पात्रांची ओळख :
ओम - उच्च वर्गातील व्यक्तीमत्व, शिक्षणास पोषक कौटुंबिक वातावरण, आर्थिक बाबतीत सधन, शिक्षणात हुशार, रुढी परंपरा धर्म यांचा अभिमान असणारा.
महेंद्र - अस्पृश्य वर्गातील कुटुंब, मध्यमवर्गीय, शिक्षणाचं महत्व महापुरुषांची शिकवण याची जाण असणारा, पुरोगामी पार्श्वभूमी, शिक्षणाची आवड,
तानाजी - गावाकडचं व्यक्तिमत्त्व, तरूण व्यक्तीमत्व, शेती करणारं कुटुंब. घरच्यांना शेतीत मदत करणारा, एकदम सधन नाही पण शेतीतून सर्व गरजा भागवणारं कुटुंब,
विजय सर - शिक्षणाचं महत्व ज्ञात असलेले, सर्वसमावेशक भूमिका असणारे, सर्व विदयार्थ्यांना समान वागवणारे, आदर्श शिक्षक.
पहिल्या भागाचे संवाद :
Scene 1
(परीक्षेच्या आधीचा कॉलेजचा शेवटचा दिवस, दुपारी कॉलेज संपल्यानंतर तिघे मित्र गप्पा मारत कॉलेजच्या पार्कींग जवळ थांबतात, अभ्यासाची चौकशी, नोट्स देवाण घेवाण करून आपापल्या घरी जातात)
-तिघे बोलत वर्गातून बाहेर पडतात, पार्कींग जवळ येऊन थांबतात.
ओम - परीक्षेचं वेळापत्रक आलं आहे खूपच कमी वेळ मिळणार आपल्याला अभ्यासाला.( बाकी दोघांकडे बघत बोलतो)
तानाजी - मग नाही तर काय? खूप मेहनत करावी लागल गड्या
महेंद्र - ते सगळं ठीक हाय पण सर्व विषयाच्या नोट्स आधी रेडी कराव्या लागतील, दोन विषयांच्या नोट्स पूर्ण कुठं दिलेत सरांनी.
तानाजी - या ओमकडं हायती की त्याच्या ट्युशनच्या त्याच आपण झेरॉक्स मारून घिऊ.
महेंद्र - हा हे ठीक होईल ( ओम ही होकारार्थी मान हलवतो)
ओम - मी देतो तुम्हाला पण मला झेरॉक्स करून लगेच होत्या तशा परत कराव्या लागतील.
तानाजी आणि महेंद्र - करणार की भावा ( हसत हसत)
ओम - चला मी निगतो, 5 ला शाखेत जायचं आहे.
तानाजी - मी बी निघतो नंतर एसटी न्हाय परत संध्याकाळ पातूर.
महेंद्र - ठीक आहे तुम्ही निघा मी लाब्ररी तुन पुस्तके घेतो आणि मग जातो.
(तिघे एककमेकांना चला परत भेटू बाय म्हणून निघतात)
Scene 2
(तानाजी शेतातून संध्याकाळच्या वेळी महेंद्र ला फोन लावतो अभ्यासाची चौकशी करतो)
तानाजी - हॅलो, मह्या कसा हायस लेका. अभ्यासामधी एवढा गुतला की दोस्तला बी इसरालास.
महेंद्र - तसं काय नाही ताना, मी करणार होतोच मोबाईल रिचार्ज केला की, (तानाजी बर बर म्हणतो ) कसं चालुय तुझा अभ्यास
तानाजी - सुरू हाय आपलं, रानात बी लक्ष द्यावं लागतंय त्यामुळं जरा लंय पळापळी होत्याय. तरी समद्या नोट्स असल्या मुळं काय टेन्शन न्हाय. परीक्षेच्या आधीची नाईट मधी व्हतंय कव्हर (हसत हसत)
महेंद्र - ओमचा काय पत्ता,
तानाजी - त्याचं काय गड्या त्यो हुशारच हाय, त्याच्या घरी फोन केला की बा कडं फोन आस्तुया, लंय प्रश्न ईचारतुय त्याचा बा, त्यामुळं त्याचा फोन आल्यावरच बोलतुया म्या.
महेंद्र - खरंय, पेपरला भेटू तवा निवांत बोलू.
तानाजी - बरं चालतंय की, भेटू मग कर अभ्यास.
Scene 3
(पहिला पेपर होतो झाल्यावर तिघांची भेट होते, तिघे खुश असतात)
ओम - तुम्हाला बघून तर वाटत आहे पेपर सोपा गेलाय तुम्हाला.
तानाजी आणि महेंद्र - आनंदाने होकारार्थी मान हलवतात.
महेंद्र - आम्हाला चांगला गेला पण तू तर पुरवण्या वर पुरवण्या घेत होता एवढ काय लिहतो रे तू.
तानाजी - व्हय की, माझी हाय ती उत्तरपत्रिकाच भरत न्हाय लवकर. (तिघे हसतात)
महेंद्र - सुरवात तर चांगली झाली पण पुढचे पेपर चांगले जाण्यासाठी ते राहिलेले नोट्स गरजेचे आहेत, ओम ते कधी देतो?
ओम - एक काम करा पुढच्या पेपरला तीन दिवस सुट्टी आहे. आताच माझ्या सोबत चला झेरॉक्स मारून लगे परत करा नोट्स.
