Translate

Sunday, May 22, 2022

माझ्या गावाकडच्या गोष्टी : भाग ५ - "ओ नुक्त्या वाढा की..."


सकाळपासून कर्ण्यांवर(जर्मनचा भोंगा) वाजणाऱ्या गाण्यांच्या आवाजानं गावात लगीन असल्याची खबर समद्यान पातूर पोचवली व्हती. शेवटी उटल्यामुळं म्हाळवदावर डोळे चोळीत हाथरूनाच्या घड्या घालताना, गावात जायच्या रस्त्याला लागून असलेल्या पिठाच्या गिरणी जवळ मारलेला रंगीत मांडव नजरेस पडला. मांडवावरन् तर मोठ्या घरचं लगीन वाटत व्हतं. या रस्त्याला खेटून एक आडवा रस्ता व्हता जो एका बाजूनं पाटीकडं (एसटी थांबा) अन्  दुसऱ्या बाजूनं सरळ खाल्लाकडं जातं व्हता. हा आडवा रस्ता म्हंजी गावाला अन् म्हारवाडा, मांगवाडा यासनी शेपरेट करणारी बार्डर व्हती. 

वऱ्हाड कुटचं हाय, वाजंत्री कुटली हाय, कुणा कुणासनी सांगावा हाय, जेवायला काय काय केलंय याचीच चर्चा म्हाताऱ्या व मोठ्या माणसांत सुरू व्हती. म्हारवाड्यात तर लगीन असलं की रातीपासूनचं पारावरचा समाजमंदिर गजबजून जायचा. गर्दिनं समाजमंदीरा पुढचं भलंमोठं पटांगण बी लहानसं वाटू लागायचं. मांडवाचं अन् जेवणाच्या कामांची लबगब रातीपासूनच सुरू व्हायाची. घरचं लगीन असल्या प्रमाणंच समदी कामं करायची. मग त्यात लहानथोर असा भेद दिसायचा न्हाय. भीमनगर तरुण मंडळातील पोरं तर दिसभर पायात भिंगरी बांधल्यापरी फिरताना कामं करताना दिसायची. कर्ण्यांवर वाजणाऱ्या भीमगीतांनी वातावरण अजूनच उत्साहानं भरून जायाचं. भन्तेंनी (भिक्खू) एकदा साधू साधू म्हंटलं की पंगतीची वर्दळ सुरू व्हायची. पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या (ताट) द्रोण (वाट्या) भाजी वाढायच्या बादल्या, चपाती आणि नुकत्या साठीचे टोपले याची मांडामांड हुईपातूर पाठीला पाठ लावून चार पाच पंगती तयार असायच्या. बरोबरीनचं आयेराचा कार्यक्रम बी चालू व्हायचा. मुलीचा मामा...मुलीचा मामा जिथं आशील तिथुन माईकशी संपर्क साधावा हे वाक्य तर हमखास कानावर पडायचंच. वऱ्हाडींनी आणि बाहेरगावच्या सोयऱ्यांनी आदी जेवून घ्यावे ही विनंती पुन्हा पुन्हा केली जायची. नवरदेवास आत्याकडून एक स्टीलची पाण्याची टाकी अन् पितळची घागर, नवरीमुलीस स्टीलचा हंडा, अमुक कडून एकशे एक रोख रुपये आहेर, तमुक कडून आकरा रुपये रोख आहेर असा पुकारा (अनॉसमेंट) लंय वाडुळ पातूर सुरू राहायचा. ओ मामा नुक्त्या (बुंदी) वाढा की..., ओ पाव्हणं इकडं जरा भात भाजी वाढ की, तिकडं पत्रावळ्या दिल्या न्हायती बघा अजून, येगळं येगळं कशाला बसुलालावं एकाच पत्रावळीत खावा की, समदं समपायचं काय उरवायचं न्हाय (असं लहान लहान पोरास्नी भरला जाणारा दम) अशा आरोराळ्यांनी साऱ्या मांडवात एकच गलका उडालेला असायचा. सांच्याला परत कोण राहिलंय का याची विचारपूस केली जायाची आणि जे थकलेले म्हातारे कोतारे असायचे त्यांना जेवणाची पत्रावळी घरपोच दिली जायची.

बैलांना पाणी वैरण करून आम्ही गोठयाकडे गप्पा मारत बसलो होतो. गोठ्या मागच्या रस्त्याकडून गावात जाणारी वर्दळ वाढत होती. मधूनच फटफटीचा आवाज आला तसा ती बघायला पोरांचा घोळका धावला पण उडणाऱ्या फफुटया शिवाय त्यांना काही दिसलं नाही. माईकवरची लगबग वाढायला लागली तसं अक्षताचा टाईम झल्याचं समजत व्हतं. पण गावातलं लगीन आसल्यामुळे मोजकीच मोठी माणसं इकडून अक्षताला जायाची कारण सगळ्यांना पत्रिका नसायची. मात्र आण्णाला खास आवतान असायचं अन् पत्रिका बी दिली जायाची. आण्णा लग्नाला जायचे रोख आहेर करायचे मात्र घरी येऊनच जेवायचे. अण्णांचा वाड्यात अन् म्हारड्यात जसा दरारा होता तसाच गावातल्या माणसांत ही मान होता. गावातल्या प्रतिष्ठित लोकांत आण्णाचं उटणं बसणं होतं. शेताला घरासमोरून जाताना 'का करलालेत पंच', 'पंच हायती का घरात' असा आवाज द्यायची आणि आण्णांची भेट घेऊन पुढे जायची.

