- अधिकृत व सुरक्षित वेबसाईट आणि अँप वरच आपली वैयक्तिक माहिती द्यायची ती ही जेवढी गरजेची आहे तेवढीच म्हणजे स्टार मार्क असलेली.
- वेबसाईट http ने सुरू होतीय की https ने हे चेक करायचं https ने जर वेबसाइट सुरू होत असेल तर ती सिक्युर आहे. सुरक्षित नसलेल्या वेबसाईटवर माहिती देणे टाळायचं.
- क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड डिटेल्स सेव्ह करण्याचा जो पर्याय वेबसाईट किंवा अँपवर असतो त्याचा उपयोग करायचा नाही.
- एकच पासवर्ड अनेक वेबसाईट किंवा अँप साठी वापरायचं नाही आणि पासवर्ड लक्षात राहायला सोपं असं नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रॉंग असे निवडायचे.
- पासवर्ड रिकव्हरीसाठी किंवा सुरक्षेसाठी सेक्युरिटी प्रश्न निवडताना सोप्या प्रश्नांची निवड न करता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य अशा प्रश्नांची निवड करायची. आणि जे आपण प्रश्न निवडतोय त्यासंबंधीत माहिती सोशल मीडियावर शेयर नाही करायची. ( उदाहरणार्थ एखाद्याने सेक्युरिटी प्रश्नांसाठी तुमच्या आवडत्या प्राण्यांचे नाव किंवा तुमचे टोपण नाव किंवा आईचे नाव असे प्रश्न निवडले तर सायबर गुन्हेगारांना तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरून ही माहिती सहज उपलब्ध होऊ शकते आणि तुमची माहिती चोरी होऊ शकते)
- आपली लोकेशन सुरक्षित ठेवण्यासाठी व्हीपीएन चा उपयोग करायचा.
- मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम आणि कॉम्पुटरचे सॉफ्टवेअर नेहमी अद्ययावत (अप टू डेट) ठेवायचे.
- ओटीपी हा आपल्या इंटरनेट वरील आकाउंटच्या सुरक्षिततेसाठी असतो त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत कोणासोबत शेयर नाही करायचा. आणि ओटीपी साठी बँक किंवा कंपनीकडून कधीच विचारणा केली जात नाही जो काही व्यवहार आहे तो पोस्टाने किंवा ई-मेल आयडीच्या माध्यमातून केला जातो.
Translate
Sunday, May 30, 2021
तुमची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर खरंच सुरक्षित आहे का?
Saturday, May 29, 2021
संस्कृती वृक्ष संवर्धनाची
Saturday, May 15, 2021
कर्णन - समाजातील विषमतेचे वास्तव मांडणारा चित्रपट.
स्वातंत्र्याला सात दशके उलटून गेली तरीही विषमतेवर आधारित जातीव्यवस्था ही भारतीय समाजात ठाण मांडून आहे हे वास्तव दाखविण्याचे, जाहिरपणे त्यावरती भाष्य करण्याचे आणि त्याचा विरोध करण्याचे धाडस लोकशाहीचा चौथा खांब असलेली मीडिया आजही करण्यास धजावत नाही तेच धाडस "कर्णन" या तमिळ मेन्स्ट्रीम चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाभारत या पौराणिक कथेतील पात्रे आणि संदर्भ यांच्या आधारे पण वेगळ्या निष्कर्षांसह ही कथा मांडण्यात आली आहे. जातीच्या उतरंडीमध्ये अडकलेला, अज्ञानाच्या बंधनात आणि गुलामगिरीच्या बेड्यात अडकलेला समाज जो पुढे बरोबरीची संधी मिळाल्यावर आपल्या क्षमतांच्या आधारे उन्नतीच्या दिशेने कशी वाटचाल करतो याचे अतिशय वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात केले गेले आहे
रस्त्याच्या मध्ये फीट येऊन पडलेली सात ते आठ वर्षाची मुलगी जिच्या आजूबाजूने अनेक बस गाड्या निघून जातात पण कोणीही तिच्या मदतीसाठी थांबत नाही आणि शेवटी पायाच्या टाचा घासून तोंडात फेस येऊन ती जीव सोडते, काळजाचा ठाव घेणाऱ्या या दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. या मुलीच्या मदतीसाठी कोणी का थांबले नाही या सामान्य प्रश्नाचं उत्तर म्हणजेच या चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटाची कथा हीच या चित्रपटाचा नायक वाटते इतकी ती शक्तिशाली आहे. 1997 मधील घटनेवर आधारित तामिळनाडू येथील कोडीयनकुलम या गावातील गरीब आणि जातीप्रथेने शोषित गावकऱ्यांनी बरोबरीचे अधिकार मिळविण्यासाठी जातिव्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची ही कथा आहे.