(महेंद्र आणि तानाजी एकमेकांकडे बघत इशाऱ्याने विचारतात आणि जाण्यासाठी तयार होतात)
(ओमचं घर कॉलेजपासून जवळच शहराच्या मध्यवर्ती भागात असतं, बसने दहा मिनिटात ते पोहचतात,ते दोघे बाहेरच थांबतात, संध्याकाळची वेळ असते घरातून संस्कृत मंत्रोच्चाराचा आवाज येत असतो, ओम जाऊन नोट्स आणून देतो आणि लवकर झेरॉक्स घेऊन यायला सांगतो)
ओम आणि तानाजी धावत जाऊन झेरॉक्स घेऊन येतात, ओमला आवाज देतात ओम बाहेर येतो. नोट्स परत देतात धावत गेल्याने दोघांना तहान लागलेली असते तानाजी ओमला पाणी मागतो.
ओम पाणी घेऊन येत असतो तेवढ्यात घरातून वडिलांचा आवाज येतो कुणाला रे पाणी? बाबा कॉलेजचे मित्र आहेत माझे?
कोणते मित्र? तानाजी आणि महेंद्र आहेत.(बाबा तिरकसपणे बरं बरं म्हणत तो तांब्या आणि पेला विसळून घे असे सांगून त्यांच्या कामात मग्न होतात)
तानाजी आणि महेंद्र पटकन पाणी पितात आणि परत कॉलेजात भेटूया म्हणून निघतात. बोलत बोलत बसस्टॉपच्या दिशेने चालू लागतात.
तानाजी - आयला ओमचा बा लंय कडक वाटतुया गड्या.
महेंद्र - मोठ्या ऑफिसात कामाला हायेत ते, त्यांच्या भागात त्यांना लय मानतेत, त्यांच्या समाजातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत ते.
तानाजी - मग बरोबर हाय, ओमच्या अभ्यासाकडे बी लंय लक्ष असतंय त्यांचं, कॉलेजच्या शिक्षकाला बी भेटत असतेती न्हाय तर माझा बा दहावी नंतर अडमिशनला बी आला नव्हता सोबत. रास चालू व्हती ना तवा शेतात.
बस स्टॉप वरून महेंद्र आपल्या घरी आणि तानाजी कॉलेजच्या होस्टल ला जातो. (परीक्षेपुरतं तो आपल्या गाववाल्या मित्राच्या रूमवर राहत असतो)
Scene 4
(सर्व पेपर संपतात, तिघांनाही पेपर चांगले जातात, शेवटच्या पेपरला तिघे भेटतात. पेपर संपल्यामुळे तिघेही आनंदात असतात)
तानाजी - गडयांनो, संपले एकदाचे पेपर. अभ्यास करून करून जीव दमला व्हता. आता फुल राडा फुल मजा. माझं तर समदं ठरलंय. रोज सकाळी क्रिकेट, दुपारचं दमोस्तर हिरीत पवायचं अन् रोज रातीला एक शिनमा बघायचा.
महेंद्र - एकच नंबर नियोजन हाय की दोस्ता तुझं, मी पण गावाकडं जाणार मामा आणि आजीकडे, लंय मजा येती मला तिकडं. भीमजयंती तर जोरदार असते, संपूर्ण गाव गायन पार्टीसोबत रात्रभर जागा राहतो. नुसता विचार करूनच भारी वाटायलंय मला.
ओम - अरे थांबा जरा तुम्ही, अजून सीईटीचे पेपर बाकी आहेत आपले
तानाजी - व्हय की गड्या, ती इसरोलच आम्ही या नादात.
महेंद्र - अरे जसं आपण पेपर च्यावेळी अभ्यास केला तसाच सीईटीचा पण करू. अजून महिना आहे आपल्याकडे (तिघेही हसत एकमेकांकडे बघत मान हलवतात).
महेंद्र आणि तानाजी - ओम तुजा काय प्लान आहे सुट्ट्याचा
ओम - अजून काय नक्की नाही बाबा शाखेच्या उन्हाळी शिबिरात पाठवायचं बोलत होते. किंवा आम्ही सगळे उत्तर भारतात फिरायला जाणार.
महेंद्र आणि तानाजी - चांगलय की. चला आता मस्तपैकी थंडगार मस्तानी पिऊ.
तिघेही चला (एकदम खुश होत)
(तिघे चालत चालत कॉलेज जवळच्या मस्तानीच्या गाड्याकडे जातात)
दरम्यानच्या काळात सीईटीचे पेपर होतात, तिघांना पेपर ठीक जातात सुट्ट्यांमध्ये ते फोनवर संपर्कात असतात)
दुसरा भाग :
Scene 5
(निकालाच्या दिवशी तिघेही सकाळी कॉलेजमध्ये येतात, त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे कॉलेज पार्कींग जवळच्या कट्टयावर त्यांची भेट होते)P
ओम आणि महेंद्र - (तानाजीची वाट बघत थांबलेले असतात, तेवढ्यात तानाजी येतो) किती वेळ ताना, कधीपासून वाट बघतोय आम्ही.
तानाजी - आरं आज बाजाराचा दिस लंय गर्दी त्यामुळं गाडीत चढता आलं नाही दोन तीन गाड्या गेल्यावर कुठं गाडीत घुसता आलं.