गावातल्या पंगती उठू लागल्या तशा बाकीच्यांना बोलावलं जाऊ लागलं. तसं म्हारवाड्यातली मांगवाड्यातली लोकं ताम्हण (ताट), गिलास अन् वाटी घेऊन जाताना दिसु लागली. तेव्हा मी त्या वेळेस पाचवी सहावीत असेन. सगळेजण ताटं का घेऊन चाललेत  असा प्रश्न माझ्या मनात घोळू लागला, मी विचारलंही पण आपल्यालाच न्यावं लागतंय एवढंच उत्तर मला मिळालं. शहरातल्या लग्नांमध्ये असा कधी अनुभव आला नसल्याने मला ते काहीतरी वेगळं वाटत होतं. आमचा लहान पोरांचा ग्रुप निघाल्यावर लग्नातल्या जेवणाच्या ओढीने मी ही गेलो त्यांच्या संगतीने ताट घेऊन. मळक्या पट्टीवर दाटीवाटीनं आमची पंगत बसली. वाढायला सुरुवात झाली. एक एक जिन्नस संपत चालला होता.भात भाजी चपाती सगळ्याच्या ताटात वाढली पण सगळ्यांची नजर नुक्त्या वाढणाऱ्याकडेच, बराच वेळ तो दुसऱ्याच पंगतीला वाढायलेलं बघून आमच्यातल्या एकानं आवाज दिला. 'ओ नुक्त्या वाढा की इकडं...' तसा तो वाढणारा खेकसला 'दम काढ गा जरा, युवलालावं'. पंगतीत वाढणाऱ्याला आवाज देणं  आणि त्यांच खेकसनं सुरूच होतं. आम्ही नंतर लाजून आवाज देत नव्हतो वाढणारा आसपास आला की इथं बी थोडं द्या म्हणायचो. दुसऱ्या पंगतीपेक्षा आम्हाला वेगळी वावणूक दिली जात होती हे आमच्या लक्षात आलं. हात धुवून अंगावरच्या कपड्याला हात पुशीत आम्ही घरचा रस्ता धरला. परत गावातल्या लग्नात जेवायला आम्ही कधी गेलो नाही कारण पारावरच्या समाजमंदिरातल्या लग्नात हक्काने ताव मारण्यात जो आनंद होता तो तिथे मिळायचा नाही.

(म्हारवाड्याचा आज भीमनगर झालाय अन् शिक्षणामुळे गावात सगळ्यांना मानसन्मान मिळतोय इतकंच नाही तर गावचा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच भीमनगरमधून होतोय बाबासाहेब हे फक्त तुमच्यामुळेच.....)



Saturday, May 21, 2022

वृक्षारोपण अत्यावश्यकच आहे मात्र ते पर्यावरणाला अनुसरून झाले पाहिजे.


Credit: kwest/Shutterstock.com

हवामान बदल म्हणजेच 'क्लायमेट चेंज' ही संपुर्ण जगासमोरील सर्वात गंभीर अशी समस्या बनली आहे. मागील काही दशकांपासून या समस्येच्या परिणामांची दाहकता ही वाढतच चालली आहे. वाढते तापमान, कधी अतिवृष्टी तर कधी अल्पवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळे, हवामानातील टोकाचे बदल इत्यादींचा अनुभव सारी सजीव सृष्टी घेतच आहे. त्यामुळेच गावपातळी पासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठीच्या उपाययोजना राबविल्या जात  आहेत. युनायटेड नेशन्सने स्थापित केलेल्या IPCC (intergovernmental panel on climate change) या संस्थेच्या माध्यमातून या समस्येचे वैज्ञानिक मूल्यमापन करून यावर काम केले जाते. एकूण १९५ देश या संस्थेचे सदस्य आहेत यात भारताचाही समावेश आहे. असे असले तरी अजूनही या समस्येवरिल उपाययोजना ह्या अपुऱ्याच ठरत आहेत.

क्लायमेट चेंज या समस्येच्या निराकरणासाठी ज्या महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यातील एक प्रमुख उपाय म्हणजे 'वृक्षारोपण' होय. जवळपास जगातील सर्वच देशांकडून वृक्षारोपणाच्या मोहिमा मोठया प्रमाणात आखल्या जात आहेत. जेणेकरून वातावरणातील कार्बन उत्सर्जन नियंत्रित करून या समस्येपासून जगाला वाचवता येईल. भारत, इथोपिया, तुर्की या देशांच्या नावे एका दिवसात, बारा तासात आणि एका तासात सर्वाधिक वृक्षारोपण करण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. विशिष्ट वेळेत मोठ्या प्रमाणात लागवड करण्याच्या उद्देश पूर्तीसाठी, योग्य वाटतील ती किंवा जी उपलब्ध आहेत त्या रोपांची वृक्षारोपणासाठी निवड करणे आणि जिथं मोकळी जागा मिळेल त्या जागेत वृक्षारोपण करणे या दोन्ही गोष्टी अशा मोहिमांमध्ये सर्रास पणे केल्या जातात. त्यामुळे या मोहिमांचे आकडे जरी खूप मोठे म्हणजे मिलियन्स आणि बिलीयन्स मध्ये असले तरी काही अपवाद वगळता त्यांचा परिणाम मात्र हवा तसा होत नसल्याचे दिसून येत आहे. मोठया स्तरावर असेल किंवा लहान वृक्षारोपण मोहिमा अपयशी होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पर्यावरणाचा विचार न करता अयोग्य रीतीने केले जाणारे वृक्षारोपण हे आहे. 

योग्यरीत्या आणि पर्यावरणाला अनुसरून वृक्षारोपण करणे म्हणजे नक्की काय हे पुढील गोष्टींवरून स्पष्ट होईल. 

मोनोकल्चर पद्धतीचा अवलंब न करणे - मोनोकल्चर म्हणजे उपलब्ध जागेत एकाच प्रजातीच्या वृक्षांची लागवड मोठया संख्येने करणे. असे केल्याने त्या क्षेत्रात 'इकॉलॉजीकल डेड झोन्स' तयार होतात. म्हणजेच त्या भागातील पर्यावरणीय परिसंस्था हळू हळू मृतावस्थेत रुपांतरीत होते. ज्यामुळे तेथील जैवविविधता धोक्यात येते. हे टाळण्यासाठी वृक्षारोपण करताना एकाच प्रजातीची रोपे न लावता विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली पाहिजे. जशी निसर्गनिर्मित जंगलामध्ये असते.