जातीव्यवस्थे नुसार जरी अस्पृश्य ठरविले गेले असले तरी या गावातील लोकं कष्ट करून स्वाभिमानाने, बंधुभावाने, स्वतःची संस्कृती, वेगळी ओळख जपत ताठ मानेने जगत असतात. हिच गोष्ट शेजारच्या मेलूर गाववाल्याना मान्य नसते अस्पृश्यांनी नेहमी त्यांच्या वर्चस्वाखालीच राहिले पाहिजे असे त्यांना वाटत असते म्हणूनच त्यांना कायम आपल्यावरती निर्भर ठेवण्यासाठी कोडीयनकुलम मध्ये बस स्टॉप बांधू दिला जात नाही आणि बस ही थांबू दिल्या जात नाहीत. पुढे एका सीनमध्ये जातीवादी पोलीस एसपी गावकऱ्याची नावं दुर्योधन, अभिमन्यू अशी उच्च वर्णीय असल्याने, तसेच त्याच्यासमोर त्यांनी डोक्यावरची पगडी न काढल्याने व त्याला स्पर्श केल्यामुळे गावकऱ्यांवर अत्याचार करतो. वरवर जरी हा संघर्ष आपल्याला दोन गावातील किंवा काही लोकांमधील वाटत असला तरी तसे अजिबात नाही. हा संघर्ष अनेक पिढ्यांचा आहे. स्वातंत्र्यानंतरही संवैधानिक पदांवर बसून जातीयतेच्या मुखवट्या आडून गरीब दुर्बल लोकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांविरुद्धचा हा संघर्ष आहे. जो आपण आजही वृत्तपत्रे, न्युज चॅनेल यांच्या माध्यमातून रोज पाहतो.
दिग्दर्शक मारी सेल्वराज यांनी कथा ज्या पद्धतीने पडद्यावर उतरवली आहे आणि प्रत्येक पात्राला कथेच्या माध्यमातून जो न्याय दिला आहे त्याला तोड नाही. कर्णन, द्रौपदी, दुर्योधन, अभिमन्यू आणि इतर पात्रांच्या आधारे महाभारताला समांतर अशी जी कथा उभी करतात ती उलट असूनही आपल्याला बरोबर वाटते. सिनेमॅटोग्राफी हे एक या चित्रपटाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. ग्रामीण भागातील प्रतीकं, चित्रपटातील प्राण्यांचा वावर, मुखवट्याचे रूपक यांच्या आधारे कथानकाचे बारकावे मांडण्याचा जो विचारपूर्वक प्रयत्न केला गेला आहे तो अतिशय प्रशंसनीय असा आहे. पुढचे दोन पाय बांधलेले गाढव, कोंबडीच्या पिलाला उचलून नेणारी घार, जेवणाच्या ताटाभोवती फिरणारे मांजर, मुखवटा घातलेली लहान मुलगी, धड नसलेली देवता, धड नसलेले भिंतीवरील चित्र यांची प्रासंगिकता आपल्या स्मरणात राहते. आपण चित्रपट नाही तर त्या गावातील वास्तविक जीवनच पडद्यावर पाहत आहोत असेच आपल्याला वाटत राहते.
अभिनयाच्या बाबतीत प्रत्येक कलाकाराकडून आपापले पात्र हे सशक्त पद्धतीने उभे केले गेले आहे त्यामुळे छोट्या भूमिका असलेली पात्रही लक्षात राहतात. धनुषने कर्णनची व्यक्तिरेखा इतक्या वास्तविकपणे आत्मसात केली आहे की पडद्यावर आपल्याला फक्त कर्णन दिसतो धनुष्य कुठेही दिसत नाही. जराही फिल्मी नसलेला सामाजिक आणि वैयक्तिक बाबींमुळे रागात असणारा, आपल्या लोकांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यास तत्पर असणारा नायक धनुषने अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. अभिनेता लाल यांनी साकारलेला कर्णनचा मार्गदर्शक, सुख दुःखातील सोबती येमन आणि नटराजन यांनी साकारलेला उच्च वर्णीय जातीयवादी पोलीस एसपी या भूमिकाही अतिशय दमदार झाल्या आहेत. प्रसंगानुसार वेगवेगळी पात्रे हिरो ठरत असल्याचे आपल्याला दिसून येते.
चित्रपट आणि वास्तव यातील अंतर विसरण्यास भाग पाडणारा कर्णन हा तामिळ चित्रपट पाहून याबाबत लिहण्या पासून व्यक्त होण्यापासून स्वतःला रोखता आलं नाही. हा चित्रपट पाहताना आपणही या वास्तवाचाच भाग आहोत हा विचार मनात घर करून जातो. हा चित्रपट पाहताना मराठीतील फँड्री आणि ख्वाडा या चित्रपटांची आठवण होते. या चित्रपटाबाबत मी जे विचार मांडले आहेत त्याच्याशी प्रत्येकजण सहमत होतीलच असे नाही पण सामाजिक प्रश्नावरती वेगळेपणाने भाष्य करणारी ही कलाकृती आहे याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही हे निश्चित.