महेंद्र - (तानाजी ला थांबवत) ते राहू दे चला 12 वाजत आले कॉम्पुटर लॅब मध्ये सर निकाल बगून सांगायला सुरू करतील
(तिघेही तिकडे जातात)
(तिघे एकदम आनंदात उत्साहाने तिकडून परत कट्ट्यावर येतात, तिघेही पास होतात अपेक्षेप्रमाणे मार्क मिळतात, एकमेकांची गळा भेट घेत अभिनंदन करतात )
ओम -चला ही आनंदाची बातमी आधी घरी सांगूयात.
तानाजी आणि महेंद्र - हो चला.
(तिघेही आनंदाने एकमेकांना भेटून घरी निघतात)
ओम - ८६℅ महेंद्र - ८१% तानाजी - ७४%
Scene 6
(ऍडमिशनची लगबग सुरू होते, तिघेही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार असतात)
येवढ्या दिवस फक्त अभ्यास करणे आणि चांगले मार्क मिळवणे या पुढचा प्रवास सुरू होतो. शिक्षक, नातेवाईक, मित्र, इतर मंडळींकडून ऍडमिशन प्रोसेस, ऑप्शन फॉर्म, विविध डिपार्टमेंट, त्या कॉलेजातील एकूण जागा,आरक्षित जागा याबाबत माहिती त्यांना मिळत जाते.
इंजिनिअरिंग फर्स्ट राऊंड साठी फॉर्म सुरू होतात, ऑनलाइन प्रोसेस असल्यामुळे तानाजी आणि महेंद्र कॉलेजमधील विजय सरांची मदत घेऊन फॉर्म भरतात. त्यांच्या घरातुन इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेणारे ते पहिलेच त्यामुळे त्यांना याबाबत जास्त काही माहिती नसते. ओमचा चुलत भाऊ मंदार गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला असल्यामुळे ओमच्या ऍडमिशनचं सगळं तो बघतो. तिघे मिळून कॉलेजमधून फॉर्म भरणार असतात पण ओमचे वडील त्याला मंदारसोबत फॉर्म भरायला लावतात.
फॉर्म भरल्यानंतर तिघांची कॉलेजमध्ये भेट होते.
(ओम आणि तानाजी एकमेकांसोबत बोलत उभे असतात)
तानाजी - आरं ती फॉर्म भरायचं लंयच अवघड काम होतं लगा, ही कागद ती दाखला. मला आणि महेंद्रला काय कळणा झालतं, विजय सरांमुळ आमचा निभाव लागला न्हाय तर काय खरं नव्हतं. सुरवातच अशी व्हायलीय त्यामुळं पुढं कसं व्हणार याचं भ्या वाटतंया.
ओम - कुठं जास्त डॉक्युमेंट लागतात मार्कशीट, एल सी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट इतकंच तर लागतं. आणि काही नाही होत, होतंय सगळं व्यवस्थित.
तानाजी - आरं नाही जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर असं काय काय व्हतं की.
ओम - तुम्हाला असणार ते मला काही नाही लागलं. महेंद्र कुठे राहिलाय आला नाही अजून
तानाजी - त्यांच्या इकडे बुद्धविहारात कोणा तरी मोठ्या प्राध्यापकाचं व्याख्यान हाय ते झालं की येतो म्हंटलाय त्यो.
ओम - बर बर. मागच्या वर्षीची कट ऑफ लिस्ट बघितली तर मार्क थोडे कमीच मिळाले असे बाबा म्हणत होते. पाहिजे त्या कॉलेजला ऍडमिशन मिळते की नाही काय माहिती?
तानाजी - तुझे टक्के तर एकच नंबर हायेत की मर्दा, तू असं म्हंटलं तर मग आमचं कसं व्हणार.
ओम - तुमचं रिझर्व्हेशन मधून होऊन जाईल ऍडमिशन असं मंदार दादा सांगत होता. त्यांच्यात आणि आपल्यात फरक असतो असं तो म्हणत होता.
तानाजी - फरक? कसला फरक लगा (चेहऱ्याचे भाव प्रश्नार्थक बनवत)
ओम - मी ही विचारलं पण तो म्हणाला कळेल तुला पुढे, (इतक्यात महेंद्र तिथे येतो)
महेंद्र - सॉरी दोस्तांनो मला जरा उशीर झाला. व्याख्यान लांबलं जरा
ओम - कसलं व्याख्यान होत?
महेंद्र - आमचे पप्पा ज्या सामाजिक संस्थेचे मेम्बर आहेत त्या संस्थेनं 'बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास' या विषयावर आ. ह. साळुंखे यांचे व्याख्यान ठेवले होते. सोबतच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ८० ℅ पेक्षा जास्त असल्याने माझा पण सत्कार केला त्यामुळं वेळ झाला.
तानाजी - तुझा बी सत्कार झाला. भारीच की लेका.
ओम - हा ना छानच की. बाबांनी तर माझं अभिनंदन ही केलं नाही. जाऊदेत, चला पहिली लिस्ट लागली का बघुयात (तिघे कॉम्प्युटर लॅब कडे जातात)
तांत्रिक अडचणीमुळे लिस्ट उद्या लागणार आहे असं नोटिफिकेशन त्यांना समजतं. तिघेही उद्या भेटुयात म्हणून कॉलेजमधून निघतात.
