सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यांसारख्या खगोलीय घटना जेव्हा घडत असतात त्यावेळी आपल्या देशात अजूनही अनेक अंधश्रद्धा पाळल्या जातात. ज्या विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरत नाहीत. ग्रहण हे इतर देशातही होत असते पण त्यामुळे तेथील नागरिकांवर कोणताही परिणाम होत नाही फक्त आपलाच देश त्याला अपवाद आहे तो ही अंधश्रद्धेमुळे.
आजचे ग्रहण हे दिवाळीच्या मध्ये आहे त्यामुळे लोकांमध्ये आणखीनच भ्रम पसरविले जात आहेत. अशाच काही गैरसमजुती आणि अंधश्रद्धेवर आधारित प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
१) ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते का?
उत्तर : नाही, सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येतो त्यामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश चंद्रावर पडतो, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्याला ग्रहण लागते. मुळात भौतिक शास्त्रात नकारात्मक ऊर्जा अशी काही गोष्टच नाही त्यामुळे ग्रहण काळात कोणतीही नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत नाही. ग्रहण म्हणजे फक्त एक सावली आहे ज्यामुळे ती शुभ किंवा अशुभ असू शकत नाही.
२) ग्रहण काळात बाहेर पडू नये का? (विशेषकरुन गरोदर महिलांनी)
उत्तर : ग्रहण काळात बाहेर पडल्याने किंवा आपले दैनंदिन काम केल्याने कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. याबरोबरच गरोदर महिलांच्या गर्भातील बाळाला कोणतीही इजा होत नाही. ग्रहणकाळ गरोदर महिलांसाठी अपायकारक असतो ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. त्याला कोणताही वैद्यकीय किंवा वैज्ञानिक पुरावा नाही. अंनिसच्या (अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या) अनेक गरोदर सदस्य स्त्रियांनी ग्रहण काळात बाहेर पडून ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध केले आहे. त्या सर्वांच्या मुलांवर कोणताही परिणाम झाला नाही.
३) ग्रहणाचा जन्माला येणाऱ्या बाळाचे ओठ आणि टाळू फाटण्याशी काही संबंध आहे का?
उत्तर : काहीही संबंध नाही. ओठ आणि टाळू फाटणे हा जनुकीय आजार आहे. त्याचा ग्रहनाशी काहीही संबंध नाही.
४) ग्रहण काळात अन्नपदार्थ शिजवू नये किंवा जेवण करू नये?
उत्तर : यात ही काही तथ्य नाही. ग्रहण काळात अन्नपदार्थ शिजवल्याने किंवा जेवण केल्याने व्यक्तीवर कोणताही परिणाम होत नाही. आपला देश सोडला तर तर इतर देशांचे दैनंदिन जीवन ग्रहण काळात ही नेहमी प्रमाणे सुरू असते त्यांच्यावर काही परिणाम झाल्याची घटना अजून तर घडलेली नाही.
५) ग्रहण सुटल्यानंतर अंघोळ करणे गरजेचे आहे का?
उत्तर : नाही. ग्रहण काळात मानवी शरीरावर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करणे किंवा इतर काही करण्याची कोणतीच आवश्यकता राहत नाही.
अभ्यासाअंती या गैरसमजुतीचे आणि अंधश्रद्धेचे मूळ हे पुराणकथा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये असल्याचे लक्षात येते. फक्त भारतातच नव्हे तर सुरवातीच्या काळात संपूर्ण जगामध्ये खगोलीय घटनांबद्दल वेगवेगळ्या मान्यता होत्या. पण कालांतराने वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या स्वीकृतीमुळे जगभरातून त्या नष्ट झाल्या, मात्र भारतातून त्या अजूनही समूळ नष्ट झालेल्या नाहीत. विज्ञानाच्या शोधाआधी अज्ञानापोटी हे सर्व केलं जायचं पण वैज्ञानिक जगात अशा गोष्टींना थारा नाही. जागतिक अंतराळ संशोधन संस्था नासाने ही ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नसल्याचे खूप आधीच स्पष्ट केले आहे. वरील गैरसमजुतींचा आणि अंधश्रद्धांचा ज्याप्रमाणे ग्रहणाशी काही संबंध नाही त्याचप्रमाणे दिवाळी किंवा इतर कोणत्या सणाचाही ग्रहणाशी कसलाही संबंध नाही त्यामुळे दिवाळीत आलेल्या या ग्रहणा बाबत शंका घेण्याची किंवा घाबरण्याची काहीच गरज नाही. सूर्यग्रहण थेट पहिल्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या डोळ्यांना धोखा होऊ शकतो त्यामुळे ते थेट डोळ्यांनी पाहू नये ही एक गोष्ट सोडली तर ग्रहणाचा कोणत्याच सजीवावर कसलाही परिणाम होत नाही हेच पूर्ण सत्य आहे. सूर्याला चंद्राला लागलेलं ग्रहण हे ग्रहण थोड्या काळानंतर का होईना सुटते पण मानवी बुद्धीला लागलेलं ग्रहण कधी सुटणार या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.
No comments:
Post a Comment