देशी व स्थानिक प्रजातींचा समावेश करणे - ज्या भागात वृक्षारोपण करायचे आहे तेथील हवामान, माती आणि जमिनीनुसार रोपांची निवड करणे गरजेचे ठरते. जेव्हा देशी व स्थानिक प्रजाती ऐवजी दुसऱ्या प्रजातींची लागवड केली जाते तेव्हा बाहेरच्या प्रजातींचा नैसर्गिक अधिवास बदलतो त्यामुळे तेथील नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास त्या असर्मथ ठरतात. स्थानिक पर्यावरणाला त्या कोणत्याच प्रकारे अनुकूल ठरत नाहीत. या बाहेरील प्रजातींकडून जमिनीतील पोषकमूल्यांचा वापर अतिप्रमाणात केला जातो. ज्यामुळे स्थानिक प्रजातींच्या वाढीवर याचा परिणाम होऊन त्यांची संख्या घटत जाते. पशु, पक्षी, फुलपाखरू, कीटक, मधमाश्या यांसारख्या पर्यावरण परिसंस्थेतील घटकांसाठी या विदेशी प्रजाती निरुपयोगी ठरत आहेत. सोबतच जमिनीवर आणि नैसर्गिक जलस्रोतांवर याचा विपरीत परिणाम होतो. ग्लिरीसीडीया, निलगिरी, सुबाभूळ, सप्तपर्णी, गुलमोहर, रेन ट्री यांसारख्या विदेशी प्रजातींमुळे भारतीय पर्यावरण परिसंस्थेची सुरू असलेली हानी ही आपण अनुभवतोच आहे.

स्थानिक लोकांना सोबत घेणे - मोठ्या संख्येने आणि मोठ्या स्तरावर जेव्हा वृक्षारोपण केले जाते तेव्हा त्यांची दीर्घकालीन व्यवस्था (रोपांच्या संरक्षणाची, पाण्याची, खताची इ.) करण्या संदर्भात आयोजकांकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा मोहिमेअंतर्गत लावलेली रोपे जगण्याचं आणि त्यांची वाढ होण्याचे प्रमाण हे खूपच कमी असते. स्थानिक लोकांच्या सहभागामुळे या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. त्यांना तेथील वातावरणाची योग्य माहिती असल्यामुळे लावलेल्या झाडांची ते चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना दिली जाणारी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आणि त्यातून त्यांना काहीतरी आर्थिक फायदा होईल अशी सांगड घालणे गरजेचे आहे

विचारपूर्वक, जबाबदारीने आणि पर्यावरणासोबत समन्वय साधत केले गेलेले वृक्षारोपण हेच क्लायमेट चेंजच्या लढ्यात उपयुक्त ठरते हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. वृक्षारोपणासोबतच आहे ती जंगले वाचविण्यासाठी जास्त प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. कारण ही प्राचीन जंगले हे कार्बन स्टोरेजचे सर्वात मोठे स्रोत आहेत. जंगलतोड थांबवणे आणि आहे त्या जंगलाचं रक्षण करणे हे नव्या जगलांच्या निर्मितीपेक्षा अधिक सुलभ व कमी खर्चिक आहे. फक्त त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे, बाकी पर्यावरणीय बाबतीत ते पुर्णतः स्वालंबी आहेत. 

आपण सर्वांनीही वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होण्यापूर्वी किंवा अशा उपक्रमांना आर्थिक मदत करण्याआधी वरती अधोरेखित केलेल्या बाबींसह इतर ही काही गोष्टींची पडताळणी करणे गरजेचे आहे. जसं की, त्या मोहमेचे उद्देश काय आहे आणि त्या उद्देशांची पूर्तता कशाप्रकारे केली जाणार आहे, पर्यावरणा व्यतिरीक्त त्यांचा काही छुपा स्वार्थी अजेंडा आहे का, किती कालावधी पर्यंत ते केलेल्या कामाप्रति जबाबदार राहणार आहेत, आधी केलेल्या कामाची त्यांच्याकडे वैध नोंद आहे का, केलेल्या कामाचे त्यांच्याकडून योग्यप्रकारे डॉक्युमेंटेशन केले जाते का इत्यादी.

हवामान बदल ही समस्या फक्त वृक्षारोपणाने संपणारी नाही, त्यासाठी आपण सर्वांनी मिळून आपल्या गरजा नियंत्रित ठेवून पर्यावरण पूरक जीवनपद्धतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त ठरते.






Sunday, May 15, 2022

तथागतांची जंबूद्वीपातील रथयात्रा



इसवीसनपूर्व काळात संपुर्ण भारत जेव्हा बौद्धमय होता तेव्हा त्याचे नाव "जंबूद्वीप" होते. (सध्याच्या नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तिबेट, भुतान, म्यानमार या देशातील प्रदेशाचा समावेश जंबूद्वीपात होता) तसे उल्लेख बौद्ध लेण्यांमधील शिलालेखात आढळतात (कार्ला लेणीतील शिलालेखात, अशोककालीन शिलालेखात आणि चिनी प्रवाश्यांच्या वृत्तांतात याचा उल्लेख आहे). 

बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे शरीर धातू स्तूप, संघाराम यांच्या माध्यमातून जतन केले जाऊ लागले. रक्षा, केस, दात, कपोल धातू (कपाळाचे हाड) यांवर बांधलेला किंवा हे धातू ठेवलेला स्तूप आणि हे जतन करणारे चैत्यगृह बौद्ध धर्मातील पवित्र आणि महत्वपूर्ण वास्तू म्हणून स्थापित झाल्या. बुद्धांच्या विचारांच्या म्हणजेच धम्माच्या प्रसारासोबतच या वास्तूंमध्ये विविध उत्सव साजरे केले जात होते. यापैकी एक महत्वाचा उत्सव म्हणजे रथयात्रा.