भाग तिसरा :
आरक्षण आणि मतभेद
Scene7
तिघेही ११.०० ला कॉलेजमध्ये येतात. तिघांची भेट होते.
ओम - (तानाजी आणि महेंद्र कडे बघत) आज पण लिस्ट लागणार का अजून काही प्रॉब्लेम येणार काय माहिती?
महेंद्र - हा ना एडमिशन कुठं मिळणार, कुठं जावं लागणार काय समजीना झालंय.
तानाजी - आपल्या तिघाचा नंबर एकाच कॉलेजात लागला तर एकदम झाक काम होईल.
ओम - अवघड आहे बाबा, खूप कंपिटीशन आहे. पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणे म्हणजे एक दिव्यच आहे.
महेंद्र - होईल हीच आशा करूयात आपण (चेहऱ्यावर काळजीचे भाव आणत)
ओम - चला टाइम झाला आहे लिस्ट लागण्याचा कॉम्पुटर लॅब कडे जाऊयात. (तिघे लॅब कडे जातात)
Scene 8
गव्हर्नमेंट कॉलेजला महेंद्रचा नंबर लागतो, पण ओम आणि तानाजी चा नंबर लागत नाही. तिघेही नाराजीने कट्ट्याकडे येतात.
महेंद्र - भावांनो टेन्शन घेऊ नका, दुसऱ्या राउंडला होईल तुमचं ऍडमिशन. कट ऑफ च्या जवळच आहात तुमि दोघे पण.
ओम - (महेंद्र ला थांबवत) तुला काय जातं आता बोलायला तुला तर मिळालं ना ऍडमिशन.
महेंद्र - असं का बोलतोय, माझ्या कॅटेगरीचा कट ऑफ थोडा कमी होता म्हणून मला मिळालं नाही तर झालं नसतं पहिल्या राउंडला माझं पण
ओम - कमी मार्क असून तुझं होतं आणि जास्त मार्क असून पण माझं होत नाही काय समजेना मला.
तानाजी - अरं लगा एस्सी कॅटेगरी मधून झालंय त्याचं. आपलं बी होईल दुसऱ्या राउंडला.
ओम - ताना असं होऊन पण तू त्याच्या बाजूनं कसं बोलू शकतो. या आरक्षणामुळे आपण मागे पडत आहोत दिसत नाही का तुला.
तानाजी - तसं नाही ओम (तानाजी ला थांबवत महेंद्र बोलतो)
महेंद्र - ओम यात माझी काय चुकी, तुम्ही दोघे सोबत पाहिजे असंच मलाही वाटतंय.
ओम - (रागाने)मंदार दादा बरोबर सांगत होता आरक्षण म्हणजे आपल्यासाठी अडथळा आहे. तुमच्या सारख्या लोकांमुळे आम्हाला अडचणी येतात.
तानाजी - ओम काय बोलायलास दोस्त हाय तो आपला
ओम - तू ही त्याचीच बाजू घेणार तू पण त्यातलाच आहे ओबीसी कॅटेगरी मधून तुझं पण होणार ऍडमिशन हे माहिती आहे तुला. हे आरक्षण नसायलाच पाहिजे.
महेंद्र - ओम आमच्या सारखे अनेक आरक्षणामुळेच शिक्षण घेत आहेत, नाहीतर इंजिनिअरिंगचा खर्च झेपला असता का आम्हाला, त्यामुळे काय बोलतोय ते विचार करून बोल. आमच्या सारख्यानी शिकू नये असं म्हणायचंय का तुला.
ओम - शिकावं पण आपल्या हिमतीवर मेहनतीने, मेरिटने (योग्यतेने) असं आरक्षणाच्या कुबड्या घेऊन नव्हे.
महेंद्र - म्हणजे आम्ही मेहनत केली नव्हती असं म्हणाचाय का तुला का आमच्यात योग्यता नसते असं म्हणायचाय तुला. सगळं माहीत असून पण असं कसं बोलू शकतो तू?
(इतक्यात विजय सर तिथून जात असताना यांचं बोलणं ऐकून थांबतात पण यांचं लक्ष नसतं)
ओम - ते तुम्ही तुम्ही बघा, तुमच्या सारखे मित्र मी का केला असं मला वाटतंय.
महेंद्र - ओम तू रागात काहीही बोलतोय तोंड सांभाळून बोल (त्यांच्यात भांडण सुरू होणार इतक्यात विजय सर मध्ये येतात)
Scene 9
विजय सर - ओम, महेंद्र आणि तानाजी चला माझ्या केबिनला थोडं बोलायचं आहे ( सर अचानक आल्याने तिघेही चपापतात आणि आणि स्वतःला सावरत केबिनकडे निघतात)
विजय सर - या बसा (तिघेही बसतात) तुमचं बोलणं मी ऐकलं आहे. त्यामुळे इकडे बोलावलं. आपण इथे त्या विषयावर बोलूयात. पण संयमाने आणि शांतपणे.
