Translate
Wednesday, January 26, 2022
भारतीय प्रजासत्ताक दिन - लोकशाहीचा स्थापना दिवस
Wednesday, January 12, 2022
स्वामी विवेकानंद - विवेकावर आधारित विचारसरणी असणारे विचारवंत
Saturday, January 8, 2022
फातिमा शेख - पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका
Sunday, January 2, 2022
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले - एक विचारधारा
१८४८ च्या आधीही विद्येची देवता सरस्वती असल्याचे मानले जात होते तरीही स्त्रियांना विद्या घेण्याची अनुमती नव्हती. त्यांचे आयुष्य चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होते. धर्माच्या नावाखाली त्यांचे माणूसपण नाकारून गुलामासारखी वागणूक दिली जात होती. घरातून बाहेर पडण्याची, शिक्षण घेण्याची, आपले स्वतंत्र विचार मांडण्याची, जीवनपद्धती निवडण्याची असे कोणतेही अधिकार त्यांना नव्हते. अशा परिस्थितीत स्त्रियांची मदत करायला कोणी देवता नाही तर एक स्त्रीच पुढे सरसावली आणि त्या म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले.
समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी स्त्रियांनी ज्ञान मिळविणे हे अत्यंत गरजेचे आहे असे महात्मा फुले यांचे मत होते त्यामुळेच त्यांनी त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून सावित्रीबाईंना शिक्षित करून केली. सावित्रीबाई यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे महात्मा फुले यांच्याकडून मिळाले पुढील शिक्षण त्यांनी सखाराम परांजपे आणि केशव भावळकर या महात्मा फुले यांच्या सहकाऱ्यांकडून घेतले. सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कुलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षण ही घेतलं अशी नोंद तत्कालीन दस्ताऐवजामध्ये आपल्याला पहायला मिळते.
धर्म, रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा याच्या गाळात रुतून बसलेलं स्त्रीमुक्तीचं चक्र हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नांतून आणि अविरत परिश्रमातून गतिमान झाले आहे म्हणूनच त्यांना भारतीय स्त्री उद्धाराचे जनक म्हंटले जाते. फुले दाम्पत्याने १ जानेवारी १८४८ मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि सावित्रीबाई फुले या आपल्या देशाच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. असे असले तरीही सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्त्वची ओळख ही फक्त स्त्रियांच्या शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित स्वरूपाचे नसून ती आधुनिक भारताच्या जडणघडणीतील परिपूर्ण अशी एक विचारधारा आहे. त्यांच्या याच विचारधारेच्या विविध पैलूंची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
शिक्षणतज्ञ - फक्त साक्षर करणे हा शिक्षण देण्यामागचा त्यांचा हेतू नव्हता तर ज्ञान मिळवून प्रत्येकाने सर्वांगीण विकास साधावा यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. शाळा कशी असावी, अभ्यासक्रम कसा असावा, मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कसं वाढवलं पाहिजे, मुलांची गळती कशी थांबवावी, शिक्षकांना प्रशिक्षण देणे याबाबत जे त्यांचे विचार आहेत त्यावरून त्या फक्त शिक्षिका नाही तर शिक्षणतज्ञ होत्या हे स्पष्ट होते. कौशल्यावर आधारित शिक्षण, मध्यान्ह जेवण, वसतिगृह, शिष्यवृत्ती, प्रौढशिक्षण या ज्या गोष्टी सध्या शासनाकडून राबविण्यात येतात त्या त्यांनी त्यावेळेस त्यांच्या शाळेत अंमलात आणल्या होत्या. १८४८ ते १८५२ पर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी एकूण १८ शाळा सुरू केल्या. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली तेव्हा १२ फेब्रुवारी १८५२ मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले.
समाजसुधारिका - त्याकाळात धर्माच्या नावाखाली जे कर्मकांड केले जायचे त्याला विरोध करणे म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेणे अशी परिस्थिती होती तरीही सावित्रीबाईंनी सतीप्रथा, विधवा केशवपन यांसारख्या अमानुष प्रथांचा कडाडून विरोध केला. विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंधकगृह, आंतरजातीय विवाह यांच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना अमानुष प्रथांच्या जोखडातून मुक्त केले. त्याकाळात जातीच्या आधारे वर्णव्यवस्थेने शूद्र (मांग, महार आदी) ठरविलेल्या लोकांवर धर्ममार्तंडांकडून अमानवीय अन्याय अत्याचार केले जात होते त्यालाही त्यांनी विरोध केला. त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करून अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले. हे करत असताना धर्माच्या ठेकेदारांकडून धर्म बुडविण्याचा आरोप करून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला गेला पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. पुढे काशीबाई या ब्राम्हण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. शिक्षित करून डॉक्टर बनविले. त्याचा आंतरजातीय विवाह घडविला. जोतीरावांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि अंत्यसंस्कार केले. महात्मा फुले यांच्या पश्चात सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले.