चिनी प्रवासी फा-हियान इसवीसन ३९९ ते ४१४ या काळात जंबूद्वीपात वास्तव्यास होते. याकाळात त्यांनी पाहिलेल्या वास्तूंची आणि उत्सत्वाची सविस्तर माहिती नोंदवून ठेवली आहे. ज्यामध्ये मगध साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (सध्याचे पटना) येथील रथयात्रेचे वर्णन केले आहे. ते पुढीलप्रमाणे, 'सर्व मध्यप्रदेशात पाटलीपुत्र सर्वात मोठे शहर आहे. येथील लोक श्रीमंत आणि सुखी आहेत. सत्कृत्ये करण्यात ते एकमेकांशी स्पर्धा करतात. प्रत्येक वर्षी दुसऱ्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते रथयात्रा काढतात. त्यासाठी ते चार चाकांच्या रथाचा उपयोग करतात. त्या रथावर बांबूच्या साहाय्याने पाच मजली बांधकाम केले जाते. तेव्हा त्या रथाचा आकार पॅगोडा सारखा दिसतो. तो रथ उंचीने साधारणपणे वीस फूट असतो. त्याच्यावर पांढऱ्या लोकरीचा कपडा चढविला जातो. अनेक बौद्ध देवी देवतांची चित्रे त्याच्यावर काढली जातात. अशा तऱ्हेने साधारणपणे वीस रथ तयार केले जातात. प्रत्येक रथाचे आपापले वैशिष्ट्य असते. रथयात्रेच्या दिवशी भिक्खू आणि उपासक जमतात. उपासकातील काही उपासक गाणे गाण्यासाठी, वाद्ये वाजविण्यासाठी आणि नृत्य करण्यासाठी आलेले असतात. शहरात बुद्धांच्या मूर्तीचे स्वागत करण्यासाठी ब्राह्मण पुढे येतात. मग शहरभर रथयात्रा फिरते. रात्रभर मशाली जळत असतात आणि रात्रभर पूजा चाललेली असते. सर्व बौद्ध देशांमध्ये अशाच प्रकारचा रथयात्रेचा उत्सव साजरा केला जातो'.

जसं जसं बुद्धांचा धम्म त्यांची शिकवण जंबूद्वीपातून इतर देशात पोहचू लागली तसं त्यासोबतच बौद्ध धम्मातील उत्सव ही त्या त्या देशात आयोजित केले जाऊ लागले. प्रवासादरम्यान खोतान प्रातांतील गोमती संघरामात वास्तव्यास असताना तेथील रथयात्रा फा-हियान यांनी पहिली. त्याची माहिती त्यांनी पुढीलप्रमाणे दिली आहे, 'चौथ्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून रस्ते झाडून स्वच्छ केले गेले. शहराच्या वेशीच्या दरवाज्यांवर सुशोभित मंडप उभारले गेले. तेथे राजा आणि राणी आपल्या दासदासींच्या  समवेत थांबले होते. राजा महायानी पंथाचा फार आदर करीत असल्यामुळे रथयात्रा सुरू करण्याचा पहिला मान गोमती संघरामात राहणाऱ्या भिक्खूंना मिळाला. चार चाकांच्या रथाची उंची तीस फुटापेक्षा जास्त होती. त्याला सप्तधातूंनी मढविलेले होते. रथात रेशमी कपड्यांची अच्छादने पसरली होती आणि वरून रेशमी झालरी लावल्या होत्या. संबंध रथ जणू काही चार चाकांवर फिरणारा राजवाडाच आहे असे वाटत होते. बुद्धरूप रथाच्या मध्यभागी होते. त्याच्या आजूबाजूला बोधिसत्व आणि इतर महायानी पंथाच्या देवदेवता होत्या. शहरापासून दोन तीन ली अंतरापासून रथयात्रा सुरू झाली. वेशीपासून सुमारे शंभर पावलांच्या अंतरावर जेव्हा रथ आला तेव्हा राजाने आपला राजमुकुट काढून नवीन कपडे घातले. हातात फुले आणि अगरबत्ती घेऊन अनवाणी पायाने चालत जाऊन राजाने बुद्धरूपाचे स्वागत केले. त्याने बुद्धरूपाची आणि इतर मूर्तीची पूजा केली. त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि त्यांच्यासमोर अगरबत्ती लावली. जेव्हा वेशीच्या दरवाजातून रथयात्रा शहरात प्रवेश करू लागली, तेव्हा राणीने आणि तीच्या बरोबर असलेल्या स्त्रियांनी रथावर सर्व प्रकारच्या सुगंधी फुलांचा वर्षाव केला. प्रत्येक विधी समारंभासाठी वेगळा रथ असे. चौथ्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून त्या महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत दररोज रथयात्रा निघत असे आणि प्रत्येक संघरामाला आपापल्या मूर्तीची रथयात्रा काढण्यासाठी एकेक दिवस नेमून दिलेला असे'.

सिंहल देशात (श्रीलंका) तथागतांच्या दाताचे एक चैत्यगृह आहे. तिसऱ्या महिन्याच्या मध्यास तो दात उपसकांना दर्शनासाठी बाहेर काढला जातो त्याबद्दल फा-हियान यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे, 'तथागतांच्या दातांची मिरवणूक फार प्रेक्षणीय असते. जातक कथांतील अनेक रूपे त्या मिरवणुकीत दाखवली जातात. ही रूपे इतकी कौशल्याने केलेली असतात की, ती अगदी जिवंत आहेत असे वाटते. तथागतांचा दात मुख्य रस्त्यावरून मिरवणुकीत आणला जातो. वाटेत उपासक त्याला फुले आणि इतर वस्तू अर्पण करतात. दात अभयगिरी विहारात आल्यावर भिक्खू आणि उपासक त्याच्यापुढे फुले अर्पण करतात, दीप आणि अगरबत्ती पेटवितात आणि इतरही प्रकारे आपला आदर प्रकट करतात.नव्वद दिवसांनंतर अभयगिरी विहारातून तथागतांचा दात परत शहरातील विहारात आणला जातो. तेथे तो उपोसथाच्या दिवशी उपसकांना दर्शनासाठी ठेवला जातो'.

नगरहारा (अफगाणिस्तान) देशाच्या सीमेवरील हिलो शहरात फा-हियान यांनी तथागतांच्या कपोल धातूचे दर्शन घेतले त्याचे वर्णन त्यांनी पुढीलप्रमाणे केले आहे, 'ह्या शहरात भगवान बुद्धांच्या कपोलधातूचे चैत्यगृह आहे. ते सर्व सुवर्ण आणि सप्त धातूंनी सुशोभित केले आहे. येथील राजाने तथागतांच्या कपोलधातूबद्दल वाटणाऱ्या आदरामुळे आणि तो चोरीला जाण्याच्या भीतीमुळे त्याच्या सुरक्षिततेसाठी आठ विश्वासु माणसांची नियुक्ती केली आहे. त्या प्रत्येकाच्या जवळ त्यांची मोहर आहे. दररोज पहाटे चैत्यगृहाचे दरवाजे उघडण्याच्या अगोदर ही आठ माणसे त्या चैत्यगृहाचे दरवाजे आणि त्यावरील मोहर व्यवस्थित आहेत की नाहीत हे पाहतात. दरवाजे उघडल्यावर ते आपले हात सुवासिक पाण्याने धुतात नंतर तथागतांचा कपोलधातू एका उंच आसनावर ठेवतात. तथागतांच्या कपाळाचे हाड फिक्कट पिवळ्या रंगाचे आहे. रुंदीला साधारणपणे चार इंच असून डोक्याच्या बाजूला ते भव्य आहे. ते एका वर्तुळाकार करंडकात ठेवले आहे. करंडक मोती आणि इतर मौल्यवान जडजवाहिरांनी सुशोभित केलेला आहे. प्रत्येक दिवशी जेव्हा तथागतांचा कपोलधातूबाहेर काढला जाई तेव्हा त्या चैत्यगृहातील लोक तेथील उंच मनोऱ्यावर चढत आणि मोठा नगारा, शंख आणि झांंज वाजवीत. राजा आणि इतर लोक दिवसाची कामे सुरू करण्यापूर्वी प्रथम कपोलधातूचे दर्शन घेत. चैत्यगृहाच्या दरवाजासमोर फुले, अगरबत्ती वगैरे विकणारे लोक आहेत. चैत्यगृहातील दागोबा (स्तूप) साधारणपणे पाच फूट उंच आहे. त्याला दरवाजा असून त्यात कपोलधातू ठेवला जाई. चैत्यगृह चाळीस पावले लांब आणि चाळीस पावले रुंद आहे.

फा-हियान यांच्या प्रमाणे ह्यु-एन-त्संग यांनीही त्यांच्या प्रवासा दरम्यान (इ.स ६२९ ते ६४५) पाहिलेल्या जंबूद्वीपातील स्तुपांची आणि उत्सवांची माहिती नोंदवून ठेवली आहे.


संदर्भ : तीन चिनी प्रवासी - एस.एम मोरे.(बुद्ध धम्माचे संदेशवाहक भाग -१)


 


माझ्या गावाकडच्या गोष्टी : भाग ४ - "देवगण आणि शिनमा..."





'देवगण आणि शिनमा' या दोन्हींचं ही गावातील पोरांना लय अप्रूप होतं. गावातील जवळपास सगळीच लहान थोर पोरं अजय देवगणची चाहते होती. एकमेकांना ते देवगण म्हणूनच आवाज द्यायचे. कुठं निघाले देवगण, चला ओ देवगण, हाई चला गा देवगण, ओ देवगण जरा दम खावा की अशी वाक्ये दिवसभरात हमखास कानावर पडत रहायची. केसांची स्टाईल ही अजय देवगण सारखी असणारे ही काही पोरं होती त्यांचा रुबाब आणि त्यांना मिळणारा मान काही औरच होता. जे देवगण म्हणून लयचं फेमस झालते त्यांचं खरं नाव त्यांच्या घरच्यांना सोडून कुणाला माहीत नसायचं सारा गावचं त्यांना देवगण म्हणायचा. देवगण सोबतच गावातील पोरांना शिनमाचं अन् टिव्हीचं लंय आकर्षण असायचं. 

त्यावेळी शहरातही सगळ्यांकडे टीव्ही नसायचा त्यामुळे गावात क्वचितच एखाद्या घरात टीव्ही असायचा ब्लॅक अँड व्हाईट. तो ही लाईट आणि ऍल्युमिनियमच्या अँटेनाच्या मर्जीवर चालायचा. ज्या वाड्यात टीव्ही असायचा तिथे नेहमीच वर्दळ राहायची. सगळी भावकीची घरं आसपास असायची त्यामुळे त्याला, त्या राहणाऱ्या लोकांच्या आडनावाच्या वाड्याने ओळखले जायचे. जसं मावशीचं घर होतं तो झाकड्यांचा वाडा, खाल्लाकडे आजीचं घर होतं तो कांबळ्यांचा वाडा अशी घरांची रचना होती. सुरवातीला सगळ्या म्हारड्यात मिळून एकाच वाड्यात टिव्ही होता तो म्हणजे सुर्यवंशीच्या वाड्यात. पाराला लागूनच तो वाडा होता. पारावरच्या पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तो असल्यामुळे पाण्याला येणारे जाणारे हटकून टीव्ही वर काय लागलंय ते बगायचे. मॅच लागल्यावर तर बरीच पोरं घागरी घेऊन तासंतास तिथंच उभारायची. अन् रविवारी एखादा रडका मराठी शिनमा असला की बायांची पदरानं डोळे पुसू पुसू रडायची मिट्टी उठायची.

पुढे दोन तीन उन्हाळ्याच्या सुट्ट्या गेल्यानंतर झाकड्यांचा वाड्यातच टीव्ही आला. बुध्याच्या घरी. आमच्या घरापासुन गावात जाणाऱ्या वाटेवर तीन घरं सोडलं की बुध्याचं घर होतं. त्याला लागूनच राहुलचं घर होतं. त्या दोघांचे वडील सख्खे भाऊ होते. दोन्ही घरं सेम होती. दोन्ही घराला जळणाचं लांबलचक कुंपण होतं. बुध्याच्या सगळ्यात मोठ्या भावानं मुबंईतनं टीव्ही पाठवला होता. पुढे खाल्लाकडेही टीव्ही आला. कलर टीव्ही आणि व्हीसीआर पण आला. कांबळेच्या वाड्यात जयपालच्या घरात. दुबईहून त्याच्या काकानी पाठवला होता. राजा हिंदुस्थानी पिक्चर साऱ्या महारवाड्याला पाठ झाला होता तरी बायका शेवटच्या लहान लेकराच्या आणि अमीर खानच्या ताटातुटीच्या सीनला रडायच्याच अन् माय लहानलेकराची आब्दा करत्याय अवदसा म्हणून करिश्माला शिव्या द्यायच्या.

अण्णांचा टीव्ही, शिनमा, क्रिकेट असल्या गोष्टींना तीव्र विरोध होता. त्यामुळे आण्णा नसताना किंवा त्यांची नजर चकूवून आम्ही टीव्ही बगायला जायचो. बैलगाडी सोडून आता आम्ही म्हाळवदावर झोपायचो. हे म्हाळवद असलेलं घर म्हणजे आण्णा त्यांचं जुन घर जे नव्या घरापासून चार घर सोडून आतल्या बाजूला होतं. पाराकडे ज्यायच्या रस्त्याला. वाड्यात जे चिचचं भलंमोठं झाड होतं त्याच्या फांद्या या म्हाळवादापातूर यायच्या त्यामुळे दुपारी बी इथं गार वाटायचं. तिथं माय आणि बाबा राहायचे( आण्णाचे आईवडील). सत्तर ऐंशी वय असूनही ही दोघे थकले नव्हते सगळी काम करायचे बाबा तर रानातही जायचे. बाबा आम्हा पोरांना वाघ म्हणायचे घरापासून येताना जाताना दिसलो की कवा आलाय वाघ, कुठं निघाले वाघ, रोटी खाल्लावं का असे बाबाचे प्रश्न ठरलेले असायचे. दोघेही खूप प्रेमळ होते. 

असंच एका शुक्रवारच्या किंवा शनवरच्या रात्री आम्ही टीव्ही बगायला गेलो होतो. हिंदी शिनमा असायचा हे दोन दिस राती साडेनऊला. दिवसा जास्त वेळ तर लोडशेडिंग असायचं त्यामुळे रात्रीचे शिनमे पूर्ण बघायला मिळायचे. नऊला सगळं सामसूम झालं की हळूच आवाज न करता आम्ही म्हाळवदाच्या पायऱ्या उतरारायचो अंधारामुळ कोण ना कोण ठेसकाळायचंच. सगळा अंधार किर असायचा. टेकून बसायला भेटावं म्हणून भीतीच्या कडची जागा पकडण्यासाठी चढाओढ लागायची. हाईट कमी असल्यामुळे घरांना खिडक्या नसायच्या अन् त्यात पिवळ्या बल्बनं लंय उकडायचं. शिनमा सुरू असताना कोणीही एकमेकांशी बोलायचे  नाही सगळे त्या त्या शिनमाच्या गोष्टीत हरवून जायचे मात्र ऍड लागली की गलका करायचे. एखादा असा असायचा ज्याने तो पिक्चर आधी बघितलेला असायचा तो पुढची स्टोरी आधीच सांगुन मजा घालवायचा, सगळ्यांनी कावल्यावर थोडा नरमायचा पण परत तेच सुरू. मधूनच एखादा झोपी जायचा अन् घोरायचा मग बाकीचे त्याला घरी तर पाठवून द्यायचे नाहीतर उठून बसवायचे. एकटा जाण्याची भीती वाटत असल्यामुळे झोपलेला डोळे चोळीत झोप आवरत कसाबसा बसून रहायचा. आमच्यातलं पण कोण ना कोण तर झोपायचंच शिनमा संपल्यावर यांना परत घेऊन जायला लंय अवघड व्हायचं. 

त्या रात्री शिनमा संपल्यावर असंच एकाला सांभाळत सांभाळत आम्ही घराकडे आलो. माय अन् बाबा बाजेवर झोपले होते. आम्ही आल्याची चाहूल लागताच माय उठली आणि पायऱ्या चढून वर जाणार तितक्यात हळू आवाजात माय अमरला म्हणाली बाप बसलाय तुझा वरती. आण्णा वरती आहेत हे ऐकल्यावर आमचं आवसानच गळालं. आण्णाला वाड्यातलेच नाही तर बाकीचेही पोरं घाबरायची. आज आम्ही सगळे मार खाणार हा विचार करूनच सगळ्यांचे चेहरे पडले. तेवढ्यात अण्णांचा वरून आवाज आला कुठं गेलताव रे. तसं आम्ही सगळे घाबरून तिथंच खाली बसलो. थोडी हुशारी दाखवत एकानं कुठं नाही हितच होतांव असं सांगितलं तसं परत तिकडून प्रश्न आला नाही. थोडयावेळ शांत बसल्यावर माय कडून समजलं की मुंबईचे काका आलेत, आण्णा आणि ते वरती बसले होते. तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. मुंबईच्या काकामुळं आम्ही त्या दिवशी थोडक्यात बचवलो. आम्ही खालीच अंथरूण गपचूप झोपी गेलो. आण्णा कधी गेले ते नाही कळालं अन् दुसऱ्या दिवशीही काही बोलले नाहीत. थोडे दिवस शांतबसून परत आम्ही रातीचा शिनमा घाबरत घाबरत सुरू केला.

Monday, May 9, 2022

तीन चिनी प्रवासी






इसवीसनाच्या दुसऱ्या तिसऱ्या शातकानंतरचा भारत कसा होता याची वस्तुनिष्ठ माहिती फा-हियान, ह्यू-एन-त्संग, ई- त्सिंग या तीन बौद्ध चिनी प्रवाश्यांच्या प्रवास वर्णनातुन मिळते. फक्त बुद्धांच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी आणि धम्माचे परिपूर्ण आकलन करून घेण्यासाठी यांनी पायी केलेला हजारो मैल दूरचा खडतर आणि प्राणघातक प्रवास थक्क करणारा आहे. बुद्धांची जन्मभूमी म्हणून या भूमीकडे येथील लोकांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती मैत्रीपूर्ण आणि आदरणीय होता हे यावरून दिसून येते.

भारतातून जगात बुद्धांची शिकवण पोहचली आणि पसरली पण बुद्धांच्या आणि सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात झालेल्या प्रतिक्रांती नंतर भारत भूमीत उदयास आलेला बौद्ध धर्म लुप्त होत गेला. आज भारतात जे बौद्धग्रंथ अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत यामध्ये प्रामुख्याने या चिनी प्रवाश्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी त्या काळात ज्या हजारो ग्रंथांच्या प्रति भारतातुन चीनला नेऊन त्याची भाषांतरे करून जतन केली, याच प्रतींच्या आधारे भारतात पुन्हा बौद्ध धर्माची बीजे रुजली आणि वाढली.

त्याकाळात संपूर्ण जांबूद्वीपात (भारतात) बौद्ध धर्म किती समृद्ध  होता आणि त्याच्या आचरणाने राज्यकर्त्यांची व जनतेची कशी भरभराट सुरू होती याचे प्रत्यक्ष अनुभव त्यांनी नोंदवले आहेत. काश्मीर पासून ते सिंहल (श्रीलंका) देशाच्या विविध प्रदेशात किती संघाराम होते, भिक्खूंची संख्या किती होती, स्तुप किती होते, नालंदा व  तक्षशीला या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात ज्ञानार्जनाचे व ग्रंथनिर्मितीचे कार्य कसे चालायचे, देशातील महत्वपूर्ण संघारामात रथोत्सवाचे आयोजन कशाप्रकारे केले जायचे, तथागतांच्या जीवनातील संपुर्ण घटनांवर आधारित स्तुपांची निर्मिती कशी केली गेली त्यांचे महत्त्व किती होते, सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या स्तुपांची स्तंभाची आणि शिलालेखांची सविस्तर माहिती त्यांनी लिहून ठेवली आहे. यांच्यापैकी ह्यु-एन-त्संग हे सर्वात जास्त काळ जमबुद्विपात वास्तव्यास होते. ब्रिटिश काळात निर्माण केल्या गेलेल्या भारतीय पुरातत्त्व खात्याचे प्रमुख अलेक्झेंडर कनिंघम यांनी याच प्रवास वर्णनांच्या आधारे भारतातील बौद्ध स्थळे शोधून काढली, उत्खनन करून ते जगासमोर आणली आणि त्यांचे जतन केले.

बौद्ध धम्मातील हीनयान महायान या पंथांबद्दल आणि तिपिटक विनयपिटक या संबंधित माहिती या ग्रंथात मिळते. याबरोबरच त्याकाळात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे, व्यपाऱ्यांचे व सोबतच इतर पंथीयांचे जीवन कशाप्रकारचे होते याचीही माहिती यात दिली आहे. त्यामुळे अतिशय उपयुक्त आणि माहितीपुर्ण असा एस एम मोरे यांनी लिहलेला हा ग्रंथ सगळ्यांनी वाचला पाहिजे असाच आहे. या तिन्ही चिनी प्रवाशांच्या प्रवासाची व त्यांची वैयक्तिक संपुर्ण माहिती मिळविण्यासाठी त्यांच्या आत्मचरित्राची भाषांतरे  उपलब्ध आहेत. 

Tuesday, May 3, 2022

माझ्या गावाकडच्या गोष्टी : भाग ३ - "मांडव मोडला गा पोरानं"



माझ्या मावशीचं म्हणजे आईचं घर वरलाकडं होतं तर आजीचं म्हणजे मायचं घर खल्लाकडं होतं त्यामुळे वरतं आणि खालतं माझ्या चकऱ्या सुरू असायच्या पण जास्त वेळ मी आईच्या इकडेच रहायचो. तिकडेच मला जास्त करमायचं. शेती, बैलगाडी, गुरं, शेतीशी संबंधित गोष्टी या सगळ्याचं मला लंय अप्रूप होतं अन् त्या सर्व गोष्टींसोबत जुडण्याची संधी मला इकडे जास्त मिळायची त्यामुळे मी इकडेच जास्त असायचो. 