अजून एक महत्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या समाजाचे आहात, तुमच्या घरच्यांचे किंवा इतर व्यक्तींचे याबाबत काय विचार आहेत ते सर्व विसरून तटस्थपणे या विषयावर आपण बोलूयात ठीक आहे
(तिघेही सरांचा खूप आदर करत असतात त्यामुळे होकारार्थी मान हलवतात)
विजय सर - बोल ओम काय म्हणणं आहे तुझं आरक्षणाबाबत.
ओम - सर आरक्षणाच्या माध्यमातून जनरल, एस्सी, एसटी ओबीसी यासारख्या कॅटेगरी मध्ये विभागणी करणे अन्यायकारक आहे? काय गरज आहे असं करण्याची?
विजय सर - ही विभागणी जी आहे ती जातिव्यवस्थेमुळे आहे. भारतीय समाजाचे विभाजन जातींमुळे सर्वात जास्त प्रमाणात झाले आहे. आजही देशात ४६३५ मुख्य जाती आहेत. पोटजाती आणि त्या पुढचे विभाजन गृहीत धरल्यास हा आकडा अनेक पटीने वाढतो.
जातीच्या आधारे हजारो वर्षांपासून समाजातील एका वर्गाकडून विशिष्ट वर्गासोबत भेदभाव केला जात होता. शिक्षण, संपत्ती, धार्मिक कार्य याबरोबरच मूलभूत मानवी अधिकारापासून ही त्यांना वंचित ठेवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास, पाणी पिण्यास ही त्यांना मनाई होती. त्यामुळे तो वर्ग मुख्य प्रवाहापासून तुटला आणि मागे पडला.
संविधान लागू होइपर्यंत त्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल घडला नव्हता. जातीय भेदभाव नष्ट करून संविधानाने त्यांची या शोषणातून मुक्तता केली. सर्वांसोबत समान अधिकार दिले सोबतच आरक्षणाच्या माध्यमातून काही विशेष अधिकार ही दिले जेणेकरून हा मागे राहिलेला वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जावा.
म्हणून हे आरक्षण आहे आणि कॅटेगरी आहेत.
ओम - पण सर आता कुठे जातीच्या आधारे भेदभाव केला जातो? त्यामुळे आजही आरक्षण का दिले जाते?
विजय सर बोलण्या आधी महेंद्र सर मी बोलू का असे विचारतो? विजय सर बोलण्याची परवानगी देतात.
महेंद्र - सर मी मागच्या वर्षी मामाच्या गावाला गेलो होतो, तेव्हा एक अशीच घटना घडली होती. आमच्या एका नातेवाईकाने मुलाच्या लग्नाची घोड्यावरून वरात काढली होती त्यामुळे गावातील वरच्या जातीतील लोकांनी वरातीवर दगडफेक केली आणि त्या कुटुंबाला वाळीत टाकलं.
विजय सर - होय फक्त आपल्या इथेच नाही तर सम्पूर्ण भारतात अशा अनेक घटना घडत असल्याचे आपल्याला न्यूज पेपर आणि चॅनेलच्या माध्यमातून दिसते. खैरलांजी सारख्या काहीच घटना आपल्या पर्यंत पोहचतात पण मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या अशा कितीतरी घटना घडत असतात ज्या सर्वांपर्यंत पोहचत ही नाहीत. कायद्याने जरी हा भेदभाव संपवला असला तरी उच्च वर्णीयांची मानसिकता पूर्णपणे बदलेली नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजी महाराज यांच्या पत्नी संयोगीताराजे प्रकरण. जातीच्या आधारे छत्रपतींच्या वंशजांसोबत भेदभाव होत असेल तर सामान्यांची काय स्थिती असेल हे यावरून लक्षात येते.
आणि आजही आरक्षण दिले जाते कारण, जातीयता अजूनही संपलेली नाही. मी आधी म्हंटल्या प्रमाणे समाजातील मुख्य प्रवाहाच्या बरोबरीने या वंचित वर्गाची प्रगती अजूनही झालेली नाही त्यामुळे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आरक्षण गरजेचे ठरते.
ओम - पण सर जेव्हा एका वर्गाला विशेष अधिकार दिले जातात तेव्हा संविधानात जी समानता सांगितली जाते, हे तर त्याच्या विरोधातच झालं ना?
विजय सर - तसं नाही आहे मी तुला उदाहरण देऊन समजावतो, गर्दी असलेल्या बसमध्ये जेव्हा आपल्या कुटुंबातील स्त्री किंवा वयाने जेष्ठ व्यक्ती जर प्रवास करत असेल तर आपल्या मनात काय विचार येतो?
ओम - त्यांना बसायला जागा मिळावी आणि ते सुरक्षितरित्या इच्छित स्थळी पोहचावे.
विजय सर - अगदी बरोबर, असे वाटणे स्वाभाविक आहे मग ती स्त्री किंवा ज्येष्ठ व्यक्ती कोणत्याही वर्गाची असो. लेडीज सीट्स आणि सिनिअर सिटीझन सीट्स या माध्यमातून त्यांना त्या बसमध्ये जागा दिली गेली तर ते योग्य आहे का अयोग्य?
ओम - योग्यच आहे सर (महेंद्र आणि तानाजी ही होकारार्थी मान हलवतात)
विजय सर - स्त्रियांना किंवा सिनिअर सिटीझन किंवा विकलांग व्यक्ती यांना ही जी विशेष सुविधा दिली जाते त्याला म्हणतात "प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमीनेशम म्हणजेच संरक्षणात्मक भेदभाव"
या विशेष अधिकारामुळे बाकीच्यांचे शोषण करण्याचा अधिकार त्यांना मिळतो किंवा तसे ते करू शकतात का?