साहित्य - सावित्रीबाई यांचं साहित्य हे स्वप्नरंजक नसून ते वास्तवदर्शी आहे. शिक्षणाचं महत्व सांगणारं, अंधश्रध्देच्या विरोधातलं, निसर्गसोबतचं नातं सांगणारं, अन्यायाची जाणीव करून देणारं, जगायला आणि जगवायला शिकवणारं असं त्यांचं साहित्य आहे. सावित्रीबाई या समाजभान असणाऱ्या कवयित्री होत्या हे त्यांच्या कवितांच्या विषयांवरून सहज स्पष्ट होते. त्यांचा "काव्यफुले" हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झालेला होता. या कवितासंग्रहात एकूण ४१ कवितांचा समावेश आहे. ज्यामध्ये बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी छत्रपती ताराबाई यांचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आहे. "बावन्नकशी सुबोध रत्नाकर" हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह १८९२ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. यामध्ये जोतिरावांकडून आपल्याला कशी प्रेरणा मिळाली हे व्यक्त करून देशाचा प्राचीन काळापासूनचा सामाजिक इतिहास काव्यस्वरूपात थोडक्यात पण अचूक सांगितला आहे. "सावित्रीबाईंची भाषणे आणि गाणी" या पुस्तकात त्यांची भाषणे आहेत. त्यांच्या भाषणांचे विषय उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने आणि कर्ज असे होते. यात त्यांनी या विषयांचे महत्व सांगून यावर आपल्या देशाचे भवितव्य कसे अवलंबून आहे हे स्पष्ट केले आहे. याचबरोबर महात्मा फुले यांची भाषणे त्यांनी संपादित केली आहेत. महात्मा फुलेंना सावित्रीबाई यांच्याकडे असलेल्या ग्रंथसंपदेवरून त्यांचा विद्याव्यासंगाची कल्पना येते. त्यांना खगोलशस्त्रासारख्या विषयात ही रस होता हे त्याच्या उपलब्ध असलेल्या टिपणांतून दिसून येते.
आपल्या गरीब विद्यार्थ्यांची शाळेत, विधवा ब्राम्हण महिलांची बाळंतपणात ज्याप्रकारे त्या काळजी घेत त्याचप्रकारची करुणा त्यांनी दुष्काळ आणि प्लेगने पीडित लोकांप्रति दाखवली प्रसंगी जीवाची पर्वा न करता त्यांच्या मदतीला त्या धावून गेल्याचे दिसून येते. 1876-77 मधला दुष्काळ हा एकोणिसाव्या शतकातला सर्वांत भीषण दुष्काळ मानला जातो. या दुष्काळात सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत गावोगाव फिरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे काम करत होत्या. दुष्काळाची भीषणता, तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि इंग्रज सरकारला याबाबतची करून दिलेली जाणीव याबाबतची माहिती त्यांनी महात्मा फुले यांना २० एप्रिल १८७७ रोजी लिहलेल्या पत्रावरून कळते. १८९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. सावित्रीबाईंनी आपला डॉक्टर मुलगा यशवंत याला बोलावून घेतले आणि लोकांवर उपचार सुरू केले. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहिती असूनही त्या रुग्णांची देखभाल करत होत्या, लोकांना मदत करत होत्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत त्या लोकांसाठी जगल्या आपलं संपूर्ण आयुष्यच त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी अर्पण केले.
आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवत आहेत. यामागे सावित्रीबाईंची विचारधारा आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आणि त्याप्रति नेहमीच कृतज्ञ राहिलं पाहिजे.
संदर्भ -
१. सावित्रीबाई फुले समग्र वाङमय, महाराष्ट्र शासन, डॉ.मा.गो. माळी.
२. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, प्रा. हरी नरके.