Translate

Tuesday, August 2, 2022

लोकराजा - छत्रपती राजर्षी शाहू महाराज


लोकांच्या सुखात आपले सुख आणि त्यांच्या दुःखात दुःखं मानणारा, प्रजेचा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ करणारा राजा म्हणजे लोकराजा छत्रपती शाहू महाराज. प्रजेचे सुख व कल्याण हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या "हिंदवी स्वराज्याचे"  अंतिम ध्येय होते आणि तेच ध्येयधोरण शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभारात अंगिकारले होते. छत्रपतींकडून मिळालेला प्रजाहितदक्षतेचा वारसा जपणे हे त्यांच्यासाठी सर्वतोपरी होते. शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या राज्याभिषेक शकाने केलेली पहिल्या जाहीरनाम्याची सुरुवात व राज्यारोहनानंतर अवघ्या १२ दिवसांनी काढलेल्या एका सरकारी आदेशावरून त्याचा प्रत्यय येतो. 

महाराज आपल्या या आदेशात म्हणतात, "अनुभवाअंती असे दिसून आले आहे की, श्रीमन्महाराज सरकारची खुद्द स्वारी इलाखे मजकुरी शिकारी करिता होते तेव्हा ज्या पेट्याचे हद्दीत मुकाम पडतो त्या पेट्याचे मामलेदार त्या पेट्याचे फौजदारास सरबराई ठेवण्याबद्दल हुकूम करितात; फौजदार आपले ताब्यांतील पोलिसाकडे हे काम सोपवितात. मग ते पोलिस सभोवारचे खेड्यापाड्यांत जाऊन एके ठिकाणी बकरी, दुसरे ठिकाणी अंडी, कोंबडी वगैरे जेथे जो जिन्नस सापडेल तो घेतात. हुजूरचे स्वारीचा त्या तालुक्यातून कूच होण्याचे वक्ती स्वारीबरोबर जो खासगी खात्यातील कारकून कामगारीवर असतो तो मामलेदार याजकडून हिशोब घेतो आणि पोहोचल्या जिनसांबद्दल पैसा आदा करितो. नंतर तो पैसा मामलेदार फौजदाराकडे, फौजदार आपले शिपायाकडे, शिपाई गावगन्नाचे पाटलांकडे आणि पाटील ज्या इसमाकडून जिन्नस घेतले त्या इसमास आदा करतात, अशी काल्पनिक समज आहे. परंतु ज्या गोरगरीब इसमांकडून जिन्नस घेण्यात येतात, त्या इसमांस तो सर्व किंवा त्यातील काहीतरी पैसा पोहोचतो किंवा कसे याजबद्दल वानवा वाटतो. असे होऊ नये व ज्या गोरगरिबांचा माल घेतला त्यास भरपूर पैसा पोहोचावा व आपल्या स्वारीच्या निमित्ताने कोणास उपसर्ग किंचितही होऊ नये, अशी खुद श्रीमन्महाराज सरकारची इच्छा आहे सबब खाली लिहिल्या प्रमाणे सामग्रीचा पुरवठा करण्याबद्दल नियम करण्यात येत आहेत.

१) ज्वारी, तांदूळ, डाळी धान्ये, पीठ, साखर, मसाला वगैरे सामग्री पर हुजूरचे मुतापाखान्याकडे स्वारीचे लोकांकरिता लागेल ती यथाशक्य सर्व कोल्हापुराहून खासगी खात्याकडून नेण्यात यावी.

२) बकरी, कोंबडी, अंडी हे जिन्नस घेण्याकरिता स्वारी निघण्याचे अगोदर खासगीकडील मुद्दाम एक कामगार पाठविण्यात यावा. त्याने मुक्कामाचे ठिकाणानजीक जो बाजारचा गाव असेल त्या गावी बाजारचे दिवशी जाऊन सर्व जिन्नस मालकास रोख पैसा जेव्हाचे तेव्हा जेथल्या तेथे देऊन घ्यावे. सर्पणाबद्दलही त्याचप्रमाणे अगाऊ तजवीज करावी. सामानाचे पैशाचा बटवडा करणे तो त्या वेळी मुलकी कामगार गावी हजर असल्यास त्याचे समोर पैसा आदाकरून त्याची सही घ्यावी. तसा कोणी नसल्यास गावकामगार पाटील-कुलकर्णी यांचे समक्ष पैसा आदा करून मालकाची पावती घ्यावी व कामगाराची साक्ष घ्यावी......