ओम - नाही. पण...
विजय सर - (ओमला थांबवत) मला पूर्ण करू दे. जातीच्या आधारे जे विशेष अधिकार दिले जातात ते ही प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमीनेशनच आहे. जेव्हा संविधानाने विषमता नष्ट करून समान दर्जा लागू केली तेव्हा प्राथमिक स्तरातील समानता साध्य झाली. पण त्यामुळे ज्यांनी शोषण केले आहे आणि ज्यांचं शोषण झालं आहे त्यांच्यातले अंतर कमी झाले का? ते समान पातळीवर आले का? तर त्याचं उत्तर नकारार्थीच आहे.
त्यांच्यावर जो सामाजिक अन्याय झाला तो दूर करून सामाजिक न्याय करण्यासाठी त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून विशेष अधिकार देण्यात आले.
पण हे अधिकार जो वर्ग पुढे आहे त्याला थांबविण्यासाठी किंवा त्यांचे काढून घेऊन दुसऱ्यांना दिलेत असं नाही तर जो वर्ग मागे राहिला आहे त्याला बरोबरीने आणण्यासाठी दिले आहे.
संरक्षणात्मक भेदभाव हा समानतेच्या उद्देशाने केला जातो, त्यामुळे आरक्षण समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे असे म्हणणे साफ चुकीचे ठरते.
Scene 10
सर थांबल्यानंतर ओम अजून काही तरी विचारणार इतक्यात तानाजी एक प्रश्न विचारण्याची परवानगी मागतो. सर परवानगी देतात.
तानाजी - सर चार दिसा आधी शाळेत दाखला घ्यायला गेलतो तवा आमच्या शाळेचं गुरजी आणि क्लार्क बोलताना मी ऐकलं ते म्हणत होते बाबासाहेबांनी आरक्षण फक्त दहा वर्षासाठी दिलं व्हतं? तर ते खरं आहे का?
विजय सर - संविधानानुसार आरक्षण तीन प्रकारचे आहे. शैक्षणिक आरक्षण, सरकारी नौकरीतले आरक्षण आणि राजकीय आरक्षण. संविधानाच्या कलम ३३४ नुसार यातील राजकीय आरक्षणाला फक्त दहा वर्षाची मुदत घातलेली आहे. परंतु शिक्षण आणि नौकरीतल्या आरक्षणाला कोणतीही मर्यादा ठरवून दिलेली नाही.
असे असले तरी आरक्षण कायमस्वरूपी असावे अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते. कारण आरक्षण हे विशिष्ट हेतूने दिले गेले आहे आणि तो हेतू म्हणजे समाजातील सर्व वर्ग एका समान पातळीवर यावेत. हा हेतू ज्या दिवशी साध्य होईल त्यादिवशी आरक्षण बंद झालं पाहिजे.
महेंद्र - सर आरक्षणामुळे मिळणाऱ्या संधीमुळे मागे राहिलेल्या वर्गाने कितपत बरोबरी साधली आहे?
विजय सर - हे नक्की सांगता येणं अवघड आहे. पण या वर्गाची जी स्थिती आरक्षणाआधी होती त्यात आमूलाग्र बदल झाला आहे हे नक्की. शिक्षण व सरकारी नौकरीत संधी मिळाल्याने त्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा स्तर उंचावला आहे. या वर्गाच्या प्रगतीसोबतच त्यांचे देशाच्या प्रगतीतही योगदान वाढत आहे जे संविधान लागू होण्याआधी नगण्य असे होते.
अशा स्वरूपाची सर्व माहिती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि विविध केंद्रीय व राज्य आयोग यांच्याकडे मिळू शकते.
असे असले तरी त्यांचे उच्च श्रेणीतील नौकऱ्यांमधले प्रमाण अजूनही नगण्यच आहे. धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या संस्थांच्या सर्वोच्च पदी अजूनही उच्च वर्णीयांचीच मक्तेतदारी पाहायला मिळते.
जसे सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, प्राइम मिनिस्टर ऑफिस, चीफ मिनिस्टर ऑफिस, परराष्ट्र मंत्रालय, रिझर्व्ह बँक इत्यादी.
ओम - सर जास्त मार्क असूनही कमी मार्क असलेल्यांना संधी मिळत राहिली तर मेरिटला काही किंमत नाही का?
विजय सर - मेरिट तर गरजेचे आहेच पण त्याआधी त्याबाबतच्या काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
मेरिट म्हणजे काय?
ओम - योग्यता, पात्रता.
विजय सर - तुज्याकडे योग्यता कुठून आली?
ओम - आमच्या रक्तातच आहे सर आमच्या आधीच्या पिढ्याही ज्ञानी आणि कर्तबगार होत्या त्यामुळे माझ्यात ही ते सर्व गुण आहेत.
विजय सर - ठीक आहे. पुन्हा एकदा उदाहरण घेऊन समजावतो. त्याआधी महेंद्र आणि तानाजी मला सांगा तुमच्या आधीच्या पिढ्या काय करायच्या याबाबत तुम्हाला काय माहिती आहे का?