वरलाकडच्या घराला लागूनच एक उभा खडकी रस्ता होता. त्याच्या कडेला आधी मधी लायटीचे सिमेंटची खांबं होती. या रस्त्याच्या पलीकडे घराच्या रेषेतच आमचा गोठा होता. जो घरातून दिसायचा. गोठ्याला चहूबाजूनी जळणाच्या लाकडाचं कुंपण होतं. गोठ्याच्या मागं कचऱ्याचा खड्डा होता. प्रत्येक घराचा घरापासुन थोड्या अंतरावर कचऱ्याचा मोठा उभा आडवा खड्डा असायचा, ज्यात गुरांचा आणि घरातला जैविक कचरा टाकला जायचा,  जो भरला की खत म्हणून सहा महीना वर्षाला विकला जायचा. व्यवस्थित हाफ पीच  क्रिकेट खेळता येईल एवढि प्रशस्त जागा होती गोठ्याची. गुरांना बांधण्यासाठी झाडांच्या वाश्यांपासून अन् तुराट्यांपासून केलेला कुडाच्या भिंतीचा आडोसा आणि मांडव(छत). यातच बैलगाडी लावायची जागा आणि मांडवाला लागून असलेली विटा सिमेंटच्या भिंती आणि वरती पत्रे असलेली छोटी खोली ज्यात कडबा, गुळी व इतर सामान असायचे. दुपारी उन्हाचं गुरं या मांडवात असायची बाकी वेळेस  समोरच्या मोकळ्या जागेत मारलेल्या खुट्याला बांधून असायची. मांडवाची उंची जास्त नव्हती बैलगाडीत बसलं तरी हात वर केल्यावर मांडवाला लागायचा. गुरं व्यवस्थित या मांडवात उभी राहू शकतील अशी जेमतेम उंची या मांडवांची असायची. गावाकडची बऱ्यापैकी घरं ही अशीच कमी उंचीची होती घरातून पत्र्याला सहजच हात पोहचायचा. सतत आणि मोठं मोठ्या येणाऱ्या व्हावटळी मुळे ही काळजी घेतली जायची. व्हावटळीत अनेकांच्या घराची पत्रे उडून जायचे नुकसान व्हायचे. आम्ही गोठयाकडे असताना व्हावटळ आली की घराकडे पळायचो अन् आतल्या खोलीत बसायचो जी जास्त सुरक्षित होती. गुरांना पाणी दाखवून आणलं की सांच्यापर्यंत आणि परत रात्री झोपायला आम्ही इकडेच असायचो. 

रात्री सात साडेसात वाजता जेवण आटपलं की लगेच हाथरून घेऊन आम्ही गोठा गाठायचो, बैलगाडीच्या त्या छोट्याशा जागेत दाटी वाटीने आम्ही चार पाच जण झोपायचो. जेवून आलो की गुरांना पाणी चारा बगून हाथरून करून आम्ही गप्पा मारत पडायचो. शहरातल्या गोष्टींबद्दल माझे भाऊ व इतरांना कुतूहल असायचं त्यांमुळे आमच्या गप्पांमध्ये तो विषय रोजचा असायचा सोबतच गावातली जुनी माणसं, वेगवेगळ्या गावातील भीमजयंती, क्रिकेट मॅचेस, सगळ्यात भारी बैलजोडी, पाणी आणताना घडलेल्या गमती जमती, भुतं, दुसऱ्या गावी गेल्यानंतर तेथे आलेले अनुभव अशा चौफेर विषयांवर आमच्या गप्पा रंगायच्या नऊ पर्यंत सारा गाव निपचित व्हायचा पण चांदणं बघत सुरू असलेल्या आमच्या गप्पा काय संपायच्या नाहीत. बोलत बोलतच एक एक जण झोपी जायचं.

दुपारचं जेवणही आम्ही ताटं घेऊन येऊन इथेच बैलगाडीत बसून करायचो. जेवण झालं की पुस्तके वाचणे, गाण्याच्या भेंड्या, बैलगाडीत बसूनच काहीना काही बैठे खेळ खेळणे असा आमचा उद्योग संध्याकाळ पर्यत चालायचा. कुडाचा मांडव असल्यामुळे अन् त्याला लागूनच मागच्या बाजूला कडुलिंबाचं झाड असल्याने भर उन्हातही इथे गारवा वाटायचा. आमचा गलका ऐकून 'का करलालावं उन्हाचं बसताव का गप' असं म्हणून मोठी माणसं आम्हाला हटकायची. एक दिवस जेवण झाल्यावर सगळे  बैलगाडीत बसायचं आणि एकाने ती उचलायचा खेळ आम्ही खेळत होतो. लाकडाच्या उलट्या 'व्ही' च्या आकाराच्या दोन लाकडी दांड्याना साखळीने जोडलेली 'खुट्टी' (शिपाय) असायची ज्यावर बैलं जुपलेली नसताना बैलगाडी टेकवलेली असायची. ती खुट्टी बाजूला काढून बैलगाडीचा मेन दांडा खांद्यावर टेकववायचा आणि नंतर खांद्यावरून काढून हात सोडून हवेत समांतर ठेवायचा प्रयत्न करणे असा हा खेळ. माझी बारी आल्यावर मी ही तसंच करण्याचा प्रयत्न करू लागलो. बैलगाडीत बसलेल्याना अधिक घाबरवण्यासाठी मी हवेत बैलगाडीचा दांडा जास्त वर खाली करू लागलो, हवेत तो जास्त वेळ समांतर ठेवायच्या प्रयत्नांत असताना तो दांडा माझ्या हातून सुटला अन् थेट वरती मांडवाला धडकला. मला काय कळायच्या आत जोरात आवाज झाला बैलगाडीतले सगळे मागे खाली पडले आणि मांडव मोडला. 'पोरानं मांडव मोडला गा' असं ओरडत एकाने घराकडे पळत जाऊन सांगितलं. सगळेजण मला ओरडायला लागले. आण्णांच्या (मावशीचे मिस्टर) भितीने मला रडू यायलागले. आम्ही सगळेच मार खाणार असं आम्हाला वाटलं होतं पण तसं काही नाही झालं. थोड्या रागावण्यावर निभावलं. पुढे काही दिवसात आम्ही सगळ्यांनी मिळून तो मांडव पुन्हा उभा केला. पण तो खेळ मात्र नंतर बंद केला.

खुट्टीच्या आधारावर टेकवलेली बैलगाडी