३) दुधाबद्दल खाजगी थट्टीपैकी म्हशी स्वारीबरोबर नेण्याची तजवीज ठेवावी. कदाचित ही तजवीजन घडेल तर खाजगी खात्याकडील वर नमूद केले कामगाराने किंवा कारकुनाने नजीकचे गावचे इसमाकडून स्वतः दूध घेऊन मालकास गावी भाव असेल त्याप्रमाणे ताबडतोब जेथल्या तेथे सर्व पैसा चुकवून द्यावा. स्वारीचा कूच होईपर्यंत ठेवू नये......

४) गवत सरकारी कुरणे बहुशः सर्व पेयानिहाय आहेत, सवव लोकांकडून हे जिन्नस घेण्याचे कारण नाहीच, कदाचित प्रसंगोपात खरेदी करावा लागल्यास रोख पैसा मालकास जेव्हाचे तेव्हा देऊन घ्यावा......

५) मेहेरबान पोलिटिकल एजंट साहेब बहादूर प्रांत करवीर व कर्नाटक यांची अथवा इतर इलाखे मजकूरचे साहेब लोकांच्या अथवा ब्रिटिश सरकारचे अमलातील साहेब लोकांच्या स्वाऱ्या आल्यास ठिकठिकाणचे संबंध असणारे मामलेदार, शिरस्तेदार वगैरे यांनी रोख पैसा बाजार भावाप्रमाणे जेव्हाचे तेव्हा साहेब लोक किंवा त्यांचेकडील जे इसम माल घेतील त्यांजकडून घेऊन ज्याचा त्यास आदा करण्याची तजवीज बिनचूक ठेवावी. "

छत्रपती शाहू महाराज हे खरेखुरे शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे राजे होते. हे त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणीतुन  अधिक स्पष्ट होते. अशाच काही निवडक आठवणी खाली दिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या शिदोरीवर महाराजांचे जेवण

आम्ही ठरल्या ठिकाणी एका ओढ्यावर पोचलो. तेथे त्तीस-चाळीस शेतकरी आधीच येऊन बसले होते. महाराजांचे दुपारचे जेवण कोठे व्हावयाचे हे आगाऊ ठरलेले असावयाचे व त्या ठिकाण आसपासचे शेतकरी आपापल्या शिदोऱ्या बांधून यायचेच असा नित्यक्रम असे. आम्ही उतरल्यावर हातपाय धुतले. महाराज एका दगडावर जाऊन बसले, व यस सांगून माझ्या जेवणाची तयारी केली. महाराज बसले त्या दगडाच्या आसपास शेतकरी जरा दूर उभे होते. • शिकारीतील जेवण पाहण्यासारखे असे. एका स्वतंत्र गाडीत एक पुलाव्याचा हंडा, एक मोठी चपात्यांची भरलेली परात, एक रश्शाचा लहानसा हंडा व एक द्रोणपत्रावळींची गाडी असा थाट असावयाचा. शिकारी नोकर जमलेल्या माणसांस "ह्या पत्रावळी घ्या व बसा" म्हणत.