महेंद्र - सर जास्त काही माहीत नाही पण वडीलांना चौथी पर्यंत शिकता आलं त्यांना अजून शिकायचं होतं पण घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे सगळ्यांना कामाला जावं लागायचं असं माझी आजी सांगत असते. पुर्वजांबद्दल विचारल्यावर माझा आजा सांगतो त्यांच्या आधीचे लोक लंय शूरवीर होते शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या सैन्यात आपली माणसं व्हती.
(सर तानाजी कडे पाहत बोलायला सांगतात)
तानाजी - सर आमची समदी लोकं आधीपासून शेती आणि शेती संबंधित छोटी मोठी कामं करायची एवढंच माहिती हाय. कधी असलं ईचारलं न्हाय घरी.
विजय सर - ओम तुज्या घराजवळ शहरातलं जे सुप्रसिद्ध मंदिर आहे तिथे पूजा कोण करतात ?
ओम - पुजारी काका करतात जे आमचेच नातेवाईक आहेत. त्याआधी कोण पूजा करत होते ?
ओम - आजोबा, सर पिढ्यानपिढ्या पासून त्या मंदिराच्या पूजेची जबाबदारी आमच्याच कुटुंबाकडे आहे.
विजय सर - कशाच्या आधारावर ही जबाबदारी तुम्हाला दिली आहे, तुमची योग्यता तपासून पाहिली आहे का? किंवा तशी तपासण्याची काही पद्धत आहे का?
ओम - योग्यता तपासण्याची गरज काय? ब्राम्हण हे सर्वश्रेष्ठ आहेत त्यामुळे तो अधिकार जन्मानेच मिळतो.
विजय सर - असे कुणी सांगितले
ओम - सर या गोष्टी तर सर्वांनाच माहिती आहेत तरी असे का विचारताय? धर्मग्रंथात तसे लिहले आहे.
विजय सर - जन्माने किंवा धर्मग्रंथ सांगतात म्हणून कोणी योग्य अयोग्य ठरत नाही. उच्च जातीतील व्यक्तींना सुरवातीपासूनच शिक्षणाचा अधिकार मिळाला असल्यामुळे त्यांच्यात योग्यतेचं प्रमाण अधिक आहे.
असा विचार कर, एक श्रीमंत व्यक्ती आहे, त्याचे पूर्वज ही ज्ञानी, श्रीमंत आणि उच्चवर्णीय होते. त्याला एक मुलगा होतो, त्याला शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळते, उत्तम ज्ञान देणारे शिक्षक मिळतात, उत्तमप्रतिचं शैक्षणिक साहित्य आणि संस्था मिळते. चांगले शिक्षण घेऊन तो सक्षम बनतो. उत्तम नौकरी किंवा व्यवसाय करतो आणखीन श्रीमंत होतो.
दुसऱ्या बाजूला एक गरीब व्यक्ती आहे, त्याचे पूर्वजही गरीब, अज्ञानी आणि मागासलेले होते, त्याला एक मुलगा होतो, योग्य शिक्षण मिळत नाही त्यामुळे त्यांची अंगी विविध गुण तयार होत नाही, त्यामुळे मोलमजुरी करतो, अजून गरीब होतो.
या दोन्ही केसमध्ये बारकाईने पाहिले तर लक्षात येते की योग्यता ही त्या व्यक्तीच्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असते. गरीब व्यक्तीलाही योग्य सुविधा आणि संधी मिळाली तर त्याच्यामध्ये ही योग्यता निर्माण होऊ शकते. जीन्स मधून जी योग्यता मिळते ती आपल्याला बाय चान्स मिळते पण योग्यतेचं बहुतांश प्रमाण हे व्यक्तीच्या सभोवतालच्या वातावरणावर आणि परिस्थितीवर अवलंबून असते.
हा वर्ग मागासलेला का राहिला तर योग्यता नसल्यामुळे नव्हे तर संधी न मिळाल्यामुळे. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक अशी ओळख आहे.
ओम - सर मेरिटसाठी (योग्यतेसाठी) गरिबी ही महत्त्वाची अडचण असेल तर मग आर्थिक निकषावर आरक्षण का दिले जात नाही?
विजय सर - ओम तुझी अजूनही गल्लत होती आहे. मेरिटसाठी फक्त गरिबी ही एकच अडचण नाही तर त्या व्यक्तीची सामाजिक परिस्थिती, त्याच्या आजूबाजूचे वातावरण मुख्यतः जबाबदार असते.
जात आणि गरिबीचा काही संबंध नाही. प्रत्यके जातीमध्ये गरीब ही आहेत आणि श्रीमंतही. पुन्हा एकदा एक उदाहरण घेऊन समजविण्याचा प्रयत्न करतो बघ लक्षात येत का?
समज एक ब्राम्हण जातीतला गरीब व्यक्ती आहे, तो गरीब आहे म्हणून त्याला मंदिरात प्रवेश नाकारला जाईल का? शिक्षणाचा अधिकार नाकारला जाईल का? किंवा सार्वजनिक ठिकाणी त्या व्यक्तीसोबत सामाजिक भेदभाव केला जाईल का?
ओम - नाही. तसे काही होणार नाही.
विजय सर - म्हणजेच त्या व्यक्तीचे गरिबीच्या आधारे सामाजिक शोषण होणार नाही आणि त्यामुळेच ती व्यक्ती अरक्षणास पात्र ठरत नाही.
