जीवनात संघर्ष करावा लागणार नाही किंवा कोरोना नंतरचे जीवन आधीप्रमाणेच कसल्याही बदलाविना जगता येईल असे ज्यांना वाटत आहे त्यांचा भ्रमनिरास होणार हे नक्की. याचबरोबर सध्या असे काही लोक आहेत जे या नवीन परस्थितीला सामोरे जाण्यास घाबरत आहेत (घराच्या बाहेर पडण्यास नकार देत आहेत) आणि काही असेही लोक आहेत जे कसलीच पर्वा न करता निष्काळजीपणे वावरत आहेत. या दोन्ही गोष्टी समाजाच्या आणि राष्ट्राच्या हिताच्या नाहीत. सध्या या दोन्ही टोकाच्या भूमिका टाळून मध्यम मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
          कोरोनामुळे जे बदल आपल्या जीवनात घडले आहेत त्यांना आत्मसात करून, त्यांच्याशी जुळवून घेऊन, आवश्यक ती खबरदारी घेऊन आपापले जीवन पूर्ववत करण्याच्या संघर्षासाठी प्रत्येकाने स्वतःला सज्ज केले पाहिजे. तसेच याकाळात ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याप्रति सदैव कृतज्ञ राहून मानवतेशी आणि निसर्गाशी आपलं असलेलं नातं अधिक दृढ करण्यावर भर दिला पाहिजे.
दि १०/६/२०२०
दैनिक तरुण भारत सोलापूर.

Tuesday, June 2, 2020

#संत तुकाराम महाराज - सदेह वैकुंठगमन

     
           "खरे तुकाराम महाराज समजून घेताना" या मागच्या लेखात आपण संत तुकाराम महाराज यांचे त्यांच्या विचार आणि कर्तुत्वाला अनुसरून असणारे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या लेखात आपण चमत्कार नाकारणाऱ्या तुकाराम महाराजांच्या जीवनाचा अंतच कसा चमत्काराने व्यापून टाकला आहे याची माहिती घेणार आहोत. तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठ गमन झाले यावरती श्रध्दा असणारा एक आणि त्यांची हत्या झाली असे मानणारा दुसरा असे दोन मतप्रवाह समाजात प्रचलित आहेत.

चमत्कार -
चमत्कार हे थोतांड आहे मी अशा गोष्टी सांगतही नाही आणि करितही नाही हे असे तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे आणि सविस्तरपणे आपल्या या अभंगात मांडले आहे.
कपट काही एक । नेणे भुलवायाचे लोक।
तुमचे करितो कीर्तन । गातो उत्तम ते गुण।
दाऊ नेणे जडीबुटी । चमत्कार उठाउठी।
नाही शिष्यशाखा । सांगो अयाचित लोकां।
नव्हे मठपति । नाही चाहुरांची वृत्ती।
नाही देवार्चन । असे मांडिले दुकान।
नाही वेताळ प्रसन्न। काही सांगो खाण खुण।
नव्हे पुराणिक । करणे सांगणे आणीक।
नेणे वाद घटा पटा । करिता पंडित करंटा।
नाही जाळीत भणदी । उदो म्हणोनि आनंदी।
नाही हालवीत माळा । भोवते मेळवुनि गबाळा।
आगमीचे कुडे नेणे । स्तंभन मोहन उच्चाटणे।
नव्हे यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा।

मी लोकांना भुलवण्याचं कोणतंही कपट जाणत नाही. मी तुमचं कीर्तन करतो आणि उत्तम गुण गातो. मी जडीबुटी दाखवणं जाणत नाही. मी आकस्मिक म्हणजेच निसर्गातील कारणकार्यसंबंधाच्या विरोधात जाणारे चमत्कार दाखवणं जाणत नाही. माझी शिष्यशाखा नाही. मी बोलावलेले नसताना कोणी लोक आले, तर त्यांना काही सांगतो, इतकंच. मी मठपती नाही. मी उदरनिर्वाहासाठी कुणाकडं चाहूरभर जमीन मागत नाही. मी देवपूजा करण्याचं दुकान मांडलेलं नाही. लोकांना काही खाणाखुणा सांगण्यासाठी मला वेताळ प्रसन्न नाही. मी करायचं वेगळं आणि सांगायचं वेगळं असं करणारा पुराणिक नाही. करंट्या पंडितासारखा घटा-पटाचा वाद करणं मी जाणत नाही. मी 'उदो' म्हणून आनंदानं धूप जाळत नाही. मी गबाळ्या म्हणजेच भोळ्या लोकांना भोवती जमवून माळा हलवीत नाही. मी धर्मशास्त्रातील कोड्यासारख्या गूढ गोष्टी जाणत नाही. मी व्यक्तीला जागच्या जागी थांबवणं, तिला मोहिनी घालणं, तिचं उच्चाटन करणं, अशा वेदातील म्हणजेच या संदर्भात अथर्ववेदातील विद्या जाणत नाही. तुका नरकात वास्तव्य करणाऱ्या म्हणजे दुर्गतीला जाणाऱ्या या लोकांसारखा वेडा नाही.
असाध्य ते साध्य । करिता सायास । कारण आभ्यास । तुका म्हणे।।

मोक्ष -
मोक्षप्राप्ती बद्दल  तुकाराम महाराजांचे काय विचार होते आणि त्यांना मोक्षाची अभिलाषा होती का नव्हती हे पुढील अभंगावरून स्पष्ट होते.
सांडूनी सुखाचा वाटा । मुक्ती मागे तो करंटा ।।
का रे न घ्यावा जन्म । काय वैकुंठी जाऊन ।।
येथे मिळतो दहीभात । नाही वैकुंठी ते मात ।।
तुका म्हणे न लागे मुक्ती । राहीन संगे संताचिया।।
सुखाचा वाटा सांडून जो मुक्तीची अपेक्षा करतो तो दुर्देवी आहे, वैकुंठी जाऊन काही लाभ होणार नाही इथे जे आहे त्याला वैकुंठी मात नाही, मला मुक्तीची गरज नाही मी संतांच्या संगतीतच राहीन.

तुकाराम महाराजांनी मोक्षपद फक्त नाकारलेच नाही तर ते लाथाडले आहे. त्याचबरोबर त्यांनी वैदिक परंपरेतील मोक्षाचे अतिउच्च पद सायुज्याता हे ही नाकारले आहे.
भय नाही जन्म घेता । मोक्षपदी हाणो लाथा ।
तुका म्हणे आता । मज न लगे सायुज्याता ।।

मोक्षपद प्राप्त नाही झाले तर मुक्ती न मिळून जन्माच्या चक्रात अडकावे लागते असे जे सांगितले जाते त्याबाबतीत बोलताना तुकाराम महाराज म्हणतात मोक्षपद नाकारले असल्याने पुन्हा पुन्हा जन्म घेणे आम्हाला मान्य आहे.
मोक्षपद तुच्छ केले याकारणे । आम्हां जन्म घेणे युगायुगी

मृत्यूची चाहूल -
विज्ञाननिष्ठ, यत्नवादी आणि समतेवर आधारित असलेले तुकाराम महाराज यांचे विचार तत्कालीन धर्मव्यवस्थेला रुचणारे नव्हते म्हणूनच त्यांचा छळ होत होता. पुढील काही अभंगातून त्यांना अपल्यावरती हल्ला होईल, जीवेमारण्याचा प्रयत्न केला जाईल याची जाणीव झाली होती हे स्पष्ट होते.

 संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकोबांबद्दल लिखाण केलं आहे. देहूमध्ये मंबाजी गोसावी, तुकाराम महाराज आणि त्यांच्या अनुयायांचा कसा द्वेष करत होते, याविषयी संत बहिणाबाईंनी लिहिलं आहे.
तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं॥ बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं॥
मंबाजी गोसावी त्यांचा कशाप्रकारे छळ करत होता याचा उल्लेख शासनाने प्रकाशित केलेल्या गाथेत गाथा क्रमांक ३५५ ते ३६७ मध्ये उपलब्ध आहे.

लावूनि कोलित। माझा करितील घात॥
ऐसें बहुतांचे संधी। सापडलों खोळेमधीं॥
पाहतील उणें। तेथें देती अनुमोदनें॥
हे दुष्ट लोक पेटलेले कोलीत लावून माझा घात करतील. अशा लोकांच्या तावडीत मी सापडलो आहे. माझ्यात काही उणे दिसले की घात करणाऱ्यांना अनुमोदन देतील.

शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ।
तुका म्हणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ।।
माझ्या देहाची शास्त्रधाऱ्यांनी शंभर तुकडे जरी केली तरी मी घाबरणार नाही, मी माझ्या बुद्धीला आधीच येणाऱ्या संकटाबाबतीत जाणीव करून देऊन सावध केले आहे.

रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ।। जीवाही आगोज पडती आघात । येउनिया नित्य नित्य करी ।। तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे। अवघियांचे काळे केले तोंड ।।
रात्रं दिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे, आत मनाशी आणि बाहेर जगाशी,  जीवावर आघात होत आहेत, तुझ्या (विठ्ठलाच्या) नावाच्या बळाने मी अशा लोकांशी लढत आहे.

धर्मविरोधी कृत्य केल्याचा आरोप -
त्याकाळात वेदप्रामाण्य, वर्णव्यवस्था, कर्मकांड, मोक्ष, चमत्कार आदींचे प्रस्थ होते. धर्मव्यवस्थेला यांच्या आधारेच बळकटी मिळत होती. तुकाराम महाराजांनी याच सर्व गोष्टी नाकारल्याने आणि या विरोधात भूमिका घेतल्याने धर्ममार्तंड त्यांच्या विरोधात उभे राहिले. त्यांची धर्मपीठाकडे तक्रार केली गेली. वर्णव्यवस्थेनुसार अधिकार नसताना लोकांना धार्मिक उपदेश करत असल्याचा, अभंग लिहल्याचा आणि ब्राम्हणांना शिष्य करून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर धर्मपीठात करण्यात आला. दोषी ठरवून अभंग न लिहण्याची, लिहलेले अभंग इंद्रायणीत बुडविण्याची, संपत्ती जप्त करण्याची आणि गावातून बहिष्कृत करण्याची शिक्षा करण्यात आली. तुकाराम महाराजांनी शिष्या मान्य नाही केली, तेरे चौदा दिवस धरणे दिले अन्नत्याग केला. गावही त्यांच्या सोबत उभा राहिला त्यामुळे शिक्षा अंमलात येऊ शकल्या नाहीत.


सदेह वैकुंठ गमन -
तुकाराम महाराज फाल्गुन वद्य द्वितीयेला शके १५७१  (९ मार्च १६५०)  ला सदेह वैकुंठाला गेले असे अनेक चारित्रकारांनी लिहून ठेवले आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असे मानणारा आणि त्यावर श्रद्धा ठेवणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे अस्तित्वात आहे.
सदेह वैकुंठगमनाचा उल्लेख राज्याभिषेक शके ३०च्या देहूगावच्या सनदेत ही आहे असं श्रीधरमहाराजांनी लिहिलं आहे. 'तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.' वैकुंठात सुखरूप असल्याचे पाच दिवस तुकाराम महाराज पत्रही पाठवत होते आणि त्यानंतरही त्यांनी काही अभंग लिहले असाही उल्लेख आढळतो. यावरून स्पष्ट होते की पुष्पक विमानात बसून त्यांना सदेह वैकुंठाला जाताना कोणीही पाहिले नव्हते. आणि ज्याअधारे रामेश्वरशास्त्रींनी सदेह वैकुंठाला गेले असल्याचा निर्णय दिला (म्हणजेच आकाश मार्गे त्यांचे पत्र आणि सामान आले) हा आधार तर्कावर टिकणारा नाही. त्यामुळे या सर्वच गोष्टी संशयास्पद ठरतात.

कुटुंबाची परवड -
तुकाराम महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी देहू सोडावी लागली त्यांच्याही जीवाला धोका होता हे कान्होबांच्या पुढील दोन अभंगावरून स्पष्ट होते.
माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनि ॥
काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥
ज्या कुटुंबातील व्यक्तीला विमान पाठवून स्वतः ईश्वराने बोलवून घेतले त्या कुटुंबाचा किती गौरव केला गेला पाहिजे, त्या कुटुंबातील सदस्यांना किती मानपान मिळाला पाहिजे पण प्रत्यक्षात तसे काहीही न घडता त्यांना गाव सोडून निघून का जावे लागले? आणि ज्या व्यक्तीमुळे देहूला ओळखले जात होते त्याच देहूत तुकाराम महाराजांचे वृंदावन २१ वर्षानंतर का बांधण्यात आले? हे प्रश्न महत्वाचे ठरतात.

          वरील सर्व गोष्टींवरून तुकाराम महाराजांच्या हत्येची शक्यता अधिकच दृढ होते. असे असले तरी त्यांच्या हत्येचे ठोस पुरावे उपलब्ध नसल्यामुळे हत्त्याच झाली असे ठामपणे सिद्ध करता येत नाही. आज तीनशे साडेतीनशे वर्षांनंतरही तुकाराम महाराजांचा अंत कसा झाला हे स्पष्टपणे उलगडू शकले नाही ही आपल्या सर्वांसाठीच खेदाची बाब आहे. तटस्थपणे याबाबतीत संशोधन होणे गरजेचे आहे. आपल्या विवेकाचा वापर करून तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या साहाय्याने या प्रश्नाचे उत्तर शोधणे हा एकच मार्ग सध्यातरी यासाठी उपलब्ध आहे.

           ज्यांनी आपले संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले, लोकांना सुखाचा आनंदाचा सन्मार्ग दाखविला, मानवतेची शिकवण दिली त्यांचा त्यांच्या हयातीतच छळ का केला जात होता? त्यांच्या कार्यात अडथळे का निर्माण केले जात होते? आणि त्यांचे विचार संपविण्याचा प्रयत्न का केला जात होता? तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व चुकीच्या पद्धतीने का मांडले गेले? त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्य आणि विचारांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून ते अध्यात्मापुरतेच मर्यादित असल्याचे चित्र का निर्माण केले गेले? या सर्व प्रश्नांचा प्रामाणिकपणे शोध घेतल्यास जातिव्यवस्थाच याच्या मुळाशी आहे असे आपल्या लक्षात येते.

     तुकाराम महाराजांचे विचार हे सर्व मानवजातीसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत. म्हणूनच जात, धर्म, भाषा, राज्य, देश यांसारखी बंधने तोडून ते जगभरात पोहचत आहेत. आपल्या मनातील सर्व प्रकारच्या विषमतेची जळमटे दूर सारून या मातीवरती या भाषेवरती तुकाराम महाराजांनी जे मानवतेचे संस्कार केले आहेत त्यांच्यासोबत एकरूप होऊन स्वतःचा आणि समाजाचा उत्कर्ष साधणे ही या काळाची गरज आहे.