महाराजांच्या सभोवार शेतकऱ्यांचे मोठे कडे बने, काही माणसांजवळ त्यांच्या भाकऱ्या, डांगर अगर कांदे, ताकाचे मोगे असत. महाराजांनी परेडची पाहणी करावी त्याप्रमाणे "है तू काय आणलेस?" असे विचारीत फिरावे, एखाद्याच्या भाकरीवरील लोणचे उचलावे, दुसऱ्याच्या भाकरीवरील कांदा उचलावा, तिसऱ्याच्या मोग्यांतील ताक ओतून घेण्यास सोवळेकन्यास सांगावे, आणि ती जमलेली शिदोरी घेऊन परत आपल्या दगडावर बसावे महाराजांनी "हे करा सुरुवात म्हटल्यावर सो आपापल्या जागेवर बसत, त्यांना एक सरकारी नोकर भराभर चपात्या वाढी, तर दुसरा पुलावा बाढी, रस्सा वाढी. हे गरीब शेतकरी जेवत असताना महाराजांना समाधान वाटे. आणि स्वतः चे जेवण शेतकऱ्याकडून गोळा केलेल्या शिदोरीवरच होई.

(शाहू महाराजांच्या पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे पाहिले विद्यार्थी डॉ. पी. सी. पाटील यांच्या माझ्या आठवणी या आत्मवृत्तातुन)


'सित्या, काय  कोरड्यास असलं तर आणतोस काय?'

( भाई माधवराव बागल यांच्या आठवणीतुन)

एकदा हरणाच्या शिकारीसाठी महाराज विजापूरच्या परिसरात गेले होते. परतीच्या प्रवासातील ही कथा

गाडी रानावनातून निर्जन वाळवंटातून जात होती. अंधार होत चालला. आजूबाजूस गाव नव्हतं. चोरी- दरोड्याची भीती होतीच. वाटेत काही झोपड्या दिसल्या. एक माणूस टेहळणी करतो असे दिसले. महाराजांनी काळोखात दिसणाऱ्या माणसाला हाक मारली, कोण हायर इकडं ये.' माणूस दचकत दचकत जवळ आला. 'काय पाहिजे ? 'अरं, त्यो सित्या बेरड हाय काय बघ. असला तर त्याला म्हणावं शाहू छत्रपती तुला बोलावतोय "

थोड्या वेळानं दोन माणसे आली. पण ती दचकतच आली. कोणी तरी पोलिस फौजदार पकडायला यायचा ही त्यांना भीती होती. कारण वस्ती होती ती सारी बेरडांचीच..

'हाय काय रे ?' म्हणून पुनः मोठ्याने विचारताच महाराजांचा आवाज सित्यानं ओळखला. लगेच धावून येऊन महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज म्हणतात, सित्या काय कोरड्यास असलं तर आनतोस काय ?' बातमी सर्वांना समजली. प्रत्येकाने आपल्या घाँ मिळेल ती भाकर आणि अन्न आणलं. ते महाराजानी व गाडीतल्या मंडळींनी खाल्लं, त्यांच्या मडक्यातले गार पाणी सर्वांनी ढोसले. जाताना महाराज म्हणतात, 'सित्या लेका, संभाळून अस बरं काय !'

महाराजांनी गरिबांच्या प्रेमाचा नमुनाही आपल्या मंडळींना दाखवला !


गरिबासाठी धोक्यात उडी

( डी बी माळी )

सावंतवाडीच्या महाराजांचे बडोद्याच्या राजकन्येशी जे बडोदा मुक्कामी लग्न झाले. ते लग्न राजर्षी शाहू महाराजांच्या देखरेखीखाली झाले. या लग्न समारंभाचे प्रसंगी महाराजांनी आपल्या आवडीचे निरनिराळ्या प्रकारचे खेळ करविले. या खेळात 'घोडेस्वाराशी हत्तीचा सामना' हा एक खेळ करविला.

या खेळाच्या वेळी हत्तीने घोडेस्वारावर अशी अचूक चाल केली की, त्या चालीने तो स्वार आता चीत होणार असे दिसू लागले. पण महाराजांना स्वतःच्या निव्वळ करमणुकीखातर एका गरीब जीवाची होणार असलेली हत्या पाहवली नाही. हत्ती आता सोंडेने स्वारास खाली ओढणार, असे पाहिल्याबरोबर त्यांनी एकदम त्या स्वाराच्या आणि हत्तीच्या मध्ये उडी घेतली व ते अगदी जोराने ओरडले. त्यासरशी हत्ती बुजून दुसरीकडे पळाला; आणि त्या गरीब स्वाराचे प्राण वाचले !


माझ्या पंगतीला आणुन बसव!

( डी एस जाधव )

ही गोष्ट पडली त्यावेळी शाहू महाराज सोनतळीवर राहात होते. मेनरोडवरून सुटून खाली रस्ता वळण घेई. त्या रस्त्यावर एकदोन फासेपारधी महाराजांच्या भल्या मोठ्या घोड्यांच्या गाडीची वाट पाहात बसले होते. महाराज येताना दिसताच ते गाडीपुढे झाले व म्हणाले,

"ये महाराज, जरा थांब. तुला द्यायला ह्यो ससा आणलाय. एवढा घे.' * महाराजांनी गाडी थांबवून ससा गाडीत घेतला व गाडी हाकली. मुदपाकखान्यात ससा दिला. नेहमीच्या वेळी स्वारी जेवायला बसली. घासाला सशाचे मांस लागताच त्यांनी हात आवरता घेतला. जेवायचं थांबवलं. लगेच हुजऱ्याला बोलावलं आणि म्हणाले,

'अरे, ते फासेपारधी त्या वळणावर आहेत का बघ बरं

आणि तसेच त्यांना घेऊन ये. गाडी घेऊन जा लवकर. त्यांना जेवायला बोलवायचं विसरलोच मी.' थोडक्याच वेळात फासेपारध्यांना घेऊन आल्याची वर्दी हुजऱ्याने आणली व तो महाराजांना विचारू लागला, 'महाराज, त्यांची ताटं कुठे करू ? खाश्यात की खर्च्यात ?" त्यावर महाराज रागावून म्हणाले, "गाढवा, त्याचच अन्न मी खातोय आणि खाश्यात की खर्च्यात म्हणून काय विचारतोस? जा माझ्या पंक्तीला आणून बसव त्यांना ! त्या दिवशी फासेपारध्याना पंक्तीस घेऊन महाराज जेवले.


जनतेबद्दल केवढी कळकळ !

(बॅ. शामराव केळवकर)

मी विलायतेहून बॅरिस्टर होऊन आलो होतो. मुंबईस स्वतंत्र धंद्यात पडलो होतो. महाराजांची माझी गाठ त्यावेळी मी गंधर्वांचे नाटक पाहाण्यासाठी विएटरमध्ये जाऊन बसलो होतो. गर्दी म्हणजे तोबा होती. खुर्च्यामधील वाटेतही लोक दाटणीने बसले होते. मी दोन सीटस् आरक्षित केल्या होत्या. वाटेल तितके पैसे देऊनही आता कोणाला जागा मिळणे शक्य नव्हते. माझ्या मागच्या रागेला बादा खुच्या घुसवून काहींनी आपली कशीबशी सोय करून घेतली होती. मी मागे वळून पाहिले, तो याच गर्दीत आष्टी अवघडून बसलेले खुद्द शाहू महाराजच मला दिसले. मता ते दृश्य पाहावले नाही. आपलाच राजा. मी उठून महाराजांना जागा दिली. महाराजांनी मला प्रेमाने कवटाळून जवळव बसवून घेतले व जाताना 'उद्या माझी भेट घे' म्हणून सांगितले.

मी दुसरे दिवशी गेलो. पण माझी काही दाद लागली नाही. भोरेखान आले. त्यांनी विचारलं, 'तुम्ही का बाहेर ? त्यांना मी सांगितलं, निरोप पाठवला आहे म्हणून. पण तो निरोप हुजऱ्यांनी पोहोचवला नसावा; कारण भोरेखाननी कळवताच मला घ्यायला खुद्द महाराजच माडीवरून खाली चालत आले. बोलता बोलता म्हणाले, 'काय करावं बोवा, सरकार आमची काही दाद घेत नाही. कोल्हापूरला धान्याची तूट आली आहे. लोकांचे हाल व्हायला लागले आहेत आणि हे काही आम्हाला धान्य देईनात.'

तेव्हा मी म्हणालो, 'महाराज, आपण स्वतः या खटपटीत कशाला पडता ? आमच्यासारखी माणसं हे करू शकतील.' महाराज म्हणाले, 'तुम्ही कराल काय सांगा.' हो जरूर करीन. त्याच धंद्यात मी आहे." मंग चला पाहू आताच. मीही येतो तुमच्याबरोबर. छे। आपण येऊ नये. आपण आल्याने काम होणार नाही. त्यांच्या अपेक्षा वाढतील. अहो, तुम्ही माझ नाव सागू नका म्हणजे झालं. मी आपला तुमचा नोकर म्हणून येतो. कोण ओळखणार मला?' 'महाराज, तुम्ही दडून राहू शकणार नाही. बरं मी आत येत नाही. आपला बाहेरच बसतो म्हणजे झालं.

आणि खरोखरच महाराजांना कामाची इतकी आतुरता आणि निकड लागली होती की मी आत जाऊन वाटाघाटी करीपर्यंत महाराज अगदी इतर सर्वसाधारण लोकांत एका साध्या बाकावर दोन तास बसून राहिले होते ! आपल्या लोकांना धान्य मिळावं ही तळमळ महाराजांना स्वस्थ बसू देत नव्हती. खरोखरीच, शाहू महाराज एक थोर विभूती होती.

समान्यातील सामान्य माणसास न्याय

महाराजांच्या काळात समान्यातील सामान्य माणसास कसा न्याय मिळत होता हे समजण्यासाठी त्यांनी दिलेला हा एक हुकूम ही पुरेसा आहे.

भुदरगड पेट्याच्या मामलेदार कचेरीतील शिपायाने खेड्यातील एका बाईची कोंबडी नेली पण पैसे दिले नाहीत. ही तक्रार महाराजांकडे आल्यावर त्यांनी त्या शिपायास तातडीने नोकरीतून कमी करून कोंबडीची किंमत साडेसहा आणे वसूल करून त्या बाईस देण्याचा हुकूम दिला.

(मुलकी खाते ठराव क्र. ५७२)                 ता. २० डिसेंबर १९०८

कामातील तात्पर्य - अव्वल हु || भु - मामलेदार यांस

निकाल हुकूम - 

आपले पेट्यांतील इकडे कामगीरीस असलेला शिपाई अण्णा मोरे याने पढळी येथील राहणारी पार्वतीबाई कोम येसबा प।। (पाटील) हिची कोंबडी तिला पैसे न देता आणिली व आजवर पैसे दिले नाहीत म्हणून सदर बाईने इकडे हजर होऊन दिलेला जबाब सोबत आहे. सरकारी नोकरास असे रितीने वर्तन करणे दुषणास्पद आहे, करिता त्यास हा हु।। (हुकूम) पोचताच नोकरीवरून कमी करून त्याजकडून कॉबडीचे किंमती बद्दल पैसे साडेपाच आणे वसूल करू पा रितीप्रमाणे बाईस देणेची तजवीज करावी व दुसरा हु।। होईपर्यंत त्यास नोकरीवरून हजर करून घेऊ नये व त्याचा दाखला घेऊन हे काम रा. ब. सरसुभे ई।। करवीर याजकडे पाठवावे.


दिनांक २०-१२-१९०८।                                        सही शाहू छत्रपती


याप्रमाणेच गरिबांना झोपड्या बांधण्यासाठी, दुष्काळ काळात जनावरांसाठी छावण्या सुरु करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरक्षित घाण्याची केलेली तरतूद, सावकाराकडून होणाऱ्या रयतेच्या शोषणास लगाम यांसारख्या अनेक जाहीरनाम्यांतून, हुकूमांमधून आणि आज्ञापत्रातून शाहू महाराजांचा गरीब रयतेप्रति असणारा कळवळा व्यक्त होतो.




(या ब्लॉगमधील सर्व माहिती डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. मंजुश्री पवार लिखित "राजर्षी शाहू पचखंडात्मक स्मारक ग्रंथ" यातून घेतली आहे. शाहू महाराजांचे संपुर्ण जीवनचरित्र समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि मौलिक असा हा ग्रंथ आहे)