मी आधी सांगितल्या प्रमाणे आरक्षण ही सामाजिक न्यायाची प्रक्रिया आहे, तो गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे आर्थिक निकषावरून व्यक्तीचे किंवा समूहाचे सामाजिक मागासलेपण ठरविता येत नाही आणि त्यामुळेच आर्थिक निकषावर आरक्षण दिले जात नाही?
असे असले तरी प्रत्येक गरीब व्यक्तीला शिक्षण मिळणे गरजेचे आहे. तशी तरतूद संविधानाने शिक्षणाच्या अधिकाराद्वारे केली आहे. प्रत्येक भारतीयाला मग तो कोणत्याही वर्गाचा असो त्याला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत घेण्याचा अधिकार आहे. यासोबतच गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणामध्ये इबीसी ( इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास) कॅटेगरीच्या माध्यमातून फी मध्ये सवलत दिली जाते. एस्सी, एसटी आणि ओबीसी या व्यतिरिक्त महाराष्ट्रात एसबीसी (स्पेशली बॅकवर्ड क्लास) कॅटेगरी मध्ये येणाऱ्या वर्गाला शिक्षणात २% सवलत दिली गेली आहे.
ओम - सर आरक्षण फक्त भारतातच दिले जाते का?
विजय सर - नाही. जिथे जिथे कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवली जाते तिथे तिथे वंचित घटकाला विशेष सुविधा दिल्या जातात. जवळपास जगातील सर्वच लोकतांत्रिक देशामध्ये आरक्षण किंवा तशी व्यवस्था आहे. कॅनडा, अमेरिका, युके, स्वीडेन, फिनलँड, चीन, जपान, न्यूझीलंड, पाकिस्तान ही काही ठळक उदाहरणे आहेत.
कल्याणकारी राज्य राबविण्यासाठी आरक्षण ही आवश्यक आणि उपयुक्त अशी तरतूद ठरत असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे. असे असले तरी आरक्षणाची उपयुक्तता ही पूर्णपणे त्याच्या योग्य अंमलबजावणीवर आधारित आहे हे लक्षात घेणे महत्वाचे ठरते. ही विशेष सुविधा प्रत्येक गरजू वर्गापर्यंत पोचविण्यासाठी व त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी त्यामध्ये वेळोवळी आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.
थोडावेळ सर्वजण शांत राहतात, त्या तिघांकडे नजर टाकत विजय सर विचारतात, अजून कुणाच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर विचारा. आणि महत्वाचं म्हणजे मी जे सांगतोय ते तुम्ही जसंच्या तसं आंधळेपणाने स्वीकारलं पाहिजे असे नाही. तुम्ही यावरती विचार करा, तपासून बघा आणि मग पटलं तर स्वीकारा.
महेंद्र - नाही सर उलट अरक्षणा संबंधी अनेक गोष्टी आम्हाला समजल्या ज्या माहिती नव्हत्या, काय तानाजी?
तानाजी - व्हय व्हय, आता समदं टकुऱ्यात फिट बसलंय.
विजय सर ओमकडे बघतात, ओम तुझं अजून समाधान झालेलं दिसत नाही.
ओम - तसं नाही सर, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे हे पटतंय मला आता. खुली स्पर्धा तेव्हाच शक्य होईल जेव्हा सगळे समान पातळीवर येतील. पण माझे हे बदलेले विचार घरी आणि माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींना पटतील असे मला वाटत नाही.
विजय सर - जाती व्यवस्थेची पकड जेवढी मजबूत तेवढा परिवर्तनास विरोध जास्त. सर्व गोष्टी बदलणं आपल्या हातात नाही. मतपरिवर्तन होण्यास काहींना जास्त वेळ लागेल काहींना कमी पण ते स्वतः किती बदलास अनुकूल आहेत यावर ते आधारित आहे. त्यामुळे आपण आपल्याला जे शक्य होईल ते करत राहायचं.
आरक्षणाचे बाजूने असो वा विरोधात पण त्या आधारे एकमेकांचा द्वेष करणं हे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. जाती जेव्हा संपतील तेव्हा संपतील पण तोपर्यंत जातींमुळे आपल्यात होणारा वाद आपण बंद केला पाहिजे.
(घड्याळ बघत) चला खूप वेळ झाला तुम्हालाही घरी जायचे असेल, आशा आहे की आपल्या या चर्चेमुळे तुमच्यातले मतभेद काही प्रमाणात का होईना कमी झाले असतील.
ओम, महेंद्र आणि तानाजी - हो सर नक्कीच (तिघे हसत हसत एकत्र केबिनच्या बाहेर पडतात)
समोर सर्व महापुरुषांचे फोटो आणि बॅक स्टेज मधून खालील ऑडिओ आणि शेवट.
(जागतिक पातळीवर गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर मेरिट आणि सामाजिक न्याय यांचा समन्वय जरुरी आहे. लोकशाही आदर्श रुपात राबविण्यासाठी ती सर्वसमावेशक असणं आवश्यक आहे. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक वर्गाला योग्य हिस्सेदारी देत भरतीयत्वाची भावना वाढवुन सर्वांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेणे अत्यावश्यक